My YouTube Channel
Sunday, 13 December 2020
Wednesday, 12 August 2020
कृष्णा,
श्रवणानंद देणारे अप्रतिम अभिवाचन....
जन्माष्टमीच्या निमित्ताने वाचलेली, कै. दुर्गा भागवतांनी लिहिलेली ही सर्वोत्तम पोस्ट:
अभिवाचन स्वर अनामिक🙏🏻
🌿
कृष्णा,
तुला कसलं संबोधन लावायचं? तू आकाशासारखा वाटतोस मला, आकाश कसं सतत माथ्यावर असतं आपण जिथे जाऊ तिथे सोबत करतं पण त्याचा निळा रंग बोटावर नाही घेता येत…
खरं म्हणजे तुझं नाव घेतल्यावर तू मानवी रूपात डोळ्यासमोर येतच नाहीस.. आधी येते ती आकाशाची गडद निळाई आणि मग त्यामागोमाग लहरत येतं एक मोरपीस… तुझं मोरपीस!
तुझ्याइतका मानवी जीवनात मिसळलेला कुठलाच देव नाही बघ! प्रत्येक नातं तू समरसून जगलास आणि वेळ येताच ते नातं त्यागून मोकळाही झालास! कधी परत वळून बघितलंस का रे मागे? तुझ्यामागे त्या माणसांचं काय झालं असेल तुझ्याशिवाय ?
तुझं सगळंच अतर्क्य! तू प्रचलित नियम मोडलेस. जन्म घेतलास वसुदेव देवकीच्या मथुरेत पण वाढलास नंद यशोदेकडे गोकुळात! दहीदुधाच्या चो-या केल्यास, भलत्या वयात गोपिकांची छेड काढलीस. सुदामा, अर्जुन, उद्धव यांचा मित्र तू होतासच पण द्रौपदीचा सुद्धा 'सखा' झालास. हे सुंदर नातं तू भारतीय स्त्रीला दिलंस. 'बाईचा मित्र' ही संकल्पनाच नव्हती तुझ्याआधी आपल्याकडे, 'तो' स्त्रीचा पिता, पती किंवा पुत्र असावा अशी आपली समाज रीत! विवाहित राधेचा प्रियकर झालास. अगदी प्रेमाचं प्रतिक म्हणून नाव घेताना राधेचं नाव तुझ्याआधी येतं.
पुढे अष्टनायिकांचा पती झालास तरी जरासंधाच्या तावडीतून सोडवलेल्या सोळा सहस्र स्त्रीयांना अभय दिलंस. तुझ्यानंतरही अनेक वर्षांनी सूरदासांनी तुझं बालपण त्यांच्या पदांतून मांडलं, मीरेने तुला 'नटनागर गिरिधारी' म्हणत साद घातली.
एक सांग, तू अनेक नाती निभावलीस पण जीव जडवलास तो फक्त राधेवर…! खरं ना? गोकूळ सोडल्यावर परत तू बासरी वाजवल्याचे उल्लेख कुठेच आढळत नाहीत.
गीतेत 'यदा यदा हि धर्मस्य...' म्हणत तू परत येण्याचं वचन दिलं आहेस. पण आता युद्धासाठी नको रे येऊस, आम्ही माणसं म्हणजे एक एक बेट झालोय, यावर नात्यांचे पूल बांधायला ये!
आणि हो, येताना रुक्मिणीला नाही आणलंस तरी चालेल पण राधिकेला सोबत घेऊन ये, म्हणजे तुझी बासरी ऐकायला मिळेल.
कृष्णा, पुन्हा एकदा बासरीत सूर भरायला ये!
दुर्गा भागवत.🙏
श्रवणानंद घेऊ या
~संकलन
Thursday, 23 July 2020
Tuesday, 21 July 2020
सुखाचा_शोध -लेखिका- डॉ. विजया वाड.
#सुखाचा_शोध-
लेखिका- डॉ. विजया वाड.
उदयाचलची नोकरी आठ पन्नास ते ५ होती. म्हणजे रोज आठ तास दहा मिनिटे मला आठ सोळाची गाडी मुलुंडहून विक्रोळीस जाण्यासाठी पकडावी लागे. म्हणजे घर आठ पाचला सोडावे लागे.
सक्काळी मी साडेसातला धांदलीत चहा केला नि गाळणीतला चहाचा चोथा ( जो फार गरम होता) डस्टबिनमध्ये रिकामा करायला धावले.
माझ्या सासूबाई बेसिनवर दात घाशीत होत्या नि डस्टबिन बेसिनच्या खाली होती. त्या बाजूस होईनात म्हणून मी पायाच्या अंगठ्याने कुंडीचे झाकण दाबून उघडले नि तो चोथा कुंडीत टाकला.
दुर्दैव माझे ! तो उकळता चोथा कुंडीत न पडता त्यांच्या पायावर पडला. चुकून हो !
तुम्हाला पण वाचून पटलं की नाही हो ? पण त्या संतापल्या. ब्रश फेकला. जोरात ओरडल्या, "मुद्दाम उकळत्या चहाचा चोथा माझ्या पायावर टाकला." मी ओशाळी उभी ! "कालचा सूड उगवला !" त्या पुढे ओरडल्या.
मधल्या खोलीत माझे सासरे पेपर वाचत होते नि यजमान दाढी करीत होते. दोघे धावत आले. "कसला सूड? काय गं? शिकलेल्या मुली अशा वागतात?" सासारे रागावले.
सासूबाईंचा गोरा गोरा पाय लाल झाला होता नि त्यावर फोड? बाप रे बाप ! "अहो तो चहाचा गरम चोथा खरोखर चुकून पडला होता हो ! कसला सूड?"
त्याचं असं झालं होतं. मी नि माझे यजमान सासू-सासऱ्यांजवळ राहात होतो. राहाते घर त्यांचे होते. मुली चिमुकल्या होत्या. आई आपल्या मुलांना शिस्त लावायचा प्रयत्न करतेच ना? सांगा पाहू !
प्राजक्ता-माझी मोठी मुलगी- हिला काही कारणाने मी कुल्यावर चापट मारली. तशा त्या संतप्त झाल्या. इतक्या तापल्या की धुण्याची मोठी काठी त्यांनी मजसमोर धरली, " ही घे, नि मार माझ्या टाळक्यात ! मुलींवर हात उचलते !" त्या कडाडल्या.
मी सौम्यपणे म्हटलं, "माझ्या मुलींना मी शिस्त लावायचा प्रयत्न करतेय, त्यात कृपा करून तुम्ही मधे पडू नका." चुकलं का हो माझं काही प्रिय वाचकांनो?
पण त्या ठाशीवपणे म्हणाल्या, "ते 'आपल्या'घरात ! माझ्या घरात हे चालणार नाही !" मी गप्प ! अपमान गिळला. ते तेवढ्यावरच थांबलेले वर्तुळ... ! त्याचा सूड ?
मी आश्चर्य करीत उभी ! माझे यजमान दाढी करीत होते. अर्ध्या गालावर साबण ! तसेच उठले, मला म्हणाले, "का गं आईच्या पायावर तू उकळत्या चहाचा चोथा टाकला? किती भाजला तिचा पाय ! फोड आले !"
सासरे बोलले... मी गप्प बसले. पण नवरा ? त्यालाही असं वाटतं की मी हे मुद्दाम केलं? आपण कुणाच्या जिवावर सासरी येतो हो ? नवरा अगदी 'आपला' असायला हवा ना ! सांगा! त्याला तरी वाटायला हवं नां.... की बायकोनं हे मुद्दाम नाही केलं !
