My YouTube Channel

Click here to visit My YouTube Channel

Sunday, 23 June 2024

अशी पाखरे येती...!!!

 अशी पाखरे येती...!!!


@doctorforbeggars 

(श्री अजय कटारिया सर यांना सादर समर्पित) 

पुण्यामध्ये आप्पा बळवंत चौकाचं नाक जिथून सुरू होतं, तिथे चॉईस नावाचं पुस्तकाचे दुकान आहे. दुकानाच्या मालकांचे नाव आहे श्री अजय कटारिया. 


बरोबर सहा वर्षांपूर्वी एका स्नेह्यांच्या माध्यमातून यांची आणि माझी ओळख झाली. 


बोलता बोलता ते म्हणाले, 'माझे पुस्तकाचे दुकान आहे, कधी काही लागलं तर या...!'


भीक मागणाऱ्या अनाथ मुलांना आपण दत्तक घेऊन, त्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे. दरवर्षी मला खूप शैक्षणिक साहित्य लागतेच. 


कटारिया साहेबांच्या चॉईस दुकानात गेलो; तर थोडी सूट मिळेल आणि चांगल्या क्वालिटीचे साहित्य मिळेल, हा स्वार्थी विचार करून मी त्यांना चार-पाच वर्षांपूर्वी प्रथमच, सर्व शैक्षणिक साहित्याची लिस्ट दिली. 


त्यानंतर दोन दिवसांनी सर्व साहित्य आले.


बॉक्स उघडून पाहिला, आम्ही दिलेल्या लिस्टपेक्षाही सामान जास्त होते. 


आम्ही एक वही मागितली तिथे पाच वह्या होत्या, एक दप्तर मागितले तेथे पाच दप्तरे होती, पाच कंपास पेट्या मागितल्या तिथे 25 होत्या...


मी त्यांना फोन करून म्हणालो, 'कटारिया साहेब, बहुतेक हा दुसऱ्यांचा बॉक्स आमच्याकडे आला आहे... हि आमची लिस्ट नव्हे ! 


ते हसून म्हणाले, 'असू द्या हो डॉक्टर, अनाथ पोरांना शिकवताय... थोडं इकडे तिकडे चालणारच...  पोरं आहेत... 


घ्या आमच्याकडून डोनेशन समजून...' 


एक्स्ट्रा सामानाची मी त्यांना देणगी म्हणून पावती दिली, त्यांनी ती हसत खिशात ठेवली. 


पुढच्या वर्षी म्हणजे साधारण 2021 ला त्यांना पुन्हा लिस्ट दिली... पुन्हा पाचपट सामान जास्त होते... मी पुन्हा तोच फोन केला... पुन्हा त्यांचे तेच उत्तर आले... एक्स्ट्रा सामानाची मी त्यांना पुन्हा पावती दिली... ही पावती हसत त्यांनी पुन्हा खिशात ठेवली...! 


एकावर एक फ्री... हि बिझनेस स्ट्रॅटेजी मी समजू शकतो, पण एकावर पाच फ्री... ??? 


मग 2022 साल उजाडले... 


यावेळी सामानाची लिस्ट घेऊन मी स्वतः दुकानात गेलो. दुकानात भरपूर कर्मचारी आहेत, परंतु माझ्याकडची लिस्ट घेऊन त्यांनी स्वतः सामान बांधायला सुरुवात केली. 


मी बारकाईने पाहत होतो, माझ्या लिस्ट पेक्षा पाचपटीने जास्त गोष्टी ते स्वतःच्या हाताने बॉक्समध्ये भरत होते. 


मी त्यांना म्हणालो साहेब, आपण आपले नुकसान का करून घेता ? माझ्या लिस्ट प्रमाणेच मला सामान द्या...


यावर ते माझ्याकडे न बघता, स्टूल घेऊन, वरच्या कप्प्यातले सामान काढता काढता म्हणाले, 'डॉक्टर भरगच्च भरलेल्या ताटामधून दोन घास चिमण्यांना टाकले म्हणजे आपलं काही नुकसान होत नाही हो ...! 


