My YouTube Channel

Click here to visit My YouTube Channel

Thursday, 2 March 2023

मैफल तालांची...


 मैफल तालांची...

(एक अल्लड बोल-अभिनय गीत)

असे एकदा     स्वप्नी आले

तबला डग्गा    बोलु लागले 

नवथर बोटें     नाचु लागली 

तालांची मग   मैफल सजली 

               ***


त्रिताल बोले     'धा धिं धिं धा'

जसा चमकतो   रुपया बंदा

टाळी आणिक   'खाली' मधला 

सम-प्रमाणी      शासक खंदा 

              ***

झप-तालाचे    रूप-आगळे 

दोन-तीनचे      छंद-वेगळे  

जणु-संवादे     वंदी-जनांना

धीना-धीधीना  तीना-धीधीना 

               ***

         रूपक   हसे-गाली

         पावलें   सात-चाली

         मारीतो  गोड-ताना

         तिंतिंना धीना-धीना   

                 ***

दादरा करीतो       भलता नखरा 

सहाच मात्रांत      मारीतो चकरा 

लाडीक स्वभाव   मोहक दागीना

धाधीना-धातीना  धाधीना-धातीना

                  ***

केहेरवा म्हणे       मी रंगीला

नर्तनातुनी           करतो लीला

चला नाचुया      एकदोन दोनतिन्

धागेनतिनकधिन् धागेनतिनकधिन् 

                  ***

एकताल मग   हसुन बोलला

राजा मी तर    मैफिलीतला  

मी तर देतो     भक्कम ठेका

चलन देखणे   माझे ऐका 

                ***

ताल-मंडळी   खुशीत सगळी

तबल्यामधुनी  बोलु लागली

समेवरी मग     अचूक येता

स्वप्न संपले      जाग जागली 

स्वप्न संपले      जाग जागली

                ***

~संकलन

Tuesday, 21 February 2023

स्व.केंगे सर,...

केंगे सर,एक शिक्षणसाधक हरपला...

:- राधेश्याम पाटील (9960068747)

     'देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती'... या बा. भ. बोरकरांच्या पंक्ती ज्यांच्यासाठी समर्पक वाटतात ते सुधाकर काशिनाथ केंगे अर्थातच केंगे सर.आज निवर्तले. यावर अजूनही विश्वास बसत नाही. खानं - पिनं,बोलनं मोजून मापून करणार हे लाघवी व्यक्तिमत्व होतं. मला कोणी प्रताप विद्यामंदिर चे मुख्याध्यापक, राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक, विवेकानंद विद्यालयाचे विश्वस्त यापेक्षा फक्त केंगे सर म्हणून लोक मला ओळखतात हीच माझ्यासाठी आनंदाची बाब आहे, एवढा सहृदयी होता हा माणुस.

         श्यामची आई मधला शामच त्यांचा राम होता, म्हणून साने गुरुजींचं त्यांना खूप अप्रूप होतं. लहानपणापासून मातृहृदयी साने गुरुजींचा संस्कार त्यांच्यावर झाल्याने तेही पुढे मातृहृदयीच झाले. साने गुरुजींच्या स्फूर्तीदायी गीतांनी त्याच्यात राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा व कर्तव्यनिष्ठा निर्माण केली व ती त्यांनी पुढे जपलीही. साने गुरुजींचा संस्कार घेऊन मोठं झालेलं हे व्यक्तिमत्व ; साने

गुरुजींचाच वसा घेऊन शिक्षणगंगेचे वारकरी झाले. त्यांचे मामा स्वर्गीय नानासाहेब य.गो. हरताळकर यांच्यामुळे ते चोपडा येथे आले आणि प्रताप विद्या मंदिर येथे गणिताचे शिक्षक म्हणून रुजू झाले. गणित विज्ञान हे त्यांच्या आवडीचे विषय. अध्यापक म्हणून काही वर्षे काम केल्यानंतर तेही मामांप्रमाणे मुख्याध्यापक झाले. तेव्हाच त्यांना राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. पुरस्कार तसा त्यांनी गुंडाळून ठेवून दिला. कुठलेही मान-सन्मान मान-अपमान च्या भानगडीत न पडता ते आपलं सेवानिवृत्तीनंतरच आयुष्य जगले. दरम्यान आपणही एखादं रोपटं लावाव असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्याला मूर्त स्वरूप डॉक्टर विकासकाका व डॉक्टर विजयकाका यांच्या माध्यमातून आलं. तुम्ही समाजकार्य करता मग एखादी शाळा का नाही काढत? या आग्रहाखातर बालसंस्कार वर्ग सुरू झाला आणि या नविनतम शाळेच्या मंगलाबाई सावित्रीबाई झाल्या आणि

केंगे सर ज्योतिबा त्यांच्याच अर्घ्यदानाने विवेकानंद विद्यालय ही गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणारी शाळा ही ओळख निर्माण झाली. यातच त्यांना खूप आनंद होता. ते या शाळेचे पहिले मुख्याध्यापक झाले.

          कधी एकेकाळी शिक्षक म्हणून काम करत असताना असे अनेक विद्यार्थी त्यांच्या हाताखालून गेले जे आज मोठ्या पदावर कार्यरत आहेत. माननीय प्रा.अरुणभाई हे त्यांतले अग्रणी. त्यांच्या घरी चालणाऱ्या शिकवणी वर्गातून अनेक मुले घडली, ज्यांनी त्यांच्यातला हाडाच्या शिक्षक बघितला आहे.

