My YouTube Channel

Click here to visit My YouTube Channel

Monday, 22 March 2021

पुस्तक परिचय-महाराष्ट्रातील उद्योजक


पुस्तक- महाराष्ट्रातील उद्योजक 
लेखक - जयप्रकाश झेंडे 
प्रकाशन- डायमंड प्रकाशन  
पुस्तक परिचय द्वारा -प्रसाद वैद्य 

दोस्तहो नमस्कार,

दोस्तांनो जीवनाच्या वाटचालीत यशस्वी होण्यासाठी कोणत्या खऱ्या भांडवलाची, शिदोरीची आपल्याला नितांत गरज असते हे चपखल शब्दात सांगायचं झालं तर, 'मने, मनगटे हेच खरे भांडवल' असं आपल्याला म्हणता येईल. बऱ्याच वेळा आपल्याला अनेक गोष्टी ऐकायला, अनुभवायला मिळतात. एखादा निराशेचा सूर कानी येतो: "अहो, धंद्यात जम बसवायला भांडवल हव ना! ते काय ओम भवती भिक्षान देही करायचं! एखादा उपरोधान म्हणतो- " आम्ही फक्त टाटा बिर्ला व्हायची स्वप्न रंगवायची. भांडवलाविना जिथे तिथे गाडी अडतीये आमची."

जीवनात कोणत्याही क्षेत्रात नोकरी, धंदा, उद्योग अन्य सर्व क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मनाची तयारी आणि मनगटाच्या सामर्थ्याचा साक्षात्कार अनुभवायला हवा. अनंत ध्येयासक्तीने भारावून जाऊन माणसं जीवनाला कलाटणी देतात व यशाचे मानकरी जातात.

जयप्रकाश झेंडे यांचं ' महाराष्ट्रातील उद्योजक' हे पुस्तक अशाच उद्योजक वृत्तीला प्रोत्साहन देणारं आहे. हे पुस्तक म्हणजे महाराष्ट्रातील उद्योजकांना मानाचा मुजरा ठरावं असं आहे. या पुस्तकात भारतीय उद्योगाचे जनक जमशेटजी टाटा, लहान ठेवीदारांचा देवदूत- धीरूभाई अंबानी, जगातील दर्जाचा स्थापत्यशास्त्रज्ञ- बाबुराव(बी.जी.) शिर्के, ग्राहकांच्या समाधानाची शंभर टक्के खात्री देणारे- राजाभाऊ चितळे, नावीन्याचा स्पर्श असणारे- आबासाहेब गरवारे, ध्येयनिष्ठ उद्योगपती- शेठ जमनालाल बजाज, जागतिक किर्तीचा संगणक उद्योजक- अझीम प्रेमजी, व्यवसायाला नवीन उभारी देणारा उद्योजक-आनंद महिंद्रा, मध्यम कुटुंबातील कोट्यधीश- आदी गोदरेज, महाराष्ट्राला उद्योगी करणारे उद्योगी कुटुंब- शंतनुराव किर्लोस्कर, केरळातून येऊन महाराष्ट्रात रमलेला उद्योगपती- चंद्रन मेनन, भांडवलशाही मनाचा पण समाजवादी हृदयाचा उद्योजक- नारायण मूर्ती, उद्योगाला धार्मिकतेची जोड देणारे उद्योजक कुटुंब- बिर्ला कुटुंब आणि इट्स ऑलवेज पॉसिबल म्हणणारे- अनिल मेहता या उद्योजकांच्या चरित्रांचा त्यांनी वेध घेतला आहे आपल्यातील उद्योजक वृत्तीला प्रोत्साहन देतो.

त्याचबरोबर या पुस्तकात जयप्रकाश झेंडे यांनी मुख्य व्यवस्थापक आणि उद्योजकतेविषयी काही महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत.

आपल्या या पुस्तकात भारतीय उद्योगाचे जनक- जमशेटजी टाटा यांच्याबद्दल लिहितात-

समाजातील एक गट त्यात कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासाठी गुजरातमध्ये आला तेव्हाची एक कथा. या गटाच्या प्रमुखाने गुजरातच्या राजाकडे आश्रय देण्याची विनंती केली. त्यावेळी राजाने आमच्याकडे जागा नाही हे सांगण्यासाठी रूपकात्मक असा दुधाने काठोकाठ भरलेला वाडगा पारशांच्या गटप्रमुखाकडे पाठविला. हा प्रमुखही मोठा हुशार होता. त्याने त्या कटोर्‍यात साखर घालून राजाकडे परत पाठवला आणि कळवले, " साखरे सारखीच आम्ही जागा व्यापणार नाही परंतु त्या दुधात मिसळून जाऊ आणि दुधाची गोडी मात्र नक्कीच वाढवू." गुजरातच्या राजाने या समाजाची चतुराई पारखून त्यांना आपल्या राज्यात सामावून घेतले. जवळपास गेल्या दोन शतकांतील टाटा कुटुंबाची दैदिप्यमान कामगिरी पाहता त्यांनी दिलेले हे वचन अक्षरशः खरे करुन दाखविले आहे.