बरं ! जी 'सूडकथा' सासूबाईंनी रंगविली ती ना ह्यांना ठाऊक होती ना माझ्या सासऱ्यांना !राईचा पर्वत कसा होतो कळलं ना?
आठ सोळा केव्हाच चुकली होती. नवऱ्यास मी सासूच्या धाकाने अहो जाहो करीत असे. पण त्या क्षणी फ्यूज उडाला होता. रागाचा पारा उसळी मारुन डोक्यापार गेला होता. मी एकेरीवर आले. पर्वा न करता कुणाची !
"तुलाही असं वाटतं की मी हे मुद्दाम केलं? तुझाही माझ्यावर विश्वास नाही? मग कशाला राहू मी या घरात? चालले मी !" रागाच्या अत्युच्च क्षणी ही अठ्ठावीस वर्षांची विजू घर सोडायला निघाली.
मी एक बॅग काढली. माझे दिसतील ते कपडे त्या भरले. मग मुलींचे फ्रॉक भरू लागले. नवरा म्हणाला, "त्यांचे फ्रॉक का भरतेयस?"
आता तर माझ्या रागाने परिसीमा गाठली. मी रागाने त्याला दम भरला "मुलं 'माझ्या ' आहेत. तू पोटातून काढल्यायस का? मग गप्प बस !" यावर तो निरुत्तर ! पुरुष होता ना ! मुली पोटातून कशा काढणार ? माझे सासू-सासरे अवाक्... निशब्द ! काय चाललेय काय हे ?
माझा दादा आर्थररोड जेलचा सुपरिटेंडेंट होता. माझ्या घरात नवरा डॉक्टर असल्याने फोन होता. १९७३ मध्ये तेव्हा घरात एमटीएनएलचा फोन असणे हेही अप्रूप होते.
मी दादाला फोन लावला. बापविना लेकरु होते मी ! दादाच वयाच्या अकराव्या वर्षापासून माझा बाप होता. "दादा, असं झालं...." मी रडत रेकॉर्ड लावली. " ज्या घरात विश्वासच नाही उरला, तिथे का राहू मी?"
दादाने शांतपणे सारे ऐकून घेतले उत्तम श्रोता बनून. "मी येतो तो पर्यंत शांत बस. मी नक्की घेऊन जाईन हं विजू."
बस. मला आणखी काय हवे होते. मी लगेच डिक्लेअर केले. "दादा माझा येतोय मला न्यायला. मी नि मुली तासाभरात निघू."
घर चित्रस्तब्ध झाले. मुली तोंड शिवून कोपऱ्यात उभ्या. रोज मी शाळेत असे तेव्हा त्या आजीजवळ असत. पण या क्षणी कोण 'आपलं' ते त्या चिमण्या जीवांना कळत नव्हतं. आईवर लेकरांचा जीव असतोच नं !
आम्ही तेव्हा मुलुंड पश्चिम येथे रणजित सोसायटीत राहायचो. दादा तासाभरात आला. पूर्ण वेश ! जेलरचा ! एकदम कॅडॅक !... सोसायटीभर गॅलऱ्या भरल्या.
वाडांकडे जेलर आला ! बूट काढून चक्क खाली बसला. सासूबाईंच्या पायाशी. त्यांच्या फोड आलेल्या पायावर मायेने हात फिरविला अलवार. "विजू, बर्नाल लावले का?"
या भांडणात कुणाच्याही ते लक्षात आले नव्हते. मी धावत बर्नाल आणले मधल्या खोलीतून. त्याने ते पायाला लावले. मग म्हणाला, "ती मिळवती आहे आणि नसती तरी मला जड नाही. बाप आहे मी तिचा. पण अभिमानाची टोक इतकी ताणावी? मुलींना बाप कुठला मग?"
माझ्या सासूबाईंनी एकदम हात पसरले. नातींना जोरात म्हणाल्या, "कुठेही जायचं नाही मला सोडून. निघाल्या आईच्या मागे मागे... या गं या... माझ्या कुशीत या दोघी."
मुली धावल्या. आजीला घट्ट बिलगल्या मग आजी रडायला लागली. तशा त्याही रडू लागल्या. त्यांना किती सवय होती हो एकमेकींची.
आता धीर एकवटून माझा नवरा पुढे झाला. माझं मनगट धरलं "कुठे चाललीस गं मला एकट्याला सोडून? काही वाटतं का? कुठेही नाही जायचं ! काय समजलीस?"
मी म्हटलं "बरं !" मला तरी कुठे जायचं होतं हो ? पण हे शब्द त्याच्या तोंडून यायला हवे होते की नाही?
दादा चहा पिऊन आनंदाने ड्यूटीवर परतला. मुली मला बिलगल्या. माझे मुके घेतले. गळ्यात हात टाकले. मुलांनाही किती समजतं ना !
त्या रात्री आम्ही चौघं मुली झोपल्यावर एकत्र बसलो. कौटुंबिक सभा. माझे सासरे-बापू म्हणाले, मला. "हे पहा, विजय हा आमचा एकुलता एक मुलगा आहे त्यामुळे आम्ही नि तो, इनसेपरेबल आहोत. वेगळं राहायचा विचार मनातही आणू नकोस तू. तो मातृ-पितृ भक्त आहे.
आता एकत्र राहायचं तर वाद कधी तरी होणारच. ती 'सूड सूड' काय म्हणत होती ते मला ठाऊक नाही. जाणून घ्यायचीही इच्छा नाही. एकच सांगतो आपण सर्वांनी वाद झाले तर भांडू पण दुसऱ्या दिवशी ते भांडण उकरुन काढायचे नाही. नवा दिवस नवा उजाडला पाहिजे. आलं लक्षात? रात गयी... बात गयी !"
ते तत्त्व आम्ही चौघांनी आयुष्यभर सांभाळलं. माझं 'पुस्तक' लाज न बाळगता तुमच्यासमोर एवढ्यासाठी उघडलं प्रिय वाचकांनो, की तुमचे संसार टिकावेत. छोटी छोटी बातोंमे इतना दम नही होता की घर टूट जाए ! खरं ना ?
©डॉ. विजया वाड
~संकलन
संग्रही असावं असं पत्र
हे पत्र प.पू. बाबा बेलस-यांनी साधकांसाठी लिहिलेले शेवटचे पत्र म्हणता येईल. अतिशय उपयोगी ठरेल असे हे पत्र आहे.
||श्रीराम||
आणखी चार महिन्यांनी मी ९० व्या वर्षात पदार्पण करणार आहे. मला माझ्या चौथ्या वर्षापासून स्पष्ट स्मृती आहे. मी या ८५ वर्षात जे शिकलो ते प्रत्येकाला उपयोगी पडेल म्हणून सांगतो.
१) आपल्या जीवनाचा जसा आरंभ होतो, तसा त्याचा शेवट कधीच होत नाही. कारण सगळेच कल्पनेबाहेर बदलते. परिस्थिती पण बदलते. माणसे बदलतात. इतकेच नव्हे तर आपले शरीर आणि मन देखील बदलून जाते.
२) जीवन म्हणजे एक गूढ प्रवास आहे. आपण कोठून या जगात आलो, कोणी पाठवले हे आपल्याला कळत नाही. तसेच हे जग कशा परिस्थितीत सोडायचे, कोठे सोडायचे, कशा अवस्थेत सोडायचे हे आपल्याला ठाऊक नाही. बरे! जग सोडल्यावर आपण कुठे जातो, आपल्याला कोण भेटतात, त्यांच्या सहवासात किती काळ राहायचे हे माहीत नाही. एकूण जीवनाचा आरंभ अज्ञानात होऊन त्याचा अंत देखील अज्ञानात घडून येतो.
