My YouTube Channel

Click here to visit My YouTube Channel

Monday, 29 August 2022

पण थोडा उशीर झाला ६ वीच्या मराठी पाठावर एका शिक्षकाचा #अभिप्राय

 पण थोडा उशीर झाला ६ वीच्या मराठी पाठावर  एका शिक्षकाचा #अभिप्राय

🟣 पालघर 

................अन् माझा अख्खा वर्ग ढसाढसा रडला !

आदरणीय लेखक, 

श्रीयुत संदीप हरी नाझरे,

      आपणांस सस्नेह सप्रेम नमस्कार.

 पण थोडा उशीर झाला.....  हा तुम्ही लिहिलेला पाठ महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने इयत्ता  ६ वीच्या मराठी बालभारती या विषयात सहाव्या अनुक्रमांकावर समावेशित केलेला आहे. त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!

       माझ्या शाळेत मी इयत्ता सहावीचा वर्गशिक्षक आहे. मराठी विषयाचे अध्यापन करतो. दिनांक २५ ऑगस्ट २०२२ रोजी मी नित्याप्रमाणे अध्यापन करण्यासाठी माझ्या वर्गात प्रवेश केला. सगळी मुलं प्रसन्न चेहऱ्याने बसली होती. आज नवीन धडा शिकायला मिळणार म्हणून उत्साहात होती. साऱ्या वर्गावरून मी एक नजर फिरवली. सगळी मुलं-मुली मराठीचे पुस्तक काढून प्रसन्न मुद्रेने कधी माझ्याकडे पाहत होती तर कधी पुस्तकाकडे पाहत होती. नवीन धडा शिकवायचा म्हणून मी ही लगेचच हर्बटच्या पंचपदीने सुरुवात केली. विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान जागृत करावे म्हणून प्रस्तावना केली.

 सांगा मुलांनो, " देशाचे संरक्षण कोण करतात?"  एक मुखी उत्तर मिळाले,"  सैनिक!"  मी दुसरा प्रश्न विचारला,  "तुम्हांला शाळेत पाठवण्याची तयारी घरी कोणाकडून केली जाते?"  परत विद्यार्थ्यांनी एक मुखी उत्तर दिले, "आईकडून!" मग मी तिसरा प्रश्न विचारला ,"शाळेत तुम्ही उशिरा आल्यावर शिक्षकांना काय सांगता?" मुलं म्हणाली," सॉरी सर, .....पण आज थोडा उशीर झाला!" 

      .....तर मग आज आपण पण थोडा उशीर झाला हा सहावा पाठ शिकणार आहोत.  असे म्हटल्यावर सर्व मुलांनी सहावा पाठ , पुस्तकाचे पान नंबर २१ काढले. मी फलक लेखन केले.  मी तुमचा लेखक परिचय  वाचून आपल्याविषयी माहिती दिली. पाठाच्या पहिल्या परिच्छेदाचे प्रकट वाचन करून अर्थ स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केली.

     पाठ संदर्भ: - कारगिल काश्मीर सरहद्दीवरील........ असं हे तिकडचे वर्णन ऐकताना सगळी मुलं भावविभोर झाली. तेथील आल्हाददायक नैसर्गिक वर्णन ऐकताना सगळी मुलं वर्गातच बसून मनाने मात्र  कारगिल सिमारेषेवर आणि कश्मीरला पोहोचली. तिथल्या सीमेवरील धगधगत्या तणावपूर्ण वातावरणाचे वर्णन ऐकताना सारे जण टक लावून माझ्याकडे पाहत होती. उन्हाळ्यातील तेथील अल्हाददायक वातावरण व वसुंधरेचे वर्णन ऐकताना सगळ्यांचे चेहरे सुखावत होती. 

        पाठ संदर्भ:- सैनिकांच्या बटालियनमध्ये पोस्टमन आठ- पंधरा दिवसांनी येत असे. ........ ही ओळ वाचल्यानंतर लगेचच मी खिशातला मोबाईल काढला. आणि youtube वर बॉर्डर चित्रपटातील 'संदेसे आते है' हे व्हिडिओ असलेले गाणे मोबाईलवर लावून मुलांना दाखवू लागलो.  सगळी मुलं हास्य मुद्रेने व आनंदाने गाणे ऐकू व पाहू लागले.  त्यातील व्हिडिओ पाहून त्यांना खूपच आनंद झाला. गाण्यातील भावार्थ आणि पाठातील आशय  समर्पकतेने परफेक्ट जुळला.  मुलांमध्ये हळूहळू जिज्ञासा वाढू लागली; की पाठामध्ये पुढे काय असेल ?  