अशाच एका पारशी कुटुंबात जमशेटजींचा जन्म 3 मार्च 1839 रोजी नवसारी या छोट्याशा शहरात झाला. त्यांचे वडील नसुरवानजी हे त्यांच्या पारशी धर्मगुरु कुटुंबातले पहिले व्यावसायिक. त्यांनी व्यवसायासाठी मुंबईला स्थलांतर केले. वयाच्या एकोणतिसाव्या वर्षीच एकवीस हजार रुपये भांडवल घालून त्यांनी आपली स्वतंत्र पेढी सुरु केली. 1 जानेवारी 1877 ला त्यांनी नागपूर येथे 'एम्प्रेस मिल' या नावाने एका कापडगिरणीला प्रारंभ केला. त्यावेळी या गिरणीचे शेअर्स खरेदी करण्याची विनंती जमशेटजींनी एका व्यापारी सावकार मित्राला केली तेव्हा त्यास नकार देताना तो म्हणाला होता, " जमिनीत सोने काढून टाकणारा कंपनीत पैसा कशाला गुंतवायचा?" पुढे योगायोग असा की, या कंपनीची भरभराट पाहण्यासाठी हा गृहस्थ जिवंत होता आणि त्याने प्रांजलपणे कबुलीही दिली, " टाटांनी जमिनीत सोने गाडून ठेवले नव्हते तर त्यांनी ते मातीत पेरले होते आणि आता त्याला भरघोस पीकही येत आहे."

दोस्तांनो, संपत्ती कमवण्याचे दोन उद्देश असू शकतात- स्वतःसाठी आणि इतरांसाठी. ही गोष्ट लक्षात घेऊन जमशेटजींनी राष्ट्रासाठी संपत्ती निर्माण करणाऱ्या एका कार्यक्षम परंपरेला जन्म दिला. त्याची प्रचिती आपण आज घेत आहोत.

आपल्या भारतभूमीला औद्योगिक क्रांतीच्या दिशेने नेण्यासाठी त्यांनी चार महत्त्वाची उद्दिष्टे समोर ठेवली होती.

1) पोलाद निर्मिती- हा उद्योग सर्व जड उद्योगांचा पाया आहे.

2) पाण्यापासून वीजनिर्मिती- सर्वात स्वस्त पर्यावरण संवर्धक

3) संशोधनाशी निगडित शिक्षण- प्रगतीसाठी आवश्यक

4) जागतिक दर्जाचे उत्कृष्ट हॉटेल

आपल्या या स्वप्नांपैकी एकाच स्वप्नाची सत्यता ते पाहू शकले ते म्हणजे 16 डिसेंबर 1903 रोजी झालेली ताज महल हॉटेलची सुरुवात. त्यांची बाकी स्वप्ने त्यांच्या वारसदारांनी मोठ्या निष्ठेने पूर्ण केली.

मित्रांनो, 'महाराष्ट्रातील उद्योजक' या पुस्तकातील भारतीय उद्योगातील हिमालय असं त्यांना म्हणावं उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे जे.आर.डी. अर्थात जहांगीर रतनजी दादाभाई टाटा. नगाधिराज हिमालय, सरितासम्राज्ञी गंगा आणि सौंदर्यशालीन ताजमहाल ही भारताची भूषणं आम्ही मोठ्या मानाने मिरवावीत असंच निसर्गाचं हे दान मानवालाही लाभलं की, मग त्याला अलौकिकतेचा, अद्भुततेचा स्पर्श होऊन त्याचं व्यक्तिमत्व वेगानं फुलतं, बहरतं. जे. आर. डी. टाटा यांच्या बाबतीतही हेच घडलं. आपल्या अभिजात कार्यकुशलतेच्या व बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी उत्तुंग अशी झेप घेऊन प्रथम आकाश आणि नंतर पृथ्वी गाजवली. त्यांच्या शब्दात त्यांनी स्वतःबद्दल केलेले वर्णन असे- " मी स्वतःला एक जरुरीपुरता, छान, विश्वासपात्र, जो पीत नाही, जुगार खेळत नाही, ज्याला मुलांची आणि प्राण्यांची आवड आहे असा माणूस मानतो. माझ्यात काही दोष आहेतच आणि त्यांची जबाबदारीही माझीच आहे असे मी मानतो." मित्रांनो, याच साधेपणामुळे आणि सच्चेपणामुळे ही माणसं मोठी झाली. अतिप्रचंड कामाचा ताण असतानासुद्धा जे.आर.डी. टाटा यांचं वाचनही भरपूर होतं. त्यांच्या कात्रणे चिकटविण्याच्या वहीत मृत्यू आणि प्रेम यावरही सुंदर परिच्छेद असणारी कात्रणे लावलेली होती तसंच संगीताचीही त्यांना रुची होती.