३) आपण आपल्या इच्छा तृप्त करण्याचा जन्मभर सतत प्रयत्न करतो; परंतु ते घडवून आणण्याची शक्ती आपल्या अंगात नसते. पुढे जे घडून यावे असे वाटते, त्याची उपाय रचना आपण सतत करतो. पण आपले उपाय दृश्यावर म्हणजे समकालीन माणसांच्यावर आणि घटनांवर अवलंबून असतात, त्यामुळे प्रत्यक्षात जे घडून येते, ते आपल्या मनाच्या उलट किंवा मनासारखे घडलेच तरी त्याने मनाचे समाधान होत नाही.
४) यावरून मी असे शिकलो की मानवी जीवन माणसाने ठरविलेल्या सिद्धांताप्रमाणे चालत नाही. ते आगगाडीच्या रूळाप्रमाणे ठरलेले नाही. ते एखाद्या समुद्राकडे धावणा-या नदीसारखे आहे. कोणाच्या वाट्याला काय प्रसंग येईल हे कोणास सांगता येत नाही.
५) आपल्या मनासारखे व्हावे असे तर वाटते आणि तसे घडेल याची खात्रीही नसते. म्हणून प्रत्यक्ष जीवन जगताना मनाला एक प्रकारची अस्वस्थता, काळजी, भीती आणि असुरक्षितता व्यापून राहते. त्यातून मोकळे होण्यास अज्ञाताची कास धरल्या वाचून गत्यंतर उरत नाही. अज्ञात दोन प्रकारचे आहे. १. विश्वाला चालवणारी प्रचंड शक्ती आणि २. ती शक्ती ज्या व्यक्तीमध्ये प्रत्यक्ष अवतरते त्याचा सहवास.
६) विश्वाला चालविणा-या अज्ञात शक्तीला नियती असे म्हणतात. नियतीला संत प्रारब्ध असे म्हणतात. नियतीवर पूर्ण श्रद्धा ठेवून जीवन जगणे सामान्य माणसाला फार कठीण जाते. नियती आपल्या जीवनात काय उलटापालट करील याचा अंदाज कोणालाच करता येणार नाही.
७) म्हणून ज्या व्यक्तीमध्ये विश्वशक्ती साकार होते, अशा सद्गुरूंना मनात घट्ट धरणे हा जीवनातील काळजी, भीती आणि असुरक्षितता नाहीशी करण्याचा रामबाण उपाय आहे. हे मी जीवनात अत्यंत स्पष्टपणे शिकलो.
८) संताला मनाने घट्ट धरणे म्हणजे त्याला आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाचे स्थान देणे. मी शरीराने व्यवहारात वागत असताना "मी त्यांचा आहे" असे म्हणून त्याचे सतत स्मरण बाळगणे ही संतांचे झाल्याची खरी खूण आहे. आपल्याला अज्ञाताची इच्छा काय आहे ते कळत नाही, म्हणून आपल्या इच्छेमध्ये आणि त्यांच्या इच्छेमध्ये संघर्ष येतो. तो नाहीसा व्हावा यासाठी आपण आपली इच्छा त्यांच्या इच्छेमध्ये विलीन करण्याचा अभ्यास करावा. या अभ्यासालाच नामस्मरण असे संत म्हणतात. म्हणून नामस्मरणाने माणसाचे जीवन अज्ञाताने भरून जाते. एकदा ते भरले की मग कोणत्याही परिस्थितीत माणसाचे समाधान भंगणार नाही असा अनुभव येतो. यासाठी माझ्या शेवटच्या दिवसात मी सगळे सोडून नामस्मरण करतो.
के. व्ही. बेलसरे
१४/०९/१९९७
~संकलन
Thursday, 9 July 2020
पुस्तक परिचय-चरित्रं अशी घडतात
कर्तृत्वाशिवाय व्यक्तीला मोठेपण प्राप्त होत नाही आणि मोठेपण सहज प्राप्त होते का तर निश्चितच नाही. माणसं मोठी होतात ती कर्तृत्वाने आणि थोड्या मोठ्या व्यक्तींच्या चरित्र वाचनाने. समाजातील काही माणसं अशी असतात ज्यांच्या आचरणातून आपल्याला एक प्रेरणा मिळते आणि ते आपल्याला एक दिशा देतात.
प्रा.मिलिंद जोशी यांचं 'चरित्रं अशी घडतात' हे पुस्तक म्हणजे अशाच प्रेरणादायी चरित्रांचा संग्रह या पुस्तकात इतिहास पुत्र शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, मृत्युंजयकार शिवाजी सावंत,ऋषितुल्य दार्शनिक-प्राचार्य शिवाजीराव भोसले, मतिमंद मुलांची माता-सिंधूताई जोशी, द्रष्टा शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर, आनंदवनातील 'अभय साधक' बाबा आमटे, परमसंगणकाचे जनक डॉ. विजय भटकर, संकटावर स्वार होणारे चैतन्य नसीमा हुरजूक, विज्ञानातील ध्रुव जयंत नारळीकर, समाजभूषण अण्णा हजारे,अनाथांची माय सिंधुताई सपकाळ, महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव डॉ. विश्वास मेहेंदळे, उद्योजकातील अग्रणी डी.एस.कुलकर्णी आणि भारतीयांच्या हृदयाचे स्पंदन मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर यासारख्या अनेक चरित्रांचा त्यांनी वेध घेतला आहे जो आपल्याला देखील प्रेरित करतो.
प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी या पुस्तकात ज्या थोर व्यक्तींचा समावेश केला आहे त्या चरित्राबद्दल वाचताना पुढचं वाक्य काय आहे याची उत्सुकता मनाला लागून राहते.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना त्यांनी 'इतिहास पुत्र' असे म्हटले आहे. बाबासाहेबांविषयी ते लिहितात - माणसे इतिहास घडवतात आणि ती गेल्यानंतर इतिहास त्यांची नोंद घेत असतो. इतिहासाला साक्षी ठेवून वर्तमानाचा विचार करीत भविष्याचे वेध घेता येतात.' शिवाजी' हा तीन अक्षरी मंत्र ज्यांनी उभं आयुष्य जपला आणि महाराष्ट्राला शिवचरित्राची मोहिनी घातली ते बळवंत मोरेश्वर तथा बाबासाहेब पुरंदरे हे इतिहासपुत्रच आहेत असे म्हणावे लागेल. मॅट्रिकला बाबासाहेब दोनदा अनुत्तीर्ण झाले. कारण गणित या विषयाशी त्यांच आत्यंतिक वैर होतं. बाबासाहेब गणितात नापास झाले तेव्हा त्यांना वडिलांसमोर जाताना खूप भीती वाटत होती त्यांचे वडील त्यांना म्हणाले "बाबासाहेब बेचैन जगा आणि चैनीत मरा." बाबासाहेबांनी वडिलांचे शब्द ऐकले मात्र आणि ते झपाटल्यासारखे कामाला लागले. पुढच्या परीक्षेत मॅट्रिक पास झाले. या मुलाने पुढे काय केले असेल? आठवल्यांचा Algebra आणि आगाश्यांची Geometry ही दोन पुस्तकं घरी येऊन काढली, पिशवीत घातली, खडकवासल्याला गेले आणि पाण्यात टाकली. या मुलाला एकच भीती वाटत होती- तुकारामांची गाथा जशी वर आली तशी ही पुस्तकं वर येतील की काय? क्रमिक पुस्तकातील धड्यांपेक्षा वडिलांनी शिकवलेला धडा बाबासाहेबांनी गिरवायला सुरुवात केली. शिवचरित्राचे वेध बालवयातच या मुलाला जडले व भिनले. याबाबतीत त्यांचे गुरू होते प्रत्यक्ष त्यांचे वडीलच. कधी पायी, कधी रेल्वेने, कधी जलमार्गाने, कधी विमानाने तर कधी अगदी बैलगाडी पासून ते घोडेस्वारी पर्यंत मिळेल त्या वाहनाने लक्षावधी मैलांचा प्रवास केला. वयाच्या सहाव्या वर्षापासून ऐतिहासिक किल्ले, वाडे, महाल, मंदिरे वगैरे पाहण्यास वडिलांबरोबर प्रारंभ झाला होता. रात्र-रात्र जागरणं करून इतिहासाची दप्तरं चाळली. अवघं आयुष्य शिवचरित्रासाठी वाहून घेतलं आणि 'जाणता राजा' महानाट्य साकारलं.