     पाठ संदर्भ:- बायकोने पाठवलेलं आंतरदेशीय पत्र घेऊन मी बंकरकडे वळलो. पत्रावर तिच्या आसवांच्या सुकलेल्या डागांशिवाय काहीच लिहिलेलं नव्हतं. ...... यावर  स्पष्टीकरण देताना मला खूप अवघडल्यासारखे झाले होते. कारण तुम्ही तिथे म्हणता, " पत्रात तर काहीच लिहिलं नव्हतं. परंतु ते  बोलकं पत्र मी बराच वेळ वाचत बसलो होतो."  या  आपल्या वाक्यांनी सगळया विद्यार्थ्यांचे चेहरे अचंबित  झाले होते.  त्या वाक्यातील भावनांची साद मुलांना समजणे;  हे मात्र त्यांच्या भावनिक वलयाच्या सीमारेषापलीकडचे होते. मग मी सैनिक पत्नीच्या मनात आपल्या पतीबद्दल उचंबळून आलेल्या भावना पत्रात व्यक्त करीत असताना तिचे मन दाटून आले आणि डोळ्यात अश्रू धावून आले. म्हणून पुढे काही पत्रात लिहिता आले नाही. पत्नीच्या मनातील घालमेल....तो विरह...  असे वर्णन सांगताना बऱ्याच मुला- मुलींच्या डोळ्यात पाणी आले. खिन्न मनाने सगळेजण नाराज झाले. " ......पण तिला देशसेवेची जाणीव होती." असे मी मोठ्याने बोलताच सैनिक पत्नीच्या मनाभोवती घुटमळत असलेली सगळी मुलं भानावर आली.

     पाठ संदर्भ:-  सुखदेवने गावाकडचा सांगावा सांगितला. "संदीप, तुझ्या आईचं दुखणं वाढलं रे!" हे ऐकताच लेखकाच्या काळजात चर्रर्र झालं. त्यांच्या मनात भीती निर्माण होऊन धडधड सुरू झाली. लेखकाचा जीव घाबरा -घुबरा झाला. मन सैरभैर झालं. नि लेखकाच्या डोळ्यातून अश्रू होऊ लागले.  हे असे वर्णन करताना माझ्या वर्गातील सगळी मुलं शांत नि:स्तब्ध होऊन स्पष्टीकरण ऐकत होती. 

मी सुद्धा धडा शिकवण्यात रंगून गेलो होतो . एकपात्री अभिनयात घुसलो होतो. कधी लेखक... तर कधी लेखकाचा मित्र... तर कधी लेखकाची आई अशा भूमिकेत पाठातील आशयाचे वर्णन एकपात्रीने सादर करत होतो. पाठातील भावनिक प्रसंग ऐकताना वर्गातील सगळी मुलं -मुली आत्ता मात्र डोळ्याची पापणी देखील न हलवता माझ्या  शिकवण्याकडे टक लावून बघत होती. ऐकत होती.

      तर.... लेखक सैनिक आईच्या भेटीसाठी बॉर्डरवरून निघाला. तेथून त्याचा गावाकडे येण्याचा प्रवास सुरू झाला. प्रवासातील तगमगता..... बैचेनता..... ती अस्वस्थता.....आईची चिंता ......असं हे सगळं मनावर घेत तो मजल दरमजल करीत आपल्या गावच्या वेशीवर आला . पण अगदी काही थोड्या वेळापूर्वीच आपली आई हे जग सोडून गेली. हे लेखक सैनिकाला माहित नव्हते. गावातून पुढे -पुढे चालत असताना गावात स्मशान शांतता दिसत होती. प्रत्येक जण सैनिकाकडे कावराबावरा होऊन बघत होता. घरासमोर येताच ती लोकांची गर्दी पाहून सैनिकाने काहीतरी विपरीत घडल्याचं ताडलं. नि हातातल्या ट्रंका तिथेच सोडल्या. अन्  "आई$$$$$$  म्हणून हंबरडा फोडत  धावत घराकडे........ यातील वर्णनाचे  नाट्यीकरण करताना मी मुलांचे चेहरे वाचत होतो. न्याहाळत होतो. अक्षरक्ष: मुलांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या.  'माझं लेकरू आलं!'  "म्हणून मला बोलशील का गं आई ?" ही वाक्ये तुमच्या भावनिक अतिव दु:ख वेदनेने,  हावभावयुक्त आणि धीरगंभीर, दु:खी आकांत आवाजात मी बोलून दाखवल्यावर मात्र , इतका वेळ हुंदका आवरून बसलेली मुलं-मुली मात्र हुंदके देत- देत ढसाढसा रडू लागली. मुलं अक्षरक्ष: स्वतःलाच  विसरली होती . कसल्याच गोष्टीचे त्यांना भान नव्हते. सर्वजण पूर्णपणे पाठातील नायकाच्या भूमिकेत शिरले होते.  जसजसे वर्णन ऐकत होते ; तसतसे त्यांच्या डोळ्यापुढून ते चित्र हळूहळू सरकत होते. बाकावर बसलेल्या मुलांची  निच्छलता आपल्या आईच्या भेटीसाठी वेग धरू पाहत होती....