          सरांचा शिक्षण हा विषय आवडीचा, जिव्हाळ्याचा आणि आनंदाचाही होता. बालक केंद्रित शिक्षण, आनंददायी शिक्षण, ज्ञानरचनावादी शिक्षण हे त्यांचे शैक्षणिक विचार होत. विविध विषय घेऊन त्यांचे विचार रेडिओवर वर्तमानपत्रात विविध मासिकात सदैव प्रकाशित होत राहिले. त्यातून त्यांचं शिक्षणवेड आपल्याला कळतं. लीलाताई, रेणूताई, रमेश पानसे, ज्ञान प्रबोधिनी यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध राहिले. शिक्षण क्षेत्रात येऊ घातलेला नवा विचार ते लगेच चोपड्यासारख्या ग्रामीण भागात पुण्याहून घेऊन येत असत. आणि पुढे असं होणार आहे, अस येणार आहे हे शाळेतल्या शिक्षकांना सांगून ठेवत असत. प्रताप विद्या मंदिर ही माझी शाळा आहे म्हणून या शाळेवर त्यांचे विशेष प्रेम होतच पण विवेकानंद वरही त्यांनी निस्सीम प्रेम केलं. वटवृक्षात रूपांतर होण्यासाठी एखाद्याला जमिनीत गाळून घ्यावे लागतं त्यातले बीज म्हणजे केंगे सर.

आपले मामा नानासाहेब हरताळकर यांच्या विषयी त्यांना आदर व प्रेम होता. मामांच्या प्रतिमेला कधी कसला डाग लागता कामा नये याची त्यांनी नितांत काळजी घेतली. जे प्रेम मामांनी त्यांच्यावर केलं त्या बदल्यात किंबहुना त्याहूनही अधिक प्रेम त्यांनी मामेभाऊ डॉक्टर विकास काकांवर केलं. त्यांच्या दोन्ही मुलांवर डॉक्टर अमित व डॉक्टर विनीत यांच्यावरही केलं, तद्वतच नातू नीलवरही खूप प्रेम केलं. आजही मानस, स्वरा व नील यांची शिकवणी घेत असत.

एखाद्या कुठल्याही बाबीचा मोह न बाळगता त्यापासून आपल्याला सहज बाजूला होता आलं पाहिजे, अस ते नेहमी सांगत. वाचनाचा त्यांनी ध्यास घेतला होता. पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही असं ते नेहमी म्हणत. अलीकडे अध्यात्मिक पुस्तकांचा वाचन त्यांचे सुरू होतं. समवेत एखाद्याची गोष्ट त्यांना आवडली की लगेच ते त्यांना पत्र लिहून आपल्या शुभेच्छा कळवित असत. त्यांचे हस्ताक्षर अगदी मोत्यासारखे होते. या वयातही त्यांचा हात कधी लिहिताना थरथरला नाही. स्मरणशक्ती शाबूत होती. शिक्षण आणि फक्त शिक्षण हा एकच ध्यास घेऊन केंगे सर शेवटपर्यंत जगले ते शिक्षणासाठीच. शिक्षण चिंतन परिषद ही याचेच द्योतक होय. विवेकानंद नव्हे किंवा प्रताप नव्हे तर सबंध चोपडाचे शैक्षणिक वातावरण हे चांगलं राहिलं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे, अद्यावत झालं पाहिजे; यासाठी आग्रह धरणारा हा एक शिक्षण तपस्वी होता. जो आज अनंतात विलीन होत आहे. त्यांच्या जाण्याने चोपडेकरांचा शैक्षणिक मार्गदर्शक हरपला,असे म्हणणेही वावगे ठरणार नाही. सरस्वतीच्या या उपासकाला स्वर्गात येतांना पाहून बुद्धीची देवता गणपतीलाही आनंद होत असेल. कारण तेथेही हा माणूस गणिताचा एखादा शिकवणी वर्ग निश्चितच चालविल यांत कुठलीही शंका नाही.

जेथे दिव्यत्वाची प्रचिती तेथे कर माझे जुळती 

***

एका ज्ञानवृद्ध,तपोवृद्ध वयोवृद्ध शिक्षणमहर्षीअसलेल्या श्रद्धेय श्री केंगेसरांच्या दुःखद निधनाची बातमी कळली आणि मन सुन्न झाले. खूप वाईट वाटले. एक चालत्याबोलत्या ध्यासपर्वाचा अस्त झाला.सदैव प्रसन्न, हसतमुख,मनमिळावू अभ्यासु व्यक्तिमत्त्व हरपले. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर आणि आप्तेष्टांवर डॉ. हरताळकर  कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. सरांना भावपूर्ण श्रद्धांजली!!ईश्वर सरांच्या आत्म्याला चिरशांती देवो.ओम् शांतिःशांतिःशांतिः। प्रा. एस्.टी कुळकर्णी सौ.सुनेत्रा कुळकर्णी.

***

ललित शुक्ल:   केंगे नामक ज्ञानपर्व हरपले...!!!

***

[20/02, 11:49 am] A.N.Sonawane Sir : 

आदरणीय श्री.केंगे सरांच्या निधनाचे दुःखद वृत्त कळले आणि वाईट वाटले. 