ए त्या चौथा कप्प्यातला, नवीन माल काढ... त्यांचं सगळं लक्ष बॉक्स भरण्याकडे....


तरीही मी माझं बोलणं रेटत म्हणालो,  पण हा आपला व्यवसाय आहे साहेब, मला साहित्य देणे म्हणजे आपला तोटा आहे ...! मी आवंढा गिळत म्हणालो. 


तितक्याच उत्स्फूर्तपणे बॉक्समध्ये साहित्य टाकत ते म्हणाले, 'साहेब धंदा म्हणा, व्यवसाय म्हणा, कारभार म्हणा, कारोबार म्हणा.... जे काही करायचं ते नफ्यासाठी... मी पक्का व्यापारी आहे, तोट्यामध्ये कधीच व्यापार नाही केला मी ... 


'आत्ता बी मी तोट्यामंदी नाहीच, नफ्यामंदीच आहे...' चष्म्या मागून डोळे मिचकावत ते बोलले. 


मागितलेल्या गोष्टीपेक्षा, पाचपटीने भरलेल्या बॉक्स कडे बघत ' हे कसं काय बुवा ?' हा प्रश्न मला त्यांना विचारायचा होता...


माझ्या बावळट चेहऱ्यावर त्यांना तो दिसला असावा... ! 


'छोटू, आपल्याकडच्या दुरेघी वह्या संपल्या का रे ?  शेजारच्या दुकानातून दहा डझन मागव आणि घाल या बॉक्समध्ये.... !' हात झटकत ते बोलले. 


माझा बावळट चेहरा अजून तसाच असावा. 


नफा तोट्याचा त्यांनी मग उलगडा केला... 


'डॉक्टर तुमी कितीबी नाय म्हणले तरी जास्तीचा सामान पाहून तुम्हाला आनंद होतो का नाही ? तो माझा नफा.... 


दहा पोरं नाही, आता तुम्ही 50 पोरांना सामान देऊ शकता, त्या पोरांना आनंद होतो की नाही...? तो माझा नफा...


कटारिया काका कोण ? हे पोरांना कधीच कळणार नाही... पण 50 पोरं शिकत आहेत,  याचा मला आनंद होणार का नाही ? तोच माझा नफा... 


जलमाला येऊन आपण कोणाच्या उपयोगी नाही पडलो, हा खरा तोटा... ! 


"तोटा" या शब्दावर जोर देत , डाव्या हाताच्या तळहातावर उजव्या हाताने त्यांनी जोरात टाळी मारली...! 

आपून तोट्यात धंदाच करत नाही सायेब, पक्का व्यापारी आहे मी ...'

काउंटर वरच्या टेबलावर बोटांनी तबला वाजवत ते म्हणाले, 'ए चाय सांगा रे डॉक्टरला...!'  

तोट्याची शेती करून, आनंदाची बाग फुलवत; नफ्याची फुलं वेचणाऱ्या या माणसापुढे मी मनोमन नतमस्तक झालो ! 

चहाचा घोट घेऊन मी त्यांना म्हणालो, 'सर पण हे नुकसान किती आहे तुमचं, यात विनाकारण खर्च खूप आहे...' 


ते पुन्हा हसत म्हणाले, 'डॉक्टर पोरगं तुमचं असो, माझं असो किंवा आणखी कोणाचं असो, पोराच्या शिक्षणावर झालेला खर्च मी खर्च समजतच नाही, पोरांच्या शिक्षणासाठी केलेला खर्च हा भविष्यामध्ये भरभक्कम परतावा देणारी गुंतवणूक असते


गोरगरिबांची पोरं शिकतील तोच माझा परतावा... मंग खर्च झालाच कुठे ? 


आलतू फालतू स्कीम मध्ये अपुन पैसा गुतवतच नाही... सांगितलं ना ? पक्का व्यापारी आहे मी... ! 


मी खर्च केला नाही सायबा... फक्त गुंतवणूक केली... माझ्या पोरांवर गुंतवणूक केली... बघा भरभक्कम परतावा येणारच... 