मित्रांनो शिवमंत्राचा घोष करणाऱ्या या साधकाच्या सहवासात ज्यांनी आयुष्यातले काही क्षण घालविले त्यांच्या भाग्याचा इतरांना हेवा वाटला नाही तर नवलच म्हणावे लागेल.
मित्रांनो 'चरित्रं अशी घडतात' या पुस्तकातील दुसरं महान व्यक्तिमत्व म्हणजे युगंधर साहित्यिक शिवाजी सावंत. विश्वसमृद्धीसाठी कर्तृत्वसंपन्न पुरुषांना जन्माला घालण्याचं भाग्य काही नगरांना लाभते इथल्या मातीत एक वेगळे सत्त्व असते या सत्वामुळे प्रतिभावंतांची प्रतिभा फुलून येते. विचारवंतांच्या विचारांना नवे कोंदण प्राप्त होते. समाजसुधारकांच्या कार्याला निस्पृहतेचा गंध प्राप्त होतो. या मातीतून उदयास आलेली माणसं काल पटलावर स्वतःचा वेगळा ठसा उमटवून जातात. कोल्हापूर जिल्ह्यातील 'आजरा' या गावाने असंच एक प्रतिभासंपन्न लेणं महाराष्ट्राला दिलं त्याचं नाव शिवाजी सावंत. 'मृत्युंजय'कार शिवाजीराव सावंत या नावाने सारं जग त्यांना ओळखतं.
लहानपणापासूनच हा मुलगा लेखक होण्याचं स्वप्न उराशी बाळगून होता. घरातील वातावरण फारसं पोषक नव्हतं पण परिश्रमाच्या बळावरती पुढे जाण्याची ताकद या मुलात होती. कष्ट केल्याशिवाय यश पदरात पडणार नाही हा धडा परिस्थिती समजावून देत होती म्हणून तशी मनस्थिती याने तयार केली.
नववीत शिकत असताना शिवाजीरावांच्या आयुष्यात एक घटना घडली होती. त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी शि.म.परांजपे लिखित 'अंगराज कर्ण' ही एकांकिका स्नेहसंमेलनासाठी बसवली होती. राजबिंडं रुप आणि स्पष्ट शब्दोच्चार यामुळे श्रीकृष्णाची भूमिका शिवाजीरावांना मिळाली. त्यांच्या या भूमिकेला विशेष दादही मिळाली, पण श्रीकृष्णापेक्षाही कर्णाने फेकलेले संवाद त्यांना अस्वस्थ, अंतर्मुख करणारे होते. कारण ते तर्कशुद्ध आणि सडेतोड होते. रथचक्र उद्धरणाच्या वेळी कर्णाने फेकलेले प्रत्येक वाक्य त्यांच्या मनात बाणाप्रमाणे रुतले. कर्ण हा त्यांच्या चिंतनाचा विषय झाला आणि 'मृत्युंजय' या अजरामर कादंबरीचे बीज त्यांच्या मनात रूजले. त्यांच्या वाचनात,मनात आणि चिंतनात फक्त आणि फक्त कर्णच होता. 1963 झाली त्यांनी प्रत्यक्ष लेखनाला प्रारंभ केला आणि पुढे गणेश चतुर्थीला ग.दि.मां.च्या हस्ते पूजन झाले आणि 1967 साली अतिशय सुबक व देखण्या स्वरुपात साध्या घरगुती पूजनानंतर 'मृत्युंजय' प्रसिद्ध झाली. बघता बघता लोकांनी'मृत्युंजय' उचलून धरली लोकमान्यता आणि लोकप्रियता या दोन्ही कसोट्यांवर ही कादंबरी उतरली होती. जनमान्यता आणि अफाट लोकप्रियतेचे सर्व विक्रम या कादंबरीने मोडले तेव्हा शिवाजीराव फक्त 26 वर्षांचे होते.
मित्रांनो,अशाप्रकारे प्रत्येक चरित्राचा सांगोपांग विचार या पुस्तकात लेखकाने केला आहे एका महान व्यक्तिमत्त्वाविषयी,एका वक्त्याविषयी लेखक लिहितात-
ऋषितुल्य दार्शनिक, वैखरीचा स्वामी म्हणजे प्राचार्य शिवाजीराव भोसले. आत्मचिंतन करणारा एक प्राध्यापक, योगमय जीवन जगणारा एक साधक आणि उभ्या महाराष्ट्राला प्रबोधनाचा प्रकाश दाखवणारा लोकशिक्षक अशी ज्यांच्या व्यक्तिमत्वाची रुपं आहेत असा एक तत्वनिष्ठ वक्ता या महाराष्ट्राने पाहिला त्यांचं नाव प्राचार्य शिवाजीराव भोसले.
'बंधू-भगिनींनो', हे शब्द ऐकताच सारे सभागृह स्तब्ध होत असे आणि सारे श्रोते जिवाचा कान करून पांढरी पॅंट, पांढरा शर्ट आणि काळा कोट परिधान करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाकडे एकाग्रतेने पाहत आणि प्राचार्य शब्दसामर्थ्याच्या जोरावर त्यांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जात. एका संथ लयीत, आवाजात चढउतार न करता हे व्याख्यान होत असे पण, विचारांचा आणि शब्दांचा अक्षरशः पाऊस पडत असे. हा लोकशिक्षक एका शिक्षकाच्या घरी जन्माला यावा हादेखील योगायोगच म्हणावा लागेल.
मित्रांनो काही माणसांचे जीवन ही आनंदयात्रा असते पण काहीचं जीवन हे संघर्षाची मालिका असते. या संघर्ष मालिकेतही आपल्या कर्तृत्वाचे तेजस्वी दीप तेवत ठेवण्याचे भाग्य काहींना लाभते. स्वतः वैयक्तिक जीवनातला हिशेब न मांडता ज्यांनी आपलं उभं आयुष्य वेचलं त्या सिंधुताई जोशींना 'मतिमंद मुलांची माता' असे म्हणतात. या मातेने या मुलांसाठी एक आधारवड 'कामायनी' या संस्थेच्या रूपाने उभा केला. अनेक मान्यवरांनी सिंधुताईंच्या 'कामायनी' ला भेट देऊन त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. मदर तेरेसांचे पाय या संस्थेला लागले. ती जगन्माता या मातेला म्हणाली,"God bless you all."
दोस्तांनो, ही चरित्रं घडत असतांना त्यांच्या जीवनातील यातना,वेदना,भावना आणि प्रेरणा ही चतु:सूत्री प्रस्तुत पुस्तकात लेखकानं नोंदलेली आहेत. या पुस्तकातील प्रत्येक बारीकसारीक गोष्टी लेखकाने इतक्या चांगल्या रीतीने लिहिल्या आहेत की प्रत्येक चरित्र वाचताना लेखक जणू काय त्या कुटुंबातील सदस्य आहे की काय असं आपल्याला वाटल्याशिवाय राहत नाही.