जे.आर.डी .टाटा म्हणतात, " स्वतः विचार केल्याशिवाय वरवरची अशी कोणतीही गोष्ट स्वीकारू नये. दुर्दैवाने 'बोधवाक्ये' आणि 'घोषवाक्ये' यामुळे आपली माणसं पटकन भावनिक बनतात. उपक्रमशीलता आणि साहस यांचं मूर्तीमंत प्रतीक म्हणजे जे. उपक्रमशीलता आणि साहस यांचं मूर्तीमंत प्रतीक म्हणजे जे.आर. उपक्रमशीलता आणि साहस यांचं मूर्तीमंत प्रतीक म्हणजे जे. उपक्रमशीलता आणि साहस यांचं मूर्तीमंत प्रतीक म्हणजे जे.आर.डी. टाटा.

मित्रांनो, जयप्रकाश झेंडे यांनी या पुस्तकात ज्या उद्योगी विभूतींचा समावेश केला आहे त्यांच्या या बद्दल वाचत असताना पुढचं वाक्य काय आहे याची उत्कंठा कायम राहते. रतन टाटा म्हणतात, " मला पैसा मिळवण्याची तीव्र इच्छा नाही तर जिथे आनंद नाही, तिथे तो निर्माण करण्याची, तो बघण्याची प्रचंड आस आहे." त्यांच्या म्हणण्यानुसार तो आनंद त्यांनी निर्माण केला नॅनो टाटा कारच्या माध्यमातून. मिठापासून मोटारीपर्यंत आणि पोलादापासून मोबाईलपर्यंत टाटा समूहाचा विस्तार विस्मयकारक तर आहेच पण उद्योजकांना पथनिदर्शकदेखील आहे.

दोस्तहो, लहान ठेवीदारांचा देवदूत ज्यांना म्हटलं जातं ते धीरुभाई अंबानी- "आपल्या यशाचे रहस्य काय?" या प्रश्नाला उत्तर देताना म्हणतात, " माणसाला महत्वाकांक्षा हवी आणि त्याला इतर माणसांची मने ओळखता आली पाहिजे." सर्व लोकांना आपल्या बरोबर घेऊन जाण्याची धीरुभाईंची शक्ती अफलातून होती.

रिलायन्समधील एक उच्चपदस्थ अधिकारी म्हणतात, " मी 26 वर्षांचा असताना माझे वडील वारले त्यावेळी माझ्या नातेवाईकांच्या आधी आमच्या अध्यक्षांचा सांत्वन करणारा संदेश मला मिळाला. त्यात लिहिले होते- 'आयुष्यात अशा घटना घडतात. काळजी करू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत.' अशा प्रसंगी केवढा मोठा आधार वाटतो या शब्दांचा." आपण निश्चयाने आणि अचूकतेने काम केले पाहिजे म्हणजे यश आपोआपच आपल्या मागे येते यावर धीरुभाईंची आढळ श्रद्धा होती.

दोस्तांनो, असं म्हणतात की, पोटात शिरण्याचा मार्ग जिभेवरुनच जातो आणि पोटात शिरलं की मनात घर करणं सहज शक्य होतं. ग्राहकांच्या समाधानाची शंभर टक्के खात्री देणारे चितळे बंधू मिठाईवाले आणि तमाम खवय्ये यांच्यातलं नातं अगदी तसंच आहे.

दर्जेदार महाराष्ट्रीयन मिठाई, दूध आणि खाद्य पदार्थांची निर्मिती करणारे 'चितळे बंधू मिठाईवाले' यांचे नाव महाराष्ट्रातच नाही तर जगाच्या पाठीवर पसरलेल्या सर्व मराठी बांधवांच्या जिभेवर मोठ्यात सविनय विराजमान झालेलं आहे. पुण्याला भेट देणारी तमाम मराठी माणसं परदेशी जातांना बाकरवडी आणि आंबा बर्फी घेऊन जाणारच. चितळे उद्योग समूहाची वार्षिक उलाढाल जवळपास दोनशे कोटीच्या आसपास पोहोचली आहे. या ना. या नामांकित उद्योगाचा नेतृत्व करतात राजाभाऊ चितळे. या नामांकित उद्योगाचा नेतृत्व करतात राजाभाऊ चितळे. त्यांची वाणीही त्यांच्या मिठाईसारखी 'मिठी' आहे. केवळ गुणवत्ता आणि परिश्रम यांच्या जोरावर राजाभाऊंनी आपल्या अद्वितीय दर्जाच्या उत्पादनांची 'ब्रॅंड इमेज' तयार केली आहे.