"येणारच" म्हणताना पुन्हा डाव्या हाताच्या तळहातावर उजव्या हाताने त्यांनी जोरात टाळी मारली...! 


मी भारावून म्हणालो या अनाथ मुलांसाठी तुम्ही किती करत आहात... ? 


अनाथ कशानं हो... पालक म्हणून तुम्ही आहे...  मी आहे.... काय डॉक्टर तुम्ही सुद्धा...! 


'चहा संपवा तो...' म्हणत, टेबलावर पुन्हा त्यांनी हसत तबला वाजवला... 


तो तबला होता ? की माझ्या हृदयाची धडधड ?? माझं मलाच कळलं नाही...!


शर्टाच्या बाहीला डोळे पुसत कटारिया साहेबांची नजर चुकवत मी बाहेर पडलो !  


सर्व साहित्य घेऊन मी आलो... दहा ऐवजी 50 मुलांना ते वाटले... तरीही कुठेतरी अपराधीपणाची भावना होती. 


भावनेच्या भरात हा "वेडा माणूस" स्वतःचं खूप नुकसान करून घेत आहे, याची मला मनोमन जाणीव होती. 


याच प्रेमाच्या भावनेतून, 2023 साली मी यांच्याकडे ऑर्डर दिली नाही, आप्पा बळवंत चौकातील दुसऱ्या एका नामांकित दुकानातून मी साहित्य विकत घेण्यासाठी ऑर्डर दिली. 


लिस्ट नीट लिहून आणायची, अक्षर तुमचं तुम्हाला तरी कळतंय का ? बाजूला थांबा जरा, बाकीची गिऱ्हाईकं बघू देत ... वेळ किती लागेल म्हणून काय विचारता ?  इतकं एकच काम आहे का ? सामान काय आहे ते आत्ताच मोजून घ्या, पुन्हा कटकट करायची नाही... 

ए यांना मराठी भाषा कळत नाही, दुसऱ्या भाषेत सांग रे यांना जरा....  असा स्वतःचा पाणउतारा करून घेतला... 


यानंतर कॅरीबॅगचे सुट्टे पैसे देईपर्यंत आमच्या वस्तूंना त्यांनी आम्हाला हात सुद्धा लावू दिला नाही... ! 


हरकत नाही... जगात सगळेच कटारिया साहेब जन्माला आले तर मग अनुभव कसा मिळणार ? 


असो... हा प्रकार पुढे कटारिया साहेबांना कसा कोण जाणे पण कळला 


एके दिवशी शंकर महाराज मठाजवळ भीक मागणाऱ्या लोकांना मी तपासत असताना ते तावातावाने आले. 


चेहऱ्यावरचा मृदुभाव आणि ओठांवरची मृदू वाणी यावेळी लुप्त झाली होती. 


'डॉक्टर तुम्ही स्वतःला समजता काय ?  सेवा करण्याचा मक्ता काय तुम्हीच घेतला आहात का ?  थोडीफार सेवा आम्ही करत होतो, आमच्या हातून हि सेवा काढून घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला ?' 


सेवा करणे हा माझा अधिकार आहे आणि तो तुम्ही माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. 


मी तुम्हाला माफ नाही करणार...


ते रागानं थरथर कापत बोलत होते... 


या जमदग्नीपुढे मी नतमस्तक झालो... पायावर डोकं टेकवलं... आणि त्यांच्या प्रेमाचा राग माझ्या झोळीत मनसोक्त भरून घेतला ! 


तुम्हाला ऑर्डर न देण्यामागे माझी पण काय भावना आहे, हे सर्व मी त्यांना उलगडून सांगितले, क्षणात या जमदग्नीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले... ! 


स्वतःचे अधिकार मिळवण्यासाठी लोक आंदोलन, उपोषण, रास्ता रोको करतात... सेवा करण्याचा अधिकार मिळवण्यासाठी हा माणूस आज माझ्याशी... माझ्याशी ??? भांडला... !!! 