            मुलं शरीराने वर्गात बसली होती;  पण मनाने मात्र कारगिल-काश्मीर वरून लेखक सैनिकाच्या गावात आली होती .  गावातील एखाद्याचे निधन झाल्यावर त्या प्रसंगात गढून गेली होती . मुलांची अशी अवस्था झाली होती की,  हातापायाची अजिबात हालचाल होत नव्हती. ती 'आकडी आल्यागत आकडून' गेली होती.  सगळी मुलं मूर्ती-पुतळ्यागत बसून वाहणाऱ्या झर्यासारखं फक्त रडत होती. दाटून येणारा आवंढा गळ्यातल्या गळ्यात गिळत होती. ती पुन्हा- पुन्हा रडत होती.

   " भेटीसाठी आलो होतो गं आई!.... पण थोडा उशीर झाला!"  असे म्हणत लेखक मोठमोठयाने रडू लागली. या वर्णनातील नाट्यीकरणाने अख्या वर्ग हमसून- हमसून ढसाढसा रडू लागला. शिकवता - शिकवता माझ्याही डोळ्यात अश्रू आले. 

 पाठ संपला. म्हणून दोन मिनिटे मान खाली घालून मी शांत उभा होतो. सगळी मुलं रडत होती. थोड्या वेळानंतर एक मुलगी रडत -रडत मला म्हणाली , "सर, सैनिक येईपर्यंत त्यांची आई जिवंत राहायला पाहिजे होती." मी मात्र निशब्द झालो. थोड्या वेळानंतर एक मुलगा रडत- रडतच माझ्याजवळ आला नि मला म्हणाला, " सर, सैनिकाची आई हे जग सोडून गेली. आपण त्यांच्या आईला श्रद्धांजली वाहू या ना !" मलाही त्याचे म्हणणे पटले. मग मी लगेचच मुलांना धीरगंभीर सुरात हळव्या मनाने सूचना दिली. सर्व मुले २ मिनिटे उभे राहून सैनिकांच्या आईला श्रद्धांजली वाहिली. दोन्ही हात जोडून " ओम शांतीशांतीशांती.... म्हणत बाकावर बसली. पण......पण त्यांच्या डोळ्यातून अश्रू मात्र वाहतच राहिले होते .

माननीय संदीप नाझरे सर,

 पाठात सैनिकांच्या मनातील देशप्रेम व आईबद्दलची ओढ यातील भावविभोर करणारा प्रसंग चित्रित करून तुम्ही मुलांमध्ये देशप्रेम आणि आईबद्दलचा आदर द्विगुणित केलात. तशी प्रेमभावना वाढीस लावलात. हा पाठ शिकताना सगळी मुलं हळवी झाली होती. आपल्या पाठाशी समरस झाली होती. ती एकरूप झाली होती. मुलांना शिक्षा केल्यावर ती  रडतातच ...पण धडा शिकताना ती ढसाढसा रडतात. हा अध्ययन-अध्यापनातील जीवंत अनुभव मात्र पाठाची उद्दिष्टे साध्य करणारा ठरला. ६ वीच्या मराठी पाठ्यपुस्तकाच्या प्रारंभी पाठ्यपुस्तक मंडळाचे संचालक माननीय च.रा. बोरकर यांनी प्रस्तावनेत व्यक्त केलेले विचार, अनुभव कथन, क्षमता , उद्दिष्टे साध्य होताना मला प्रत्यक्षात अनुभवता आली. 

        आपली लेखन शैली खुपच सुंदर आहे. मार्मिक आहे. लेखणीच्या माध्यमातून थेट मुलांच्या ह्रदयाला हात घालण्याचे ओघवते कौशल्य खुपच वाखाणण्याजोगे आहे. पाषाण ह्यदयी काळजालाही पाझर फोडण्याची ताकद तुमच्या लेखणीत आहे. मुलांचे भावविश्व तरल व्हावे , ते अनुभवसंपन्न व्हावे. समृद्ध व्हावे. याकरिता तुम्ही केलेल्या लेखनाला मानाचा मुजरा ! 

आपले मनपूर्वक हार्दिक अभिनंदन💐 आणि आभार ! 🙏🏻

© - दर्शन भंडारे, सहाय्यक शिक्षक ,

प्राथमिक विद्यामंदिर भगिनी समाज , पालघर.

दिं २८ ऑगस्ट  २०२२ 

भ्रमणध्वनी: ८०८७१३७२३६.