अशा अनेक उद्योजकांचा जीवन प्रवास या पुस्तकात जयप्रकाश झेंडे यांनी बारकाईने रेखाटलेला आहे. लेखक लिहितात- माझ्या मते 'योजकता' आणि 'उपक्रमशीलता' यांचा संगम म्हणजे उद्योजकता आणि हा संगम ज्या व्यक्तीत दिसतो तो उद्योजक असे म्हणायला हवे.

उद्योजक व्हायची स्वप्ने अनेक तरुण असतात अनेक उदाहरणांवरून हे सिद्ध झालेलं आहे की यश म्हणजे काही अपघात नव्हे. तरुणांना सांगावेसे वाटते की यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यशस्वी माणसांच्या चरित्रांचा बारकाईने अभ्यास करावा त्यांच्यातील गुण आत्मसात करावे आणि दुर्गुण टाळावे.

    अनेक यशस्वी उद्योजकांच्या चरित्रांचा अभ्यास केल्यावर त्यांच्यातील काही गुण प्रकर्षाने जाणवले ते म्हणजे मजबूत योजना संधीचा शोध,संधीचा शोध,बांधिलकी,अविचल श्रद्धा,योग्य दिशा,योग्य माणसांची निवड, धोका पत्करण्याची तयारी, प्रयत्नातील सातत्य, कल्पकता आणि चिकाटी हे गुण आपल्या अंगी असतील तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. होय ना!

मित्रांनो, या देशाच्या औद्योगिक प्रगतीत महाराष्ट्रातील उद्योजकांची कामगिरी नेत्रदीपक ठरली आहे आणि जगाच्या औद्योगिक क्षेत्रातही त्यांनी प्रचंड दबदबा निर्माण केला आहे.

मग काय दोस्तांनो, उद्योजक व्हायचंय ना? तर मग जयप्रकाश झेंडे यांचं 'महाराष्ट्रातील उद्योजक' हे पुस्तक नक्की वाचा. कारण साहसे वसते लक्ष्मी:| हेच खरं आहे आणि हो आपले अभिप्राय नक्की नोंदवा. आपले अभिप्राय हीच माझी ऊर्जा आहे. शुभेछा. भेटुया.

~प्रसाद वैद्य

Sunday, 21 March 2021

पुस्तक परिचय -बोलगाणी (कविता संग्रह)

पुस्तक-बोलगाणी (कविता संग्रह)
कवी- मंगेश पाडगावकर
प्रकाशन- मौज प्रकाशन 
प्रकाशक-संजय भागवत  
पुस्तक परिचय द्वारा -प्रसाद वैद्य 

नमस्कार दोस्तांनो,

दोस्तांनो, १० मार्च हा मराठी सारस्वतातील ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांचा जन्मदिवस. या जगण्यावर शतदा प्रेम करायला शिकवणारे मंगेश पाडगावकर मनाने चिरतरुण होते रसिक वाचकांसाठी ते जगण्याची उमेद बाळगतात. मंगेश पाडगावकरांच्या काव्य आविष्काराला दोन बाजू आहेत. एकीकडे ज्याला अभिजात म्हणता येईल अशी सकस कविता 'जिप्सी','उत्सव' 'सलाम'आणि 'भटके पक्षी' त्यांनी दिलीय .पण त्याचबरोबर सर्वसामान्य काव्यप्रेमी रसिकांशी संवाद साधण्यासाठी  'बोलगाणी' सारखे काव्यसंग्रह दिलेत.बालकांसाठी त्यांनी 'भोलानाथ', 'बबलगम' 'चांदोमामा' यासारखे बालगीत संग्रह प्रसिद्ध केलेत.

'बोलगाणी' हा असाच मनाला मोहिनी घालणारा काव्यसंग्रह. यातली प्रत्येक कविता आपल्या मनाचा ठाव घेते. 'मनमोकळ गाणं' नावाची कविता. या कवितेच्या शीर्षकातच मनमोकळेपणाचा भास आहे.

मनमोकळ गाणं

मन मोकळं अगदी मोकळं करायचं

पाखरु होऊन पाखराशी बोलायचं!

तुमचं दुःख खरं आहे,

कळतं मला,

शपथ सांगतो, तुमच्या इतकंच

छळतं मला;

पण आज माझ्यासाठी

सगळं सगळं विसरायचं,

आपण आपलं चांदणं होऊन

अंगणभर पसरायचं

सूर तर आहेतच: आपण फक्त झुलायचं!

मन मोकळं अगदी मोकळं करायचं

पाखरु होऊन पाखराशी बोलायचं!