यानंतर पुढे दोन-तीन वेळा मोघम भेटी झाल्या. 


आता साल उजाडले 2024. 


यावर्षीची शैक्षणिक ऑर्डर "चॉईस" मध्ये देण्याशिवाय मला दुसरा कोणताही "चॉईस" नव्हता...! 


मी 13 जून 2024 ला कटारिया साहेबांच्या फोनवर फोन केला. पलीकडून आवाज आला हॅलो मी चिराग बोलतोय... ! 


चिराग हे कटारिया साहेबांचे सुपुत्र, चार्टर्ड अकाउंटंट आहेत ! 


' हॅलो चिराग सर, कटारिया साहेब कुठे गेले त्यांना फोन द्या ना..' 


'सर बाबा गेले' पलीकडून मंद आवाज आला. 


आमचा हा माणूस कोणालातरी मदत करण्यासाठी, कोणाच्यातरी पाठी धावतच असतो, सतत फिरत असतो, हे मला माहित होतं. त्याच भावनेने मी बोललो... 


'अच्छा गेले का ?  बरं पुन्हा कधी येतील ?' मी हसत बोललो.


'बाबा गेले सर... परत ते पुन्हा कधीही येणार नाहीत ... तुम्हाला माहित नाही ?'  

माझ्या पायाखालची जमीन सरकली... मी सुन्न झालो... मी काय ऐकतोय यावर माझा विश्वास बसेना...

भानावर आलो, तेव्हा मात्र या माणसाची मला भयंकर चीड आली... 

पलीकडच्या चौकात जाताना सुद्धा घरात आपण सांगून जातो... मग इतक्या मोठ्या प्रवासाला जाताना साधं आम्हाला सांगण्याची, निरोप घेण्याची सुद्धा तुम्हाला गरज वाटली नाही ? 

भांडून सेवेचे अधिकार मागता आणि असं बेजबाबदारपणे सोडून जाता ? 

आमच्या पोरांना पोरकं करून जाण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला ? 

हे...हे... असं... काउंटरवर तबला वाजवत आम्हाला आशा का दाखवलीत ? 

कटारिया साहेब, आता मी सुध्दा तुम्हाला माफ नाही करणार...! 

'सर काही काम होतं का ?' फोन अजून चालूच होता, पलीकडून चिराग सरांचा आवाज आला. 


'शैक्षणिक साहित्याची ऑर्डर द्यायची होती...' मी शांतपणे बोललो. 


'ठीक आहे सर, दोन दिवसात पाठवतो.' तितक्याच शांतपणे उत्तर आले. 


दोन दिवसांनी सामान आले, मी बॉक्स खोलले. 


आम्ही एक वही मागितली तिथे पाच वह्या होत्या, एक दप्तर मागितले तेथे पाच दप्तरे होते, पाच कंपास पेट्या मागितल्या तिथे 25 होत्या...

मी चिराग सरांना फोन केला, म्हणालो, 'चिराग सर, बहुतेक हा दुसऱ्यांचा बॉक्स आमच्याकडे आला आहे... हि आमची लिस्ट नव्हे, काहीतरी चूक झाली असावी ! 

चिराग सर म्हणाले, 'सर मी चार्टर्ड अकाउंटंट आहे, आकड्यांच्या खेळात मी चुकत नाही, तुम्ही दिलेले सामान मी अत्यंत काटेकोरपणे मोजून मापून स्वतःच्या हाताने बॉक्समध्ये भरलं आहे, चूक होणार नाही माझी...!' 


'अहो पण, चिराग सर... एका वस्तूच्या बदल्यात पाच पाच वस्तू आल्या आहेत आम्हाला...' 


'अच्छा... हां... हां.... त्या एक्स्ट्रा वस्तू का ?  त्या मी नाही... बाबांनी पाठवल्या असतील कदाचित सर ...'  


फोन कट झाला ...!!! 

इतका वेळ धरून ठेवलेला बांध आता फुटून गेला... ! 