द्रष्टा शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्या बद्दल लेखक लिहितात-
डॉ.रघुनाथ माशेलकर, भारतातील शास्त्रज्ञांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, उद्योजक, व्यावसायिकांना संशोधन, उत्पादनासाठी नवी दिशा देऊन, त्याचे फायदे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणारं, भारतीयांमधील बौद्धिक मरगळ झटकून, त्यांना विज्ञान-तंत्रज्ञानासह सर्व क्षेत्रात जागतिक नकाशावर दुर्दम्य आत्मविश्वास देणारं प्रतिभाशाली नेतृत्व आहे.
मित्रांनो,या पुस्तकातील प्रत्येक चरित्र हे त्या-त्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडत जाते. कुष्ठरोग्यांचं अंधारुन आलेलं जीवन प्रकाशमान व्हावं यासाठी ईश्वराने मानव सेवेचे व्रत घेतलेला एक तेजस्वी दीप भारतीयांच्या साम्राज्यात निर्माण केला तो मुरलीधर देविदास आमटे अर्थात बाबा आमटे यांच्या रुपाने.
या पुस्तकात प्रा.मिलिंद जोशी यांनी बाबा आमटे यांना 'आनंदवनातील अभय साधक'असे संबोधले आहे. बाबा म्हणत," आनंदवन हे कुष्ठरोग्यांच्या केंद्र नाही तर माणसाला माणूस म्हणून जगवण्याचे ते केंद्र आहे." आपल्या आयुष्याबद्दल ते लिहितात-
"मी किरणांचीच अपेक्षा धरली होती माझ्या अंगणात सूर्य उगवले...
आज पुन: एक नवे क्षितिज मी ओलांडले आहे
आणि नवे तारे मला खुणावू लागले आहेत."
मित्रांनो कर्तृत्वाचे मोजमाप करताना हिमालयाशी तुलना केली जाते पण हिमालयाचे देखील गर्वहरण व्हावे इतके अफाट काम बाबांनी करून दाखविले. महाराष्ट्र शासनाने त्यांना 'महाराष्ट्रभूषण' हा सन्मान दिला. पण बाबांसारखी माणसं 'विश्वभुषण' असतात असं लेखक लिहितात.
मित्रांनो आपल्याला माहीतच आहे 1988 साली भारताने स्वदेशी बनावटीचा पहिला महासंगणक तयार केला. त्याचे जनक होते
डॉ. विजय भटकर. हा तरुण शास्त्रज्ञ सभा- समारंभातून आवाहन करून सज्जनांना सांगे, "आपल्याकडे क्षमता आहे आपण ती सिद्ध केली पाहिजे. मात्र संपूर्ण देशात ही क्षमता विकसित करण्यासाठी मुलांना योग्य वयात उत्तम शिक्षण मिळाले पाहिजे. संगणकाच्या साहाय्याने साक्षरता मोहीम गतिमान करता येऊ शकते." मित्रांनो संगणकाच्या भाषेत सांगायचे झाले तर-
"मूर्ती किलोबाइटस् पण कीर्ती टेराबाईटस् " असंच या शास्त्रज्ञाबद्दल म्हणावे लागेल.
मित्रांनो ईश्वराने जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाला प्रतिभेचं अलौकिक देणं दिलेलं आहे. कधी ती प्रतिभा कवितेतून प्रकट होते. कधी गायनातून तिचे दर्शन घडते. कधी गृहिणीच्या स्वयंपाकातून ती डोकावते. एखाद्या चित्रकाराच्या रंगरेषातून तिचा साक्षात्कार होतो, नर्तकीच्या पदलालित्यातून तिचे नवे रूप प्रत्ययाला येते, तर कधी खेळाडूच्या अलौकिक खेळातून ती बहरताना दिसते.
इंग्लंड ही क्रिकेटची पंढरी आहे असे म्हटले तर भारत ही क्रिकेटची आळंदी आहे असे म्हणावे लागेल. पंढरीतल्या परब्रम्हालादेखील भक्तांच्यासाठी या आळंदीत प्रकट व्हावे लागते. खेळ म्हणून एखाद्या खेळाकडे पाहणारे खूप प्रेक्षक असतात, पण खेळावर जिवापाड प्रेम आणि भक्ती करणारे प्रेक्षक मात्र क्रिकेटच्या या आळंदीतच सापडतील. लौकिक अर्थाने कोणतीही पदवी नसलेल्या सचिनचा चेंडू गगनाला भिडतो आणि अवघ्या भारत वर्षात आनंदाची, चैतन्याची लाट उसळते. हे घडते कसे? भारतीयांच्या हृदयाचे स्पंदन असलेली ही वामनमूर्ती कशी घडली असेल? त्याची वैशिष्ट्ये कोणती? यासारख्या प्रश्नांची उत्तरे आणि इतर चरित्रांवरील माहिती जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल. होय ना?
या जगात जी माणसं स्वकर्तृत्वावर मोठी झाली त्यांचा जीवनप्रवास खडतर होता. संघर्षाच्या आणि संकटांच्या मालिका त्यांच्या स्वागतासाठी उभ्या होत्या.नियती त्यांची सत्वपरीक्षा घेत होती तरीही मोडून न पडता ही माणसं संकटांवर स्वार झाली. जीवनाबद्दलची निष्ठा, प्रचंड ध्येयवाद, दुर्दम्य इच्छाशक्ती,अथक परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोनाच्या बळावर त्यांनी मोठी झेप घेतली म्हणून त्यांचा जीवन ग्रंथ समृद्ध आणि संपन्न झाला इतरांसाठी प्रेरणादायी ठरला.
मित्रांनो या पुस्तकाचे वाचन करताना तुमच्याही मनात आकांक्षा निर्माण होतील आणि स्वतःचे एक कर्तृत्वशिखर खुणावू लागेल. तर मग प्रा.मिलिंद जोशी यांचं 'चरित्रं अशी घडतात' हे पुस्तक नक्की वाचा. शुभेच्छा.भेटुया.
Tuesday, 7 July 2020
अभ्यास तंत्र आणि मंत्र- नरेंद्र भावे
➤अभ्यास तंत्र आणि मंत्र -नरेंद्र भावे
➤भाग-1 अभ्यास तंत्र आणि मंत्र -नरेंद्र भावे
➤भाग-2 अभ्यास तंत्र आणि मंत्र-नरेंद्र भावे
➤भाग -3 अभ्यास तंत्र आणि मंत्र- नरेंद्र भावे
➤भाग-4 अभ्यास तंत्र आणि मंत्र- नरेंद्र भावे
➤भाग-5 अभ्यास तंत्र आणि मंत्र- नरेंद्र भावे
➤भाग-6 अभ्यास तंत्र आणि मंत्र- नरेंद्र भावे
➤भाग-7 अभ्यास तंत्र आणि मंत्र- नरेंद्र भावे
➤भाग-8 अभ्यास तंत्र आणि मंत्र- नरेंद्र भावे
Sunday, 5 July 2020
Tuesday, 16 June 2020
Monday, 15 June 2020
"कोणाचं घरटं मोडू नका."
"कोणाचं घरटं मोडू नका."
जयलक्ष्मी यांना हे दृष्य खूप आवडलं .त्यांना वाटायला लागलं आपल्या घराच्या बागेसाठी यातली दोन घरटी नेली ,तर बाग किती शोभून दिसेल.त्यांनी आपली इच्छा बोलून दाखवली.