असा हा पाखरू होऊन पाखराशी संवाद आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जातो निसर्गाशी संवाद साधायला लावतो मग आपल्या ओठातून नकळत शब्द निघतात-

" या ओठांनी चुंबून घेईन, हजारदा ही माती

अनंत मरणे झेलून घ्यावी, इथल्या जगण्यासाठी

इथल्या पिंपळ पानावरती

अवघे विश्व तरावे

या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे."

'बोलगाणी' तील प्रत्येक कविता ही पुढे काय ओळ असेल ते वाचण्याची ओढ निर्माण करते. कारण यातल्या प्रत्येक कवितेची शब्दरचना व मांडणी तशाच दर्जाची आहे. 'आपल्या माणसाचं गाणं', 'तरीसुद्धा', 'तू प्रेम केलंस म्हणून', 'जगणं सुंदर आहे', 'चांदणं', या सुरुवातीच्या कविता आपल्या मनाला साद घालतात आणि त्या कविता वाचल्यावर आपण मनापासून त्या कवीला आणि त्या काव्याला भरभरुन दाद देतो. प्रेमात अपयश आलेल्या प्रेमवीराला उद्देशून असलेली कविता-'तू प्रेम केलंस म्हणून'. यात आत्महत्या करणाऱ्या प्रेमवीराला कवी जगण्याची नवी उमेद देतो. एक संजीवनी बहाल करतो.

तू प्रेम केलंस म्हणून

तिचं प्रेम लाभलं नाही? रडू नको,

जीव द्यायला पाण्यामध्ये बुडू नको!

प्रेम केलं म्हणजे

काय केलं?

फुलून आलो!

कुणासाठी आपण जीव टाकला

म्हणजे काय केलं ?

फुलून आलो!

फुलणाऱ्याला  फुलावसं वाटलं पाहिजे

फुलणारं प्रत्येक फूल

बघावसं वाटलं पाहिजे

रोग लागल्या झाडासारखा झडू नको!

तिचं प्रेम लाभलं नाही? रडू नको,

जीव द्यायला पाण्यामध्ये बुडू नको!

मंगेश पाडगावकरांच्या 'बोलगाणी' तील कवितांमध्ये निसर्ग आणि प्रेम ओथंबून भरलेलं आहे. व्यक्ती, राष्ट्र आणि समाज यांच्याशी बांधलेली त्यांची कविता केवळ आत्मानुभव मांडत नाही तर निराशेच रूपांतर आशेत करण्याचं प्रचंड सामर्थ्य त्यांच्या 'बोलगाणी' त आहे.

'बोलगाणी'तील कविता या फक्त बोलगाणी नाहीत तर ती जीवनगाणी वाटावी इतकी समरस आहेत. यातील आशावादी, आनंदवादी कविता जीवनात चैतन्य निर्माण करणार्‍या आहेत.

  बालमनालाही वेड लागावं अशाप्रकारच्या काही कविता या 'बोलगाणी' संग्रहात आहेत. त्यात 'चिऊताईसाठी गाणं', 'नसलेल्या आजोबांचं असलेलं गाणं'. 'गोष्ट' या कविता बालकांनाआपल्याकडे आकर्षित करून घेतील अशा आहेत. या कवितांच्या माध्यमातूनच वेगवेगळ्या रुपातील व मांडणीतील भावकवितांनी पाडगावकरांनी रसिकांना, वाचकांना आपलंसं केलंय. 'बोलगाणी' तील कविता दैनंदिन जीवनाशी संबंधित आहेत त्यामुळे काव्यप्रेमी रसिक ज्यावेळी त्या वाचतो त्यावेळी त्याला आपल्या जीवनातील प्रसंगाची आठवण होते.आता 'नसलेल्या आजोबांचं असलेलं गाणं' ही कविताच बघा ना!

नसलेल्या आजोबांचं असलेलं गाणं

जेवताना आजोबा लाडात येत

मला आपल्या ताटातली भाकर देत,

जेवता जेवता मधेच थांबत

आणि एक भला मोठा ढेकर देत!

मी म्हणायची रागावूनः

" आजोबा, बॅड मॅनर्स,

व्हॉट आर यु डुइंग?"

आजोबांचं हसून उत्तर:

" आय एम जस्ट ढेकरिंग!"

आजोबांच्या खोलीत आता

धुकं... धुकं ...धुकं...

आजोबांचं जग सगळं

मुकं... मुकं... मुकं...

  या कवितेत एकीकडे काहीअंशी विनोद आहे त्याचबरोबर नसलेल्या आजोबांचं दुःखही आहे. अशाप्रकारचे नित्याचे अनुभव आपल्याला अंतर्मुख करतात आणि आपल्याला भूतकाळातील आठवणीत रमायला लावतात. या शब्दबद्ध मांडणीतील पाडगावकरांची प्रतिभा विलक्षण आहे. मंगेश पाडगावकरांनी अक्षर आणि कागदावर अडकलेली कविता सर्वसामान्य लोकांपर्यंत नेऊन ठेवली. त्यांची एक गझल आहे. त्यात ते म्हणतात-

  हे खरे की खूप माझे हाल झाले, ना कधी गाणे परी बेताल झाले.