~संकलन 

~प्रसाद वैद्य 

भ्रमणध्वनी -९४२०११२२१५

Friday, 26 August 2022

शुभेच्छा पत्र- टी.एम.चौधरी सर

वाढदिवसाच्या सस्नेह शुभेच्छा

रुग्णवत्सल चंदन हृदयी माऊली आणि समाजाची माया-ममतेची सावली असलेले आदरणीय डॉ.विकासकाका,

वाढदिवसानिमित्त आपले अगदी मनाच्या गाभाऱ्यातून खूप खूप अभिनंदन... आणि अभीष्टचिंतन...!

श्री.काकासाहेब,

आपण म्हणजे एक चाफ्याचे फूल की जे स्वर्गातून धन्वंतरी देवाच्या खांद्यावरून महाराष्ट्राच्या धुळीत पडले.वैद्यकीय व्यवसातील एक सुंदर अन् गोड स्वप्न आपण आहात.

रूग्णसेवेचे पाईक तुम्ही

परोपकारी आचार

रूग्णांचा आधार तुम्ही

सदा त्यांचाच विचार

मायेच्या स्पर्शात तुमच्या

ईश्वराचा साक्षात्कार

असं आपल्या संदर्भात म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.

आधार दु:खितांचे होतात हाल ज्यांचे।

सेवेत धर्म आहे सेवेत तीर्थ आपुले।।

वैद्यकीय व्यवसायाला'सेवाधर्म' मानणारी बोटावर मोजता येतील अशी जी मंडळी आहेत.त्यांच्यात आपले स्थान अग्रणी,अव्वल आहे.जगायला संजीवनी देणारे 'देवमाणूस अन् देवदूत' आपण आहात.

"परमेश्वराने आम्हाला जन्म दिला पण काकांनी पुनर्जन्म दिला"

अशा भावपूर्ण शब्दांमध्ये आपल्या दवाखान्यातून औषधोपचार घेऊन पूर्ण बरे झालेले रुग्ण आपल्याप्रती व्यक्त करतात.हीच आपल्या रूग्णसेवेची खरी कमाई आहे.अनेकांना आयुष्यात स्वत:च्या पायावर उभं  राहण्याची असिम शक्ती देणारा'माणूस' म्हणूनही आपल्याला ओळखलं जातं.माणसाच्या मनातील शक्ती जागृत केली की कोणतंही असंभव काम शक्य होऊ शकतं.याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपण आहात.

सदैव प्रसन्न,हासरा चेहरा तसेच उत्साही, चैतन्यदायी,आनंदी,स्वानंदी आणि परमानंदी आपलं व्यक्तिमत्व रुग्ण पाहताच त्याचा अर्धा आजार, वेदना व दु:ख नाहीसं करतं.

स्व.श्रध्देय आदरणीय ज्ञानतपस्वी, शिक्षणतज्ज्ञ नानासाहेबांनी दिलेले संस्कार घेऊन वैद्यकीय व्यवसायात पदार्पण केले आणि ते संस्कार आजही आपण अलंकारासारखे मिरवित आहात.आपल्या सेवादायी विचारातून प्रेरणा घेऊन रूग्ण व समाजसेवेसाठी आपले चिरंजीव डॉ.विनितदादा आणि डॉ.अमितदादा पुढे आलेले आहेत.हा दिलासा आपणास कुठल्याही पुरस्कारापेक्षा अधिक मोलाचा वाटतो.आपल्या जीवनाचं ईप्सित साध्य झाल्याचं समाधान आपल्या चिरंजीवांकडे पाहिल्यावर आपल्याला नक्कीच मिळत असेल.

डॉ‌.विनितदादा आणि डॉ.अमितदादा खऱ्याअर्थाने'कोरोनायोध्दा' ठरले आहेत.त्यांनी कोरोना काळात देवासमान काम केले.आपलं हरताळकर हॉस्पिटल म्हणजे देव्हारा आणि त्या देव्हाऱ्यातले देव म्हणजे डॉ.विनितदादा आणि डॉ.अमितदादा.

कोरोना आटोक्यात आणणं हे मोठं दिव्य होते.अशाही परिस्थितीत हार न मानता जेव्हा जवळचे लोक दूर राहत होते तेव्हा कोरोना रूग्णांना जगविण्यासाठी आपल्या स्वत:च्या जीवाची पर्वा न करता हे आपले डॉक्टर्स बंधूद्वय धडपडत होते.अहोरात्र झटून आपल्या सामाजिक दातृत्वाच्या भावनेचे व माणूसकीचे दर्शन त्यांनी घडविले.रूग्णांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून रूग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना खचू न देता त्यांना धैर्य, स्थैर्य देण्याचं महान कार्य केले.यांची कामगिरी नक्कीच देवदूतापेक्षा कमी नाही, हे मात्र निर्विवाद...!