गाड्या थांबल्या.त्यांच्यासाठी जे संरक्षक पोलीस दल होते ,ते इकडे तिकडे शोधायला लागले.तिथे एक मुलगा गुरं चरायला आला होता.त्याला बोलावलं.तो सरकारी इतमाम पाहून कोणीतरी मोठी अधिकारी व्यक्ति आलीय ,हे त्यानी ओळखलंच.त्यांनी मुलाला दोन घरटी काढून आणायला सांगितली ,आणि प्रत्येक घरट्याचे १० रु.देऊ असंही सांगितलं.त्या मुलानं खाली मान घालून नकारार्थी मान हलवली. "दहा रुपये कमी वाटतायंत का ,५०रुपये देऊ प्रत्येक घरट्याचे."
यावर तो मुलगा म्हणाला ,"सरजी,पैशाचा सवालच नाहीए .कितीही पैसे दिलेत तरी ती घरटी मी झाडावरून उतरवणार नाही."
"का रे बाबा?"
"त्यात पक्ष्याची पिल्लं शांतपणे आणि विश्वासानी झोपली आहेत.सायंकाळी त्यांची आई चोचीत दाणे घेऊन पिल्लांच्या ओढीनं येईल ,पिल्लं सापडली नाहीत तर ती सैरभैर होईल ,आक्रोश करेल,ते माझ्याच्यानं पाहवणार नाही.कोणाचं घर मोडायचं पाप आहे ना सर जी."
हे ऐकून शेषन् व त्यांची पत्नी थक्क झाले.
शेषन् म्हणाले ,"कोणीतरी डोळ्यात अंजन घातल्यासारखं वाटलं.माझं पद ,माझी पदवी ,उच्च शिक्षण सार्या सार्याचा अभिमान क्षणार्धात गळून पडला ,वितळून गेला.जे शिक्षण , संस्कृती आणि संस्कार या मुलानं निसर्गाकडून शिकलेत.ते शिक्षण कोणत्याच विद्यापीठात मिळणार नाही.".
~संकलन
Sunday, 14 June 2020
आनंदाची गोड बातमी....
आनंदाची गोड बातमी....
तिसऱ्या फडताळामधील खालच्या कप्प्यातील साखरेवर पहिल्या फडताळामधील वरच्या कप्प्यातील रव्याची नजर होती...रवा सारखा सारखा खाली वाकून वाकून साखरेकडे पहायचा...मधल्या फडताळामधील मधल्या कप्प्यातील साजुक तूपाला ही भानगड़ माहित होती...रव्याचे हे साखरेवर लाइन मारन बघून तूप गालातल्या गालात मिश्किलपणे हसत होते.....
ते तूप रव्याच्या सारखे मागे लागायचे की तू धाडस कर आणि साखरेला मागणी घाल, पण रव्याची काही हिम्मत व्हायची नाही...
साखरेचा खर तर होकार होता पण ती रव्याच्या विचारण्याची वाट पाहत होती..
एक दिवस रवा, तूप आणि साखर खाली किचनपाशी आले...तूप रव्याला चिथावून साखरेला प्रपोज करण्यासाठी मागे लागले होते, पण रवा काही धजावेना..
बाजुलाच कढ़ईची वेदिका तयार होती....अग्निकुंड पेटलेले होतेच....तूपाने रागात त्या अग्निकुंडावरच्या कढ़ई उड़ी घेतली....ते आता रागाने चांगलेच उन उन झाले होते... त्याने रव्याला आपल्या जवळ खेचले आणि त्याची खरड़पट्टी काढायला सुरुवात केली....त्याला असा उभा आडवा करत त्याचा चांगला ब्रेन वॉश केला...आणि त्याला साखरेला मागणी घालण्यास तयार केले...रवा आणि तुप या दोघांच्या झटापटीची वार्ता खमंग वासाने सर्वदूर पसरवली होती...
रव्याने मग जरा हिम्मत करुन कढईतून हलकेच वर डोके बाहेर काढत घाबरत जरा दबक्या आवाजात वाटीतल्या साखरेला मागणी घातली.....रव्याच्या सुवासिक खमंग सुगंधाने साखरेला भुरळ पाडली व वाटीतल्या वाटीत कडेकडेने लाजत साख़रेने होकार दिला....तिचा होकार समजला तसा रवा लाजून लाजुन पार गुलाबी लालसर झाला...
उगाच नंतर विचार बदलायला नको म्हणून रवा आणि साखरेचा लगोलग तिथेच लग्नाचा घाट घातला गेला...पण त्यात पुन्हा विघ्न आले...बाजूलाच का कुणास ठाऊक तापलेले पाणी त्याला विरोध करत खदखदायला लागले....त्याने कढ़ईत उड़ी घेत रव्याशी दोन हात करायला सुरुवात केली....तापलेल्या दुधाने थोड़ी मध्यस्ती करायचा प्रयत्न केला ....पण पाण्याचा फार काळ निभाव लागला नाही...पाचच मिनिटात पाणी धारातीर्थी पडले...
या विजयामुळे रव्याच्या अंगावर मुठभर मांस चढल....विजयाने त्याचा उर भरून आला.
मग साखरेने अलगद कढ़ईत प्रवेश केला.... रव्याचे आणि साखरेचे लग्न लागू लागले....विलायची पावडरच्या अक्षदा टाकण्यात आल्या; या आनंदाच्या भरात कापलेल्या बदामाच्या कापांची, काजूंची, मनुक्यांची मनसोक्त उधळण करण्यात आली....आणि रव्याचे अन साखरेचे लग्न लागले....साखर लाजत मुरडत अलगद रव्यात सामावून गेली... रवा आणि साखर अखेर एकरूप झाले...
पै पाहुणे डबे, चमचे, चिमटे, चाकू ई आपापल्या घरी निघाले...अग्निकुंड ही थंडावले होते...
झाकण नावाचा दरवाजा लावून रवा आणि साखर आपल्या विश्वात एकांतात रममाण झाले....
मिनिटा मागून मिनिटे निघून जात होती...
रवा आणि साखर आपल्या संसारात मस्त होते आणि ....तो क्षण आला....
दरवळणाऱ्या साजुक तुपाने आपल्या सुवासिक सुगंधाने घरभर रवा आणि साखरेकड़े आनंदाची गोड बातमी आहे अशी वर्दी दिली...मग क़ाय घरभर उत्साह पसरला...सर्वत्र आनंदी आनंद झाला... जो तो उत्सुकतेने वाट पाहू लागला.....
आणि बरोबर नऊ मिनिट आणि नऊ सेकंदाला त्यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला त्याच नाव....
शिरा.....
शिरा भक्त प्रसाद.
~संकलन
💐🌹🙏🏻🙌🏻🌹😍😀🤑😀😀😀
Friday, 12 June 2020
“दोष हा कुणाचा?”
एका हाॅटेलमध्ये जेवायला गेलो होतो. शेजारच्या टेबलावर चार मुली बसल्या होत्या. त्यांचं जेवण आटोपलं, वेटर ने बडीशेपचा बाऊल समोर ठेवला. चारही मुलींनी टिश्यू पेपरमध्ये बचकभर बडीशेप भरून घेतली आणि ती पुरचुंडी पर्समध्ये टाकली. आजूबाजूच्या १०० माणसांमध्ये असूनही आणि चांगल्या कुटुंबातल्या असूनही असं करताना त्यांना काहीही वाटलं नाही.
अनेक काॅलेजवयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींना मी हाॅटेल्समधून चमचे चोरतानाही पाहिलं आहे. विमानातून प्रवास करताना काही मंडळी अक्षरश: ओंजळी भरभरून चाॅकलेट्स किंवा टाॅफीज् घेतात. काही रेल्वे प्रवासात पाण्याच्या बाटल्या प्रवाशांना दिल्या जातात. अनेकजण दोन-दोन किंवा तीन-तीन बाटल्या सुद्धा घेतात. रेल्वे प्रवासात (केवळ त्या प्रवासापुरतेच मिळणारे) टर्किश नॅपकिन्स सर्रास बॅगेत भरतात. साॅस किंवा साखरेची ट्रॅव्हलिंग पाऊचेस न विचारता उचलणे, टीबॅग्ज उचलणे, टिश्यू पेपर्सचा गठ्ठाच उचलणे हे प्रकार माणसं अगदी बिनधास्त करतात.