हे खरे की हा खिसा होता रिकामा, हृदय हे नाही परी कंगाल झाले.

अशा या दिलदार कवीची सदाबहार गाणी आपण 'शुक्रतारा' यातही ऐकलेली आहेत.मित्रांनो, हल्ली आपल्याला जगावं कसं आणि वागावं कस हेच समजत नाही. हे समजून घ्यायचं असेल तर याचं मार्गदर्शन आपल्याला 'बोलगाणी'तूनच मिळेल. 'शहाणपणाच गाणं' या आपल्या कवितेत पाडगावकर म्हणतात-

शहाणपणाच गाणं

माणसाने शहाण्यासारखं वागावं

आणि मग या जगात आनंदाने जगावं!

वाट इथली बिकट असते हे काय मला ठाऊक नाही?

पावलोपावली कटकट असते हे काय मला ठाऊक नाही?

ठाऊक आहे म्हणून तर

लागतं हे सांगावं:

माणसाने शहाण्यासारखं वागावं

आणि मग या जगात आनंदाने जगावं!

अहो एवढेच काय, तर वार्धक्यालाही शब्दांचा आधार देऊन तारुण्य बहाल करणारी कविता पाडगावकरांनी केलीये 'म्हातारपणावरचं तरुण गाणं' या माध्यमातून.

म्हातारपणावरचं तरुण गाणं

येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण

घेतं म्हटलं की घेऊ लागतं म्हातारपण!

हिरवं पान

कधीतरी पिकणारच,

पिकलं पान

कधीतरी गळणारच,

गळलं पान,

मातीला हे मिळणारच...

झाड कधी कण्हत का?

कधी काही म्हणतात का?

गिरक्या गिरक्या घेत घेत

नाचत जातं पिकलं पान,

कविता पिवळी पिवळी धमक

वाचत जातं पिकलं पान

नेतं म्हटलं की नेऊ लागतं म्हातारपण,

येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण-

तरुण असलो की तरुण असतं म्हातारपण,

रडत बसलो की करुण असतं म्हातारपण!

येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण

घेतं म्हटलं की घेऊ लागतं म्हातारपण!

ही कविता म्हातारपणातही आनंदानं, उत्साहानं जगण्याचं तंत्र शिकवते. भावगहिऱ्या, सुरेल व गेय कविता रचणाऱ्या पाडगावकरांनी 'बोलगाणी' च्या रुपाने रसिकांना कविता ऐकायला, गुणगुणायला ही शिकविले. 'ऐकणारे कान'ही तयार केले. नवीन कवींना आत्मसात करण्याचा मोह व्हावा असे अनेक तंत्र-मंत्र त्यांनी यात हाताळले आहेत. रडत रडत जगायचं की, कण्हत कण्हत जगायचं की हसत हसत ...? असं विचारणारा हा आशावादी, आनंदवादी कवी सगळ्यांना भावणारा आहे.

मित्रांनो, अलिकडच्या काळात आपल्या देशाला दहशतवादाने घेरलंय याचीही जाणीव 'आत्ताचा हा क्षण' या कवितेत त्याचप्रमाणे 'अजून तुझा हात आहे' या दोन कवितांमध्ये पाडगावकर यांनी व्यक्त केलीय.

आत्ताचा हा क्षण

अवतीभवती भेटणार्‍या

हिंस्र दंगली;

ऐटदार पोशाखातली

माणसं जंगली;

कधी हा सूर्य

थंड राख होऊन जाईल;

कधीही पृथ्वी

जळून खाक होऊन जाईल...

आत्ताचा हा क्षण केवळ तुमचा आहे:

तुळशीच्या रोपाला

थोडं पाणी घालून या;

ओल्या मऊ मातीतून

अनवाणी चालून या!

  या कवितेच्या माध्यमातून वर्तमानात आपल्या हातात असलेल्या क्षणांची जाणीव पाडगावकरांनी आपल्याला करुन दिलीय. म्हणूनच बोल गाडीतील कविता वाचलेले क्षण आणि त्या क्षणांचे संदर्भ जपण्यासारखे आहेत.

  प्रेम हा जीवनातला एक अविष्कार आहे. तो लावण्याचा शृंगार आहे. तो व्यक्त करता येण हा त्या अविष्काराचाच एक भाग आहे. प्रेमाची महती बोलगाणीतील कवितांमध्ये पाडगावकर यांनी पटवून दिलीय. 'प्रेम म्हणजे प्रेम असतं' या कवितेत ते म्हणतात:

प्रेम म्हणजे प्रेम असतं

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेमअसतं

तुमचं आणि आमचं अगदी 'सेम' असतं!