आदरणीय श्री.काकासाहेब आपण 'त्रिदेव' खरोखरच आदर्श रूग्ण व समाजसेवेचे प्रतीक आहात.आपल्या सेवामय कार्यास आमचा मानाचा त्रिवार मुजरा अन् कडक सलाम...!

पर्वत असतील अनेक

पण हिमालय ही शान आहे

वृक्ष असतील अनेक

पण चंदनाला मान आहे

खूप भेटले डॉक्टर्स पण...

आमच्या जीवनात, ह्रदयात काकासाहेब, आपणास आणि आपल्या हरताळकर परिवारास आदराचं अढळ स्थान आहे.

आपल्याला सेवामय कार्य करण्यासाठी निरामय उदंड दीर्घायुष्य लाभो.हीच ईश्वर चरणी अत्यंत मनापासून मनापर्यंत मनभरून प्रार्थना...!

प्रकटदिनाच्या अनेकोत्तम अनंत आभाळभर शुभेच्छा...

द्वारा- टी.एम.चौधरी सर

~संकलन-प्रसाद वैद्य

वाढदिवसाच्या सस्नेह शुभेच्छा

 वाढदिवसाच्या सस्नेह शुभेच्छा 

आदरणीय डाॅ. विकासकाका,
आपणास वाढदिवसाच्या सस्नेह शुभेच्छा (25 ऑगस्ट) आणि निरामय आरोग्यासाठी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. काकांच्या वाढदिवसानिमित्त  पोस्ट ऑफिस, चोपडा तर्फे पहिलं  My Stamp (तिकीट) प्रसिद्ध करतांना पोस्टमास्तर मा.श्री.अतुलजी बोरोले, सोबत  श्री.मनोज पाटील,व श्री.सिद्धांत बडवाईक यासाठी श्री.प्रसाद डाफणे (पोस्ट मास्तर,परभणी) श्री.अंकित अग्रवाल सर (भुसावळ) यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. शुभेच्छांसह...  
✍🏻📘📚📖  ~प्रसाद वैद्य व परिवार


Tuesday, 2 August 2022

नागपंचमी विशेष : सापांबाबतची ही रोचक तथ्ये आपण वाचलीत का?

 नागपंचमी विशेष : सापांबाबतची ही रोचक तथ्ये आपण वाचलीत का?

श्रावण मास सुरु झाला की ऊन-पावसाचा खेळ नवीन रंगात रंगतो. वसुंधरा मातेला हिरव्यागार वस्त्रात पाहून सर्वांना आत्मिक शांती व सुखावणारा आनंद लाभतो. सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. भारतीय संस्कृतीतील सण कृषिकर्म , ऋतुचक्र व ऋतूंमधील पारंपारिक आहारातील पदार्थ या त्रीसूत्रावर आधारलेले दिसून येतात. श्रावण मासाच्या सुरूवातीलाच नागपंचमी हा सण असतो. श्रावण शिरव्यांची नियमित हजेरी असते. या कालावधीमध्ये सर्पांच्या गतिविधि जास्त प्रमाणात दिसून येतात. अनेक ठिकाणी सर्प निघाला याविषयीच्या घटना माहित पडतात. तर काही ठिकाणी सर्पदंश झाला अशी बातमी कानावर येते. या घटनांचा आधार घेत नागपंचमी सणाला नागदेवतेची सदैव कृपा असावी , सापांपासून आपले रक्षण व्हावे या हेतूने घराघरात नागपंचमी सण साजरा केला जातो.

नागदेवतेचे चित्र , मातीची प्रतिकृती , भिंतीवर काढलेली नागदेवतेची चित्रे , देवघरातील नागाची प्रतिकृती इ .ची नैवेद्य व पूजन सामग्री अर्पण करुन प्रार्थना केली जाते. लहानथोर , शेतकरी - मजूर , महिलावर्ग सापाची बीळ शोधून त्या ठिकाणी दूध व पूजा अर्चा श्रद्धेने अर्पण करतात. खरेतर यामागे हिंदू धर्मिय सण साजरा करण्याच्या पद्धतीत विज्ञान दडले आहे. सापांचे अन्नसाखळीतील मोलाचे स्थान व महत्त्व या सणाद्वारे अधोरेखित होते. सापांचे संरक्षण व संवर्धन व्हावे हा भूतदया विचार व्यक्त होतो. निसर्गातील प्रत्येक सजीव हा मानव व इतर सजीवांशी घनिष्ठ संबंध राखतो हे संस्कार बीज यातून रुजते.परंतु सापांबद्दल आजदेखील जनमानसात काही समज व गैरसमज रूढ आहेत. त्यातील काही आपण समजून घेऊ.

1. नागास ठार केल्यास नागिन बदला घेते ? डूख धरते ?