एकदा एका ट्रेक ला गेलो होतो आणि एका रिसाॅर्टवर राहिलो. तिथं आलेल्या एकानं शॅम्पूचे सॅशे आणि साबणाच्या छोट्या वड्यांचा बाॅक्सच उचलून नेला. एका सुशिक्षित, जाणत्या बाईंनी लाॅबीमध्ये सहज म्हणून वाचण्याकरिता ठेवलेली दोन मॅगेझिन्स उचलली आणि पर्समध्ये घातली. हा प्रकार आजूबाजूची माणसं, हाॅटेल व्यवस्थापनातले कर्मचारी पाहत होते. पण कुणी काही विरोध केला नाही.
घराजवळच्या हाॅट चिप्स च्या दुकानात गेलो होतो. दोन मुली आल्या. त्यांनी सात-आठ प्रकारचे वेफर्स टेस्ट करून पाहिले आणि काहीही खरेदी न करता निघून गेल्या. दुकानाचा मालक म्हणाला, “ऐसे तो बहोत लोग आतें हैं , सब के सब पढें-लिखे और अच्छे घर के ही होतें हैं । पता नहीं, ऐसा क्यूॅं करतें हैं?”
रस्त्यावरच्या एखाद्या फळविक्रेत्याकडे गेलात आणि फळं खरेदी करायची असतील तर एखादं फळ चवीपुरतं चाखायला देतो. काहीजण स्वत:च हात पुढं करून सात-आठ फळं तर उभ्या-उभ्या सहजच मटकावतात. चणे विक्रेते किंवा चुरमुऱ्यांची भट्टी चालवणाऱ्यांना तर हा अनुभव दररोज शंभरदा येत असेल. माणसं अगदी स्वत:चा हक्क असल्यासारखा हात घालतात.
मंडईत गेलो होतो. कैऱ्या विकणाऱ्या एका वयस्कर विक्रेतीसमोर एक काकू उभ्या राहिल्या. विक्रेतीनं भाव सांगितला आणि कैरीची एक फोड कापून त्यांच्या हातावर ठेवली. कैरीची फोड खात-खात काकू एक अक्षरही न बोलता निघून गेल्या. आम्ही दोघेही शेजारीच उभे होतो. तो प्रसंग पाहून आम्हालाच कसंतरी झालं.
चांगली शिकली-सवरलेली माणसं अशी का वागत असतील? आपण परदेशातल्या लोकांकडून त्यांची भाषा, राहणीमान, कपडे, फॅशन्स हे सगळं घेतलं पण सार्वजनिक आयुष्यात ती माणसं किती संतुलितपणे वागतात,हे आपण नाही स्वीकारत..!
कॅरीबॅगसाठी दुकानदारांशी हुज्जत घालणारी सुशिक्षित जनता मी पाहतो, तेव्हा मला त्यांच्या सुशिक्षितपणाचाच अर्थ लागत नाही. नुसतंच बाह्यरूप पाॅश करून आपण सुशिक्षित असल्याचा आभास निर्माण करत राहण्याच्याच कृत्रिम देखाव्याच्या चक्रात माणसं अडकली आहेत का?
हा बिनबुडाचा सुशिक्षितपणा केवळ अशा चोऱ्या-माऱ्या आणि उचलाउचलीचे उद्योग करून थांबत नाही. उघडपणे सामाजिक नियम मोडण्यातही हा वर्ग आघाडीवर आहे.
पेट्रोलपंपावर मोबाईल फोनवर गप्पा मारणे, एटीएम सेंटरमध्ये गाॅगल्स, स्कार्फ किंवा टोपी घालून जाणे, सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर खुशाल धूम्रपान करणे, सार्वजनिक ठिकाणी भर रस्त्यात बिनदिक्कतपणे थुंकणे, या गोष्टी करून माणसं नक्की काय दाखवण्याचा प्रयत्न करत असतात?
नामवंत काॅलेजेसमध्ये शिकणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी पार्किंग आणि नो पार्किंगमधला फरकही ओळखू शकत नाहीत का? सुशिक्षित माणसं मुद्दामच झेब्रा क्राॅसिंगवरच का थांबतात? शिकली-सवरलेली माणसं बसस्टाॅप सोडून भर रस्त्यावर गर्दी करून बसची वाट का पाहतात? खिशात पैसे असूनही बस कंडक्टर ला फसवून विनातिकीट प्रवास का करतात?
लक्ष्मी रस्ता हा जसा बाजारपेठेचा रस्ता आहे तसं ते माणसांच्या अतरंगीपणाची लक्षणं पाहण्याचंही एक ठिकाण आहे. माणसं रस्त्यातच आपली भलीमोठी चारचाकी गाडी थांबवून दुकानासमोर उतरतात आणि ड्रायव्हर ती गाडी रस्त्यातच उभी करून , काचा वर करून, आतमध्ये एसी लावून बसलेला असतो. बाकीची वाहतूक कोलमडून जाऊन याच्या नावानं शंख करत असते, पण हा एकदम कूल..!
माणसं कुल्फी घेतील आणि काड्या रस्त्यावरच टाकतील. मक्याचं कणीस घेतील, उरलेला भाग रस्त्यावरच टाकतील. प्लास्टिकच्या ग्लासात काॅर्नभेळ घेतील, रिकामा ग्लास रस्त्यावरच टाकून मोकळे.. याच रस्त्यावर मोबाईल फोनवर बोलत रस्ता क्राॅस करणारे अनेकजण दिसतील. नो एण्ट्री तून वाहने चालवणारे अनेकजण दिसतील. ही सगळी मंडळी लौकिकार्थानं किमान ग्रॅज्युएट तरी निश्चित असतात. पण, सार्वजनिक ठिकाणी कसं वागावं आणि कसं वागू नये, असा कुठला पेपर त्यांच्या कोर्समध्ये नसतो, त्यामुळे त्या विषयाचा त्यांना गंध नसतो. त्यामुळे, सार्वजनिक जीवनात सगळे नापास!
अनेक ठिकाणी खाऊगल्ल्या आहेत, तिथले खाद्यपदार्थ विक्रेते संध्याकाळी व्यवसाय संपला की, सांडपाणी थेट रस्त्यावर टाकून देतात. त्यामुळे तो रस्ता अस्वच्छ, चिकट होतो, माशा घोंगावतात. पण सार्वजनिक ठिकाणचं त्यांचं हे वागणं आपण कुणीही मनावर घेत नाही.
भर रात्री बारा वाजता झोपलेल्या जगाला जागं करून वाढदिवस साजरा करणारा एक नवीन वर्ग तयार झाला आहे. ही मंडळीसुद्धा सुशिक्षित असतात. अनेकदा काॅलेजात शिकत असतात. पण, भर रात्री केकच्या दुकानाबाहेरच टोळकं जमवून ज्याचा वाढदिवस आहे अशा उत्सवमूर्तीच्या तोंडाला, डोक्याला येथेच्छ केक फासून, त्याला दारू पाजून लाथाबुक्क्यांनी बदडून काढणे, त्याच्या डोक्यात अंडी फोडणे असे प्रकार करतात. हे सगळं चांगलं वागणं आहे का? आणि एकविसाव्या शतकातल्या समाजाला हे शोभतं का?