कटारिया साहेब चिरंतन प्रवासाला निघून गेले...  

पण जाताना आपल्या विचारांची एक पणती मागे ठेवून गेले. 

या पणतीला नाव सुद्धा काय दिलं आहे... ?  चिराग... व्वा...!!! 

यानंतर 15 जून 2024 ला सर्व चिल्ल्यापिल्लांना बोलावून शैक्षणिक साहित्य दिले. 

नवीन वही, नवीन पुस्तक, नवीन दप्तर, नवीन कंपास पेटी पाहून या सर्व चिमण्या आनंदाने चिवचिवल्या... ! 

या चिवचिवणाऱ्या चिमण्यांना आता कोणत्या तोंडाने सांगू .... 

बाळांनो, आज खऱ्या अर्थानं तुम्ही पोरके झालात रे.... 

आणि तुमच्या बरोबर मी सुद्धा... !!! 

21 जून 2024


डॉ. अभिजीत सोनवणे 

डॉक्टर फॉर बेगर्स

सोहम ट्रस्ट पुणे 

9822267357

sohamtrust2014@gmail.com

Wednesday, 19 June 2024

प्रसाद हा देवाचा प्रतिसाद

 प्रसाद हा देवाचा प्रतिसाद

एका छोट्याशा गावात गेलो होतो. निवृत्त शिक्षकाचा सत्कार होता. ग्रामस्थांनी छान तयारी केली होती. चहापाणी झाले. हाती थोडा वेळ होता. लोक जमू लागले होते. गावातला तरुण म्हणाला, “थोडा वेळ आहे. भैरीच्या देवळात जाऊन येऊ !’’ माझ्या सोबत आलेल्या मित्राला देवळात जाण्याची गोष्ट फारशी आवडली नाही. त्याच्या चेहऱ्यावर दिसतच होते. मी निघालो तसा तोही निघाला. देऊळ म्हणजे खोपटेच होते. “फार जागृत स्थान आहे, सर ! सगळे गाव मानते.’’  गावातला तरुण म्हणाला. माझा मित्र कसनुसा हसला.

देवळात गेलो. मी नमस्कार केला. गुरवाने प्रसाद दिला. मी पाया पडून प्रसाद तोंडात टाकला. मित्राच्या हातात प्रसाद तसाच होता. त्याने पहिल्यांदा वास घेतला. मग निरखून पाहिले. न खाता त्याने प्रसाद हळूच एका दिवळीत ठेवला. मी प्रदक्षिणा घातली. गुरव म्हणाला, “बरं केलं तुम्ही सत्काराला आला ते! गुरुजी फार भला माणूस. सगळं गाव शानं केलं. कुठं अडू द्या-नडू द्या; देवासारखं गुरुजी पळत येनार. पण नशिबानं त्यांना न्याय दिला नाही !’’ गुरवाच्या या वाक्याने मी कान टवकारले. गुरुजींचे जीवन समजून घेण्यासाठी गुरवाला एक-दोन प्रश्न विचारले. गुरुजींची जीवन कथा ऐकून मी स्तब्ध झालो. तरुण मुलगा अकाली गेला. लग्न झालेल्या मुलीचा संसार मोडला. मुलगी माहेरी आली. बायकोला दोन्ही धक्क्यांनी वेड लागले. तिला सावरून, उभी करून गाडी रुळावर येत होती तेव्हाच मुलीने जीव दिला. एकमेकांच्या आधाराने ते दोघे उभे राहिले. सारे गावच कुटुंब बनवले. गुरुजींनी केलेले कार्य मला माहीत होते, पण ही सारी दु:खभरली कहाणी माहीत नव्हती.