कोणत्याही नागाची स्मरणशक्ती पूर्णतः विकसित नाही. त्यामुळे त्यास काहीही स्मरणात राहात नाही. खाद्य अथवा समागमोत्सुक मादीच्या शरीरातुन बाहेर पडणाऱ्या स्त्रावाचा गंधाचा मागोवा घेत नाग माग काढतात. प्रजनन कालावधी शिवाय नाग व नागिन कधीही सोबत राहत नाही. त्यामुळे नाग व नागिन कधीही एकमेकांचा बदला घेत नाहीत.

2. नाग पुंगीवर डोलतो कसा ?

नाग अथवा कोणत्याही सापाला कान नसतात. त्यामुळे कोणतेही संगीत , गाणे अथवा ध्वनी ऐकू शकत नाही. त्याऐवजी समोर दिसणारी व हलणारी वस्तूवर लक्ष राखून हल्ला करण्याच्या पावित्र्यात तो असतो. पुंगी ऐवजी इतर वस्तू जरी धरली तरी त्याकडे नाग आकर्षिला जातो. सर्प प्रजातीमध्ये फक्त नाग फणा काढू शकतो. म्हणून गारुडी खेळात बहुतांश वेळा नागच दाखवतात.

3. इच्छाधारी नाग अथवा नागिन खरच असतात का ?

नाग शंभर वर्षांपेक्षा जास्त जगला की तो इच्छाधारी होतो. तो स्वयम् शक्तिमान बनतो. या बाबी पूर्णतः अंधश्रद्धा आहेत. नाग अथवा इतर कोणताही साप शंभर वर्षे जगल्याची आतापर्यंत नोंद नाही. माणसाबरोबरच निसर्ग साखळीतील मुंगूस, गरुड , घार , मोर , ससाणा हे सापाचे मोठे शत्रू आहेत. अजगर जास्तीत जास्त 30 ते 35 वर्षे जगले याच्या नोंदी आहेत.

4. नागमणी खरच असतो का ?

नागमणी प्राप्त झाल्याने धनसंपदा येते. हा मोठा गैरसमज आहे. जर हे खरे असते तर सर्व गारुडी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिले असते. नागमणी ही एक फक्त दंतकथा

म्हणून प्रचलित आहे. काचेचे मणी , बेन्ज़ाईनचे खडे नागमणी म्हणून भासवले जातात.

5. नागाला केस असतात...?

नाग सस्तन प्राणी नसल्याने त्याच्या अंगावर केस नाहीत. बऱ्याचदा गारुडी शेळी - मेंढी चे केस नागाच्या शरीरावर खाच पाडून खोटं दाखवतात.

6. साप दूध पितो ?

साप कधीही दूध पीत नाही. ते बळजबरी पाजल्याने सापाचे आतडे व फुफ्फुसे प्रभावित होतात.

7. मंत्र विधीने विष उतरवता येते का ?

आपल्याकडील बिग फोर ( नाग , मण्यार , घोणस ,फुरसे ) सोडून बहुतांशी सर्प प्रजाती बिनविषारी आहेत. सर्पदंश झालेली व्यक्ती अत्यंत घाबरलेली व मानसिक धक्का घेऊन असते. अश्या परीस्थितीत मांत्रिकाचे दावे प्रभाव टाकतात. फक्त योग्य वैद्यकीय उपचारच सर्पदंशावरती रामबाण उपाय आहे.

8. साप चावल्यावर मिरची व कडुलिंब देखील गोड लागतो ?

सर्पदंश हा विषारी सापाचा असेल तर जिभेला संवेदना राहत नाही. त्यामुळे प्रभावित झालेली व्यक्ती ला चव कळत नाही.

9. सर्व प्रकारचे सर्प विषारी असतात का ?

अजिबात नाही. सर्वसामान्यपणे आपल्याकडे चार जातीचे विषारी साप आढळतात. नाग , मण्यार , फुरसे व घोणस. याशिवाय इतर जाती बिनविषारी आहेत तर मोजक्या निमविषारी आहेत परंतु घातक नाहीत.

10. नाग धनाचे रक्षण करण्यासाठी तिथे फिरतो ?

भग्न इमारती , खूप जुनी घरे , अडगळीची ठिकाणे , पडक्या वास्तू अशा निर्मनुष्य ठिकाणी सर्प बिळात , तड्यांमध्ये लपून असतात. अशा ठिकाणी नवीन बांधकाम करताना प्राचीन कालावधीतील पुरलेले ऐवज जर आढळल्यास हा गैरसमज दृढ होतो.

11. धामण साप गाई-म्हशीच्या पायाला विळखा घालून दूध पितो ?

कोणत्याही सापाचे अन्न दूध नाही. त्यामुळे धामणच काय तर कोणताही प्रकारचा साप दूध पीत नाही.

12 . साप उलटा झाल्यावर विष चढते का ?

सापाचे दात आतील बाजूस वळलेले असतात. काही वेळा सापाचे दात चावल्यानंतर अडकतात. ते दात सोडवण्यासाठी साप उलटा होतो. साप उलटा जरी झाला नाही व तो विषारी असेल तर विष चढते.

13. काहीवेळा महादेवाच्या पिंडीवर नाग आढळून येतो ?

बऱ्याच मंदिराच्या जवळपास मंदिरातील निर्माल्य , वापरलेली पूजा सामग्री , उरलेले मिष्ठान्न लगतच्या परिसरात टाकलेले असते. तेथें उंदरांची सतत हजेरी असते. उंदीर हे सापांचे मुख्य खाद्य. यानिमित्त साप मंदिर परिसरात बऱ्याचदा आढळतात. गाभार्‍याच्या जल नलिकेतून बऱ्याच वेळेस नागपिंडी वर येऊन बसतात.

सापांपासून होणारे फायदे -

1 साप उपद्रवी उंदीर व घुशीवर नियंत्रण ठेवतात.

3 काही साप पाण्यावरील डासांची अंडी खाऊन डेंगू , मलेरिया सारखे आजारपासून आपले रक्षण करतात.

2 सापांच्या विषाचा उपयोग कॅन्सर , हृदय विकार , रक्तदाब ,

अनेस्थेशिया , वेदनाशामक औषधी बनवण्यासाठी होतो.

4 विषारी साप चावल्यावर दिले जाणारे औषध विषारी सापापासूनच तयार करता येते.

5 बऱ्याच प्रकारचे कीटक व पिकांवरील अळीवर साप नियंत्रण ठेवतात.

6 खापर खवल्या , वाळा, मांडूळ सारखे साप जमीन पोखरतात. त्यामुळे जमीन भुसभुशीत होवुन सुपीकता वाढते.

भारतीय नाग

चार मुख्य विषारी सापांची माहिती -

1 भारतीय नाग -

वर्णन - शरीराचा रंग तपकिरी , काळा , राखाडी , पिवळसर गव्हाळ. डोळे मोठे व बाहुली गोल. फण्याच्या मागे काळ्या रंगाचा चष्मा आकृती किंवा मोडी लिपीतील दहाचा आकडा.

काहींमध्ये वरील आकृती नसतेच. खवले गुळगुळीत.फण्याच्या

समोरील बाजूस दोन काळे मोठे ठिपके दिसतात.

लांबी - सरासरी 3.5 ते 7 फूट.

प्रजनन - अंडज - एप्रिल-मे दरम्यान मादी 10 ते 15 अंडी

घालते.सुमारे 50 ते 70 दिवसांनी पिले बाहेर पडतात.

खाद्य - उंदीर , बेडूक , सरडे व इतर साप.

2 मण्यार -

वर्णन - अति विषारी. शरीराचा रंग काळा , गडद तपकिरी.

त्यावार पांढऱ्या ठिपक्यांचे जोड्यांचे पट्टे.ओठ पोटाकडे

रंग पांढरा. डोळे बारीक व काळे. खवले गुळगुळीत व चमकदार. आखूड शेपूट.

लांबी - 3 ते 5.5 फूट

प्रजनन - अंडज - मार्च ते मे दरम्यान मादी 7 ते 12 अंडी घालते.

खाद्य - छोटे सर्प , सरडे , पाली , उंदीर.

घोणस

3 घोणस -

वर्णन - शरीराचा रंग तपकिरी , पिवळसर तपकिरी , गडद तपकिरी. त्यावर पांढरी किनार असलेला गडद तपकिरी गोल

ठिपक्यांच्या तीन रांगा. शरीराचा खालचा भाग पिवळसर.

स्थूल गोलाकार शरीर. डोके चपटे - त्रिकोणी , शेपूट आखूड , डोळे मोठे , डोळ्यातील बाहुली उभी.

लांबी - 3.5 फुट ते 6 फूट.

प्रजनन - जारज - मे ते जुलै दरम्यान मादी 10 ते 70 पिल्ले देते.

खाद्य - उंदीर , बेडूक , घूस व इतर लहान सस्तन प्राणी.

4 फुरसे

वर्णन - तपकिरी त्यावर पांढरी जाळीदार नक्षी. मानेपासून शेपटीपर्यंत पाठीच्या मध्यभागी तपकिरी पांढरे ठिपके. डोळे काहीसे त्रिकोणी , डोक्यावर पांढरी किंवा फिकट तपकिरी

बाणाकृती खुण. डोळे सोनेरी व मोठे. डोळ्यातील बाहुली

उभी व काळी.