मराठीतून इश्श म्हणून

प्रेम करता येतं;

उर्दूमधे इष्क म्हणून

प्रेम करता येतं;

व्याकरणात चुकलात तरी

प्रेम करता येतं;

कॉन्व्हेंटमधे शिकलात तरी

प्रेम करता येतं!

'लव्ह' हे त्याचंच दुसरं 'नेम' असतं,

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं

तुमचं आणि आमचं अगदी 'सेम' असतं

अशा या प्रेमाची महती 'बोलगाणी'तील 'प्रेमात पडलं की...', 'तुमचं काय गेलं?' अशा कवितांमध्ये त्यांनी पटवून दिलीय.

  'विदूषकाचं आत्मकथन' ही कवितादेखील जगण्याचं मर्म सांगणारी आहे.

आपल्या आयुष्यात कधीकधी असे क्षण येतात की जे आपल्याला अनपेक्षित असतात.आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नाही. तेव्हा आपण उदास होतो आणि हताश होतो. अशावेळी परिस्थिती बदलत नसेल तेव्हा आपली मनस्थिती बदला जीवन हे आनंदमय होईल, असा संदेश कवी आपल्या 'सांगा कसं जगायचं?' या कवितेतून रसिकांना देतात. जीवन सकारात्मक विचारांनी जगलो, तर जीवन जगण्यासारखा आनंद नाही आणि रडत बसलो तर जीवन जगण्यासारखे दुःखही नाही. म्हणूनच कसं जगायचं हे आपणच ठरवायचं असतं. यासाठी सदर कवितेत कवीने आपल्यापुढेच आपल्या आनंदासाठी पर्याय ठेवलेले आहेत. जीवन कसं जगायचं याचं उत्तम मार्गदर्शन या  कवितेत आहे.

सांगा कसं जगायचं

सांगा कसं जगायचं ?

कण्हत कण्हत

की गाणं म्हणत?

काय काय तुम्‍हीच ठरवा!

काळ्याकुट्ट काळोखात

जेव्हा काही दिसत नसतं,

तुमच्यासाठी

कोणीतरी

दिवा घेऊन उभं असतं!

काळोखात कुढायचं

की प्रकाशात उडायचं?

तुम्‍हीच ठरवा!

पेला अर्धा

सरला आहे

असं सुद्धा म्हणता येतं;

पेला अर्धा

भरला आहे

असं सुद्धा म्हणता येतं!

सरला आहे म्हणायचं

की भरला आहे म्हणायचं?

तुम्‍हीच ठरवा!

सांगा कसं जगायचं ?

कण्हत कण्हत

की गाणं म्हणत?

तुम्‍हीच ठरवा!

                    मित्रांनो, हा आशावादी दृष्टिकोन जगणं शिकवतो. कवीचं जगणं आणि लिहिणं ही कधीही वेगळी आणि स्वतंत्र खाती नसतात त्यांच्या जगण्यातून कवितेला आणि कवितेतून जगण्याला कधीही वगळता येत नसते. हे जगणं आणि लिहिणं एकजीव होतं तेव्हाच मंगेश पाडगावकर यांच्यासारखे कवी जन्माला येत असतात. तर मग वाचणार ना या जिंदादिल कवीची सदाबहार बोलगाणी.! शुभेच्छा. भेटूया.      


आपला अभिप्राय माझी ऊर्जा                          

Thursday, 18 March 2021

वाचलेच पाहिजे असे काही ...

वाचलेच पाहिजे असे काही ...


मी दारात आलो, नेहमीसारखे जोडे काढून हातात घेतले आणि ओपीडीत आलो. 

समोरच एक वृद्ध उभा होता. 

"सर, तुम्ही.?" 

मी त्या वृद्धाचा हात धरत म्हटलं.

"कोण.?"

"मी xxx. तुमचा विद्यार्थी."

मी माझं नाव सांगितलं.

"होय काय.? 

चेहऱ्यात खूप फरक पडलाय रे.! 

तब्बेतीनं पण मोठा झालायस. 

शाळेत होतास तेव्हा केवढा मरतुकडा होतास." 

सरांच्या बोलण्यावर रिसेप्शनिस्ट 

तोंड धरुन हसली.

"चला की सर.! आत चला." मी हातातले चप्पल रिसेप्शनिस्टच्या काऊंटरखाली ठेवत सरांना म्हटलं.

"नको, तू जा. मी येतो माझा नंबर आल्यावर."

"सर, नंबराचं काय घेऊन बसलाय.? तुम्ही माझे गुरु आहात. माझ्याबरोबर चला आत."

"अरे, नंबराचं काय म्हणजे.?" 