कार्यक्रम छान झाला. निघताना मी आणि माझा मित्र गुरुजींचा निरोप घ्यायला मुद्दाम गेलो. मी निघताना गुरुजींना न राहवून विचारले, “हे सगळे कसे सहन केलेत?’’ गुरुजी म्हणाले, “आयुष्यात जे आपल्याला मिळते तो देवाचा प्रसाद मानला. चिकित्सा नाही. चिरफाड नाही. चिडचिड नाही. प्रसाद हातात आला की चटकन तोंडात टाकतो की नाही आपण? चवीचा विचार नाही करत. ताजे-शिळे म्हणत नाही. त्याला पेढा, मला गूळ का? म्हणत नाही. घेतो. खातो. धन्य होतो. हे कधी विसरलो नाही. प्रसाद देवाचा प्रतिसादच मानला !’’ माझे डोळे भरून आले. मी वाकून नमस्कार केला. छान हसून माझा हात हातात घेतला. स्पर्श आणि हास्याचा जणू मला त्यांनी प्रसादच दिला !

गुरुजींशी झालेल्या संवादातून केवढा हितोपदेश मिळाला;  तोही सहजच ! प्रसाद देवाचा प्रतिसाद असतो हे पटले तर जगणे किती सुंदर बनून जाते हे मला समजले. मंदिरात आपल्याला प्रसाद मिळतो त्याची आपण चिकित्सा राहोच, चर्चाही करत नाही. कुणाला चार शेंगदाणेच मिळतील तर कुणाला बत्तासा ! कुणाला काजूचा तुकडा असलेला शिरा मिळेल तर कुणाला करपलेल्या शिऱ्याचा लाभ होईल ! आपण प्रसाद घेतो, खातो आणि कृतकृत्यतेने हात जोडतो. देवळातल्या प्रसादासारखेच मानावेत आयुष्यातील प्रसंग ! जे वाट्याला आले ते आपल्या इष्टाचा प्रतिसाद  मानले की सारी घालमेलच संपते.. गुरुजींशी झालेल्या मुक्त संवादाने मी आतून उजळून निघालो.

एकदा माझी नाशिकला भागवत कथा झाली. सांगता झाली तेव्हा सर्वांना प्रसादही दिला. सारी आवराआवर झाल्यावर एक वृद्धा आली. म्हणाली, “प्रसाद कधी मिळेल?’’  सारे जिकडचे तिकडे झाल्याचे तिला कळल्यावर ती खट्टू झाली. तेवढ्यात त्या कार्यालयात असणारी एक महिला म्हणाली, “थांब मावशी. एक लाडू आहे. देते तुला !’’ वृद्धेला आनंद झाला. बुंदीचा लाडू हातात घेऊन तिने कपाळाला लावला आणि लाडवाचा एक तुकडा घेऊन उरलेला लाडू परत देत म्हणाली, “पुन्हा कुणी आलं तर यातला कणभर त्यालाही देता येईल. कुणी तसंच जायला नगं ! परसाद जीव निवण्यासाठी पायजे.. पोट भरण्यासाठी नाय् !’’

मला तिचे पाय धरावे वाटले. आध्यात्मिकतेने अनासक्ती येते ती अशी ! मन प्रसन्न असेल ना; तर मणाने नाही, कणानेही समाधान लाभते हे त्या वृद्धेच्या संवादातून उलगडले.

परमार्थ वेगळे काय शिकवतो? आयुष्यातला प्रत्येक क्षण भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकारता आला तर सारे तणाव, सारा वैताग संपून जाईल. जगणे ‘प्रासादि’क होईल. बीजात सारा वृक्ष सामावलेला असतो, तसा कणा कणात ब्रह्मांडव्यापी आनंद कोंदटलेला असतो. पण आपल्या हव्यासापोटी आपण ब्रह्मांडच खिशात घालायचे म्हणतो. मग हट्ट सुरू होतो. आणखी मिळवेन, खूप मिळवेन, जास्तीत जास्त मिळवेन… शेवटी ओंजळ रिक्तच राहते. असे निराश होण्यासाठी आपल्याला आयुष्य मिळालेले नाही. खरे तर आयुष्य हाच महाप्रसाद आहे. एकदा ते मिळाले म्हणताना, आणखी काय हवे? आता मिळवायला नव्हे तर वाटायला शिकले पाहिजे. तळहातावर मिळालेला गोपाळकाला, स्वत:साठी थोडा ठेवून कण कण सर्वांना वाटायचा असतो!

देता यायला लागले की आपणही कृष्ण होतो. परमार्थ म्हणजे जवळचे उत्तम सर्वांना देणे. थोड्यातलाही आनंद घेणे. आपले अश्रू रोखून हसण्याचे चांदणे पसरणे. बस्स, हव्यास आणि हट्ट सोडण्याची तयारी करायला पाहिजे.

।। जय श्रीगुरुदेवदत्त ।।

।। जय श्रीकृष्ण ।।

~संकलन

" अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन " विषयावर आधारित विवेकानंद विद्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षणसंपन्न

" अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन " विषयावर आधारित विवेकानंद विद्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण  संपन्न

चोपडा येथील विवेकानंद प्रतिष्ठान व संशोधन केंद्र संचलित, विवेकानंद विद्यालयात प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांसाठी दोन दिवसाचे 
प्रशिक्षण  संपन्न झाले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार होणारे बदल लक्षात घेता शिक्षकही समृद्ध व्हावे यासाठी अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन हा विषय घेऊन शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. शिबिराचे उद्घाटन देवी सरस्वती व साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर, उपाध्यक्ष घनशाम अग्रवाल, सचिव ड रवींद्र जैन, सहसचिव डॉ.विनीत हरताळकर, विश्वस्त व मुख्याध्यापक नरेंद्र भावे, मुख्याध्यापिका आशा चित्ते, माधवी भावे यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिराचे प्रास्ताविक नरेंद्र भावे यांनी केले. डॉ. विकास हरताळकर यांनी सर्व शिक्षकांना शिबिर घेण्याचा उद्देश समजावत शुभेच्छा दिल्या.


पहिल्या दिवशी विद्यालय माझे देवाचे मंदिर हे गीत उपशिक्षिका वंदना वनारसे, माधुरी हळपे, नूतन चौधरी, ज्योती अडावदकर, वैशाली आढाव यांनी सादर केले. शुभांगी बोरसे यांनी शिक्षकांकडून नित्यस्मरण म्हणवून घेतले. पूर्व चाचणी शिक्षकांकडून सोडवून घेण्यात आली. पहिले सत्र राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची दिशा व अपेक्षा हा विषय घेत नरेंद्र भावे यांनी घेतले. ओमकार घेत दुसरे सत्र अध्ययन स्तर अध्ययन निष्पत्ती व एकविसाव्या शतकातील कौशल्य यावर पवन लाठी यांनी घेतले. तिसरे सत्र 21व्या शतकातील कौशल्यासाठी मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे, आव्हान देणे यावर जावेद तडवी यांनी घेतले.
दुसऱ्या दिवशी विद्यापीठ गीत हे उपशिक्षिका ज्योती अडावदकर, वंदना वनारसे, शितल पाटील, राजेश्वरी भालेराव यांनी सादर केले. राधेश्याम पाटील यांनी शिक्षकांकडून नित्यस्मरण म्हणून घेतले. पहिले सत्र विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीचा सन्मान करणे, शिकण्याची गती वाढवणे व तंत्रज्ञानाचे उपयोग यावर जितेंद्र देवरे यांनी घेतले. दुसरे सत्र वर्ग व्यवस्थापनेतून अध्ययन व्हावे चैतन्यदायी यावर संजय सोनवणे यांनी घेतले. तिसरे सत्र नवोपक्रम व अध्ययन मोकळ्या तासिकेचे नियोजन व शिक्षण यावर नरेंद्र भावे यांनी घेतले.

         समारोपाला झालेल्या प्रशिक्षणावर आधारित सर्व शिक्षकांची चाचणी परीक्षा घेतली. शिबिरासाठी आकर्षक रांगोळी, डिजिटल बॅनर व छायाचित्रण कलाशिक्षक राकेश विसपुते यांनी केले. शिबिरात प्राथमिक व माध्यमिक विभागाचे चाळीस शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.   
















Thursday, 6 June 2024

पत्रास कारण की...

पत्रास कारण की...

प्रियवर्ती वाचक, 

सस्नेह नमस्कार.

विवेकानंद विद्यालयातील उपशिक्षक श्री.विजेंद्र महाजन सर यांनी इ. ६वी अ च्या वर्गात पत्रलेखन हा उपक्रम राबविला त्यात सुरुवातीला विद्यार्थ्यांना त्याबद्दल मार्गदर्शन केले व कच्चे काम म्हणून वहीत पत्रलेखन करवून घेतले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना पोस्टकार्ड पुरविले व आपले नातेवाईक, लेखक, कवी,साहित्यिक,खेळाडू किंवा विद्यार्थ्यांना ज्यांना पत्र पाठवावेसे वाटेल त्यांना पत्र पाठवावे असे सांगितले. सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने या छान उपक्रमात सहभाग घेतला. 

पर्वणी वैद्य व गिरीराज पाटील या विद्यार्थ्यांना लेखिका प्रा.प्रभाजी बैकर यांची पत्रोत्तरे आली. या लेखिकेचा इ,सहावीच्या मराठी विषयाच्या पुस्तकात  'मले बाजाराले जायचं...' ही छान नाटिका अभ्यासक्रमात आहे.  विद्यार्थ्यांना ही छान शिदोरी लाभली याचा अतिशय आनंद वाटला.  अलिकडच्या काळात पत्रलेखन हे लोप पावत चाललंय असं म्हटलं जात असलं तरी सदानंद भावसार (पारोळा), डॉ. सर्वेश सोनी (नाशिक), श्री.लोहार(पुणे), प्रकाश देशपांडे (पुणे), मयूर दंतकाळे (अक्कलकोट), उदयकुमार पोतदार(बार्शी),श्री.दत्ता कोठावदे (नाशिक),निकेत पावसकर (सिंधुदुर्ग) यांनी व यांच्यासारख्या अनेक छंदप्रेमी लोकांनी या कलेला जीवंत ठेवलंय व त्याला एक वेगळीच उंची प्राप्त करुन दिलीय. विशेष म्हणजे अशा विविध छंद जोपासणाऱ्या छंदिष्ट लोकांना *छंदोमयी या WhatsApp* समूहाच्या माध्यमातून एकत्र आणण्याचे नोंद घेण्याजोगे काम *प्रसाद देशपांडे (नाशिक)* हे खूप चांगल्याप्रकारे करताय हे नमूद करतांना विशेष आनंद वाटतो. 
लेखिका प्रा. प्रभाजी बैकर (धुळे) यांचे कु. पर्वणी वैद्य
या विद्यार्थिनीस आलेले पत्रोत्तर

 'चला हवा येऊ द्या...' यासारख्या
कार्यक्रमातील
 अरविंद जगताप यांनी सामाजिक जाणीवांवर लिहिलेली आणि सागर कारंडे यांनी पोस्टमन काकांच्या भूमिकेत आपल्या दर्दी आवाजात वाचलेली पत्रं प्रेक्षक, वाचक व श्रोत्यांना साद घालतात आणि कधी कधी तर डोळ्यांच्या कडा ओलांडायलाही भाग पाडतात म्हणूनच त्याला भरभरुन दादही मिळते.

श्री. विजेंद्र महाजन सर यांनी अतिशय सुंदर अशा उपक्रमाद्वारे चिमुकल्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी प्रेरणा दिली, त्यांना लिहितं केलं ही स्तुत्य बाब आहे. त्याबद्दल सरांचं सहर्ष अभिनंदन आणि या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप कौतुक तसेच त्यांच्या आईबाबांचं व कुटुंबियांचंही सहर्ष अभिनंदन. शुभेच्छांसह...!

~प्रसाद वैद्य 

भ्रमणध्वनी- ९४२०११२२१५

(आपल्या प्रतिक्रिया Post a Comment Box मध्ये जरुर नोंदवाव्यात ही नम्र विनंती.)