लांबी - सरासरी दोन फूट.

प्रजनन - जारज- मादी एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान 5 ते 17 पिलांना जन्म देते.

खाद्य - विंचू , पाल , सरडे , छोटे बेडूक , उंदीर.

सापांचे प्रकार तीन आहेत.

बिनविषारी , निमविषारी व विषारी.

1 बिनविषारी - या प्रकारच्या सापांमध्ये बिलकुल विष नसते.

विषारी सापांपेक्षा बिनविषारी सापांची संख्या खूप जास्त आहे. उदा- धामण , कवड्या , तस्कर , गवत्या , धूळनागीन इ .

2 निमविषारी - अंशतः विषारी असले तरी या सापांपासून मानवाच्या जीविताला धोका नाही. यांच्या दंशामुळे चक्कर येणे , मळमळ , डोकेदुखी यासारखी लक्षणे जाणवतात.

उदा- मांजऱ्या , रेती सर्प , हरणटोळ इ .

3 विषारी - या सापांचा दंश अतिशय धोकादायक असतो.

वेळेवर योग्य वैद्यकीय उपचार न झाल्यास जीवदेखील जाऊ शकतो.उदा - नाग , मण्यार , घोणस , फुरसे इ .

साप आणि वन्यजीव अधिनियम 1972 - वन्यजीवांना संरक्षण देणारा कायदा 1972 यावर्षी अमलात आला. याच सापांना देखील कायदेशीर संरक्षण मिळाले. साप पकडणे , ठार मारणे , प्रदर्शन करणे , तस्करीत करणे , जवळ बाळगणे , छळ करणे इत्यादी सर्व बाबी गुन्हे आहेत. त्याबाबतचे नियम अत्यंत कडक आहेत. तीन ते सात वर्षांची कैद व 10 ते 15 हजार रुपये दंड अथवा दोन्ही शिक्षा एकाच वेळेस होऊ शकतात. ऍनिमल क्रूएल्टी एक्ट मध्ये सुद्धा सापांना संरक्षण आहे.

सापांबद्दल काही रोचक तथ्य -

1 सर्प शीत रक्ताचा प्राणी असून 8 डिग्री पेक्षा कमी व 45 डिग्री पेक्षा जास्त तापमान सापांना सहन होत नाही.

2 साप अनेक दिवस अन्नाशिवाय राहू शकतात. भारतीय अजगर दोन वर्ष नऊ महिने काहीही न खाता जगण्याची नोंद आहे.

3 जगातील सर्वात विषारी साप बेलचर समुद्रसर्प असून त्याचे विष ब्लॅक मांबा पेक्षा देखील विषारी आहे.

4 मण्यार आशिया खंडातील सर्वात विषारी साप.नाग पेक्षा कितीतरी पट विषारी.

5 हरणटोळ हा भारतातील एकमेव आडवी बाहुली असलेला सर्प.

6 सापाच्या शरीरामध्ये 70 टक्के पाणी असते.

7 कोलूब्रीडी हे सर्पजगातील सर्वात मोठे कूळ असून जगातील

60 % जास्त सापांचा यात समावेश आहे.

8 व्हायपीरीडी हे सापांचे सर्वात विकसित कुळ आहे.

9 भारतात आढळणाऱ्या विषारी सापांपैकी घोणस सापाचे विषदन्त सर्वात मोठे आहेत.

10 काही साप अंडी तर काही पिल्ले जन्माला देतात.

11 सापाची दृष्टी कमजोर असून त्याला द्विमितीय प्रतिमा दिसते. परंतु हरण टोळ सापाला त्रिमितीय प्रतिमा दिसते.

सापांची संख्या कमी होण्याची कारणे -

मनुष्य जंगलावर करत असलेल्या अतिक्रमण आणि जंगलतोड.

महामार्गांची आणि वाहनाच्या संख्येने दरवर्षी फक्त महाराष्ट्रातच पाच लाखापेक्षा अधिक साप मृत्युमुखी पडतात.

मानवी वस्ती मध्ये आलेल्या सापांची भीती आणि अंध श्रद्धेपोटी होणारी हत्या.

प्रदूषणामुळे वातावरणात व पाण्यात होणारे बदल.

सापांची अंधश्रद्धेतून होणारी तस्करी व हत्या

रासायनिक खते व कीटकनाशकांमुळे सुद्धा सापांची संख्या घटत चालली आहे.

# हेमराज पाटील

पक्षी व वन्यजीव अभ्यासक ,

संस्थापक #सातपुडा निसर्ग संवर्धन संस्था , चोपडा.

केंद्रीय समिती सदस्य - वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाग , दिल्ली

आजिवन सदस्य - बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी , मुंबई.

संपर्क - 9922085434

email - satpudancschopda@gmail.com