ही मंडळी असं का वागतात, याला काहीही उत्तर नसतं.अशी कितीतरी लोकोत्तर व्यक्तिमत्त्वं आपल्याला ठायीठायी दिसतील. ही माणसं उघडपणे चोऱ्या करतात, गरिबांना नाडतात, त्यांना त्रास देतात, स्वत:च्या वागणुकीनं इतरांचं सार्वजनिक आयुष्यही पार खराब करून टाकतात.
आपण यावर कधी आक्षेप घेतला आहे का?
लोकांना दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसेल पण स्वत:च्या ताटातलं मुसळ दिसणार नाही.
गाय दूध देते तेव्हा ते चांगलंच असतं. पण, आपण ते नीट तापवलं नाही तर ते नासणारच. म्हणून, मग आपण गायीला दोष देणार का? तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं दही कळकलं तर दोष दह्याचा नसतो आणि भांड्याचाही नसतो, दोष दही तांब्याच्या भांड्यात ठेवणाऱ्याचा असतो.
आपण नेहमी प्रशासनाकडे, सरकारकडेच बोटं दाखवत राहू, आरोप करत राहू. सरकारकडून आपल्या अपेक्षा फार मोठ्या असतात, पण साध्या साध्या गोष्टी जपण्यातही आपण स्वत: कमी पडतो. स्वत:ला पारखलं आणि स्वत:च्या वागण्यातले दोष दूर करायचं ठरवलं तर प्रगतीला सुरूवात होईल..सगळं मळभ जाऊन आभाळ स्वच्छ होईल..!*
समाजाने स्वत: पुढाकार घेऊन या साध्या साध्या गोष्टी सुधारल्या तरी ‘अच्छे दिन’ नक्कीच येतील...!
।।जय सदगुरु।।
-संकलन
Sunday, 17 May 2020
Wednesday, 13 May 2020
। श्री।
"आशावाद..!! दुर्दम्य आशावाद..!"
सोशल मीडियावर हा फोटो आज व्हायरल झाला आहे. फोटो पाहताक्षणी काळजाला खोलवर स्पर्श करून गेला...!
आणि मग वाटलं..
'खरंच माणसाला जगण्यासाठी
काय हवं..?'
अशी कुठली गोष्ट आहे जी कुठल्याही परिस्थितीत जीवन जगण्यासाठी प्रेरणा देत असेल..?
अन्न, वस्त्र, निवारा.. होय लौकिक अर्थाने हेच आहे या प्रश्नाचं उत्तर..
पण फक्त एवढंच असेल काय..?
तर नाही..
"आशावाद.." Optimism.. हेच खरं तर याच उत्तर आहे..!
"माणसाची जगण्याची चिवट इच्छाशक्ती दिपवून टाकणारा आशावाद !" याला तुम्ही जिद्द म्हणा.. positivity म्हणा की आणखी काही..पण जोपर्यंत आपल्यात 'हा' जिवंत आहे तोपर्यंत सारं काही आलबेल आहे..!
खरं तर आपणच जगू की नाही ह्याचीच खात्री नसलेला हा मजूर, कामगार किंवा स्थलांतर करून पोट भरणारा माणूस..!
अशीच हजारो-लाखो माणसं आता घरी निघाली आहेत..! आणि अशा परिस्थितीत ४०-५० दिवसांनी वैगरे घरी जात असताना त्याने घेऊन काय जावं ? तर 'एक रोपटं'.. !!..
किती प्रचंड 'आशावाद' हा आणि त्याहून मोठं आभाळा एवढं मन..! स्वतःच्या जगण्याची ददात असताना जवळील रोपट्याला वाचवण्याचा हा खटाटोप म्हणजे फेसबुक आणि सोशल मेडियावर दिवसरात्र बसून 'ग्लोबल वाॅर्मिंगच्या' गप्पा हाणणाऱ्या, 'सो कॉल्ड बुद्धिजीव्यांना' मारलेली एक सणसणीत चपराक आहे..!
"स्वतः जगू, इतरांनाही जगवू" एवढं वैश्विक तत्वज्ञान सांगायला कुठल्याही युनिव्हर्सिटीमधला कोर्स करावा लागत नाही.. की कुठल्या अवजड पदव्या संपादन कराव्या लागत नाहीत.
लॉकडाऊनच्या या काळोख्या पोतडीत उद्या कोणा साठी काय आहे सांगता येत नाही..! पण जगणं-मरणं यापैकी काहीही समोर उभं राहिलं तरीही हा माणूस ते रोप वाचवेल.. वाढवेल असं वाटून गेलं...!!
म्हटलं तर अतिशय साधा फोटो.. म्हटलं तर प्रचंड काही सांगून जाणारा ! माणसाने सृष्टी वर आपला मालकी हक्क स्थापीत करून सृष्टीचा सर्वार्थाने नाश केला आहे..! सृष्टी केंद्रस्थानी फक्त माणूस आहे हा अहंकार माणसाला नडतो आहे. आणि त्याच काळात इवल्याश्या रोपाला घेऊन जाणं 'थोर' आहे. तसं बघितलं तर प्रवासात हे नारळाचं झाड ओझं आहे. सहज फेकून देऊ शकला असता; पण ते सोबत नेतोय..! माणसाने सृष्टी चा 'मालक' नाही तर 'पालक' म्हणून जगायला हवं.. हा संदेश देऊन जातं हे चित्र..!
हे चित्र माणुसपणावरचा विश्वास बळकट करणारं आहे..!
ह्या माणसाचा चेहरा दिसत नाहीये कारण तो तुमच्या- माझ्यात दडलेला कुणीही असू शकतो. हातात कुठलाही झेंडा धरण्यापेक्षा एक रोपटं धरून जाणं.. ह्या वाईट काळात ही एक अद्भूत कृती आहे...!"
संत ज्ञानेश्वर, गौतम बुद्ध,स्वामी विवेकानंद या सगळ्यांचे विचार.. शिकवण आपल्यांत किती खोलवर रुजले आहेत याची खात्री देणारं हे चित्र..!!
। ॐ सर्वे भवन्तु सुखिनः
सर्वे सन्तु निरामयाः ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा
कश्चिद्दुःखभाग्भवेत् ।
। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः।
या मंत्राची प्रचिती देणारं हे चित्र..! त्या अनामिका ला मनापासून सलाम !!
प्रत्येकाच्या मनातली ही 'हिरवळ' आणि त्यासाठी लागणारी 'ओल' अशीच कायम राहू देत हीच प्रार्थना !🙏
©अॅड.शीतल पाटील.
१३/०५/२०२०
चोपडा.
Friday, 24 April 2020
Sunday, 5 April 2020
Dear Students,
I am eagerly waiting for your responses. Stay home Stay Safe. Warm Regards. See you.
1 #1 English Test For 1st to 5th
2 #2 English Test for 1st to 5th
3 English Test For 5th/6th
4 English Test For 7th/8th (1)
5 English Test For 7th/8th (2)
Sunday, 29 March 2020
*****
-
पुस्तक-बोलगाणी (कविता संग्रह) कवी- मंगेश पाडगावकर प्रकाशन- मौज प्रकाशन प्रकाशक-संजय भागवत पुस्तक परिचय द्वारा -प्रसाद वैद्य नमस्कार दोस्...
-
Click Here to fill this form on the link👇 Admission Form (Live English Activity Std. 10th) SCAN THIS QR CODE FOR THIS FORM Click Here For A...
-
चोपडा सातपुड्याच्या कुशीत पहुडलेले, ऐतिहासिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, इ. अशी बहु मुखी ओळख असलेले अंकलेश्वर ते बुर्...