सर माझ्याकडं आश्चर्यानं बघत म्हणाले, 

"जगात नंबरालाच सर्वात जास्त महत्त्व आहे. तुझा वर्गात नेहमी पहिला नंबर असायचा. पण प्रगतीपुस्तकावर मी  उत्तीर्ण क्रमांक १ च्या ठिकाणी उत्तीर्ण क्रमांक २ असं लिहलं असतं तर तुला चाललं असतं का.? नाही ना.? माझा साठावा नंबर आहे. म्हणजे माझ्या आधीचे एकोणसाठ जण माझ्या आधी नंबर लावून बसलेत. त्यांचा हक्काचा नंबर डावलून मी आत येणं बरं दिसतं का.?"

"पण सर."

"तू जा. कामाला लाग. तू बोर्डवरल्या टायमिंगच्या आधी आलास त्याबद्दल तुझं कौतुक. शाळेत उशीरा आलास म्हणून मी छड्या मारायचो तेव्हा मारक्या म्हशीसारखा माझ्याकडं बघायचास पण आता त्या छड्यांचं महत्त्व लक्षात आलं असेलच. 

तेव्हा छड्या दिल्या नसत्या तर आता 

आला असतास तासभर उशिरानं."

"सिस्टर, यांचे केसपेपरचे पैसे घेऊ नका." 

मी केबिनमध्ये जाता जाता रिसेप्शनिस्टच्या कानात कुजबुजलो. पण तेही सरांना ऐकू गेलंच.

"काय बोललास.? पैसे घेऊ नको?" सर माझ्यावर ओरडले, "पैसे तर तुला घ्यावेच लागणार. मी तुझा शिक्षक आहे म्हणून मी काही फुकट शिकवलं नाही तुला. वीस हजार रुपये पगार घेत होतो सरकारकडनं. हां, आता तुलाही सरकार पैसे देत असेल 

तर नको घेऊ पैसे."


मी हसत हसत आत आलो आणि पेशंट बघायला सुरुवात केली. पेशंट बघता बघता सीसीटीव्हीमधून माझं सरांकडे लक्ष होतंच. 

तीन तासांत सरांनी बसायच्या किमान तीस जागा बदलल्या असतील.


नंबर आल्यावर सर आत आले. आल्या आल्या त्यांनी माझा हात हातात घेतला. तो आपल्या छातीवर दाबला आणि सर बोलले, "बाळा, मला खूप खूप आनंद झालाय. 

खूप कमावलंस तू."

"एवढंही काही नाही सर.!"


"नाही कसं.? अरे, मघापासून मी तुझ्या सगळ्या नव्या जुन्या पेशंटशी बोलतोय. पण एकही माणूस तुझ्याबद्दल वाईट बोलायला तयार नाही. सगळे गुणगानंच गातायत. 

छाती अभिमानानं भरुन आली माझी." 

बाहेर सर आपल्या बसण्याच्या जागा सारखं का बदलत होते ते आता लक्षात आलं.

"सर, तुम्ही शाळेत शिकवत होतात तेव्हा तरी कुठला विद्यार्थी तुम्हांला नावं ठेवायचा.? समोरच्या माणसाशी प्रेमानं वागायचं, आपलं काम सचोटीनं करायचं 

हे तुम्हीच तर शिकवत होतात ना.! 

आज या वयातही तुम्ही तुमची तत्वं सोडायला तयार नाही आहात. मीही त्याच तत्वानं जगतोय. त्यात मी विशेष काही करतोय असं काहीच नाही. प्रेमानं व्यवहार केला की जगणं सुंदर होतं, हे शिकवतं तेच तर शिक्षण.!"

"तू शाळेत होतास तसाच आहेस. 

खेड्यातला साधा सरळ मुलगा."


"आता आयुष्यभर हा विद्यार्थी असाच राहू दे असा आशीर्वाद द्या.!" 

मी म्हटलं आणि सरांच्या डोळ्यांत पाणी तरळलं.

"आईबाप आणि शिक्षक यांचं असंच असतं बघ. मुलं वाईट निपजली तर त्यांना वाईट वाटतं, आणि मुलं नीतीवंत जन्मली तरी त्यांच्या डोळ्यांत पाणी येतं. पण असे आनंदाश्रू आजकाल दुर्मिळ झालेत रे.!"


सर पुढं बरंच काही काही बोलत होते आणि त्यांचा विद्यार्थी भान हरपून ऐकत होता. वाटत होतं सरांचं हे बोलणं कधी संपूच नये.! असे शिक्षक मिळणं म्हणजे भाग्यच नाही का.? दुसऱ्याच्या मुलासाठी अश्रू गाळणारे शिक्षक आजही असतील का हो.?🌹


लेखक - अनामिक

सर्व हक्क लेखकाला

माझ्या सर्व शिक्षक व स्टाफला समर्पित.


~संकलन 

My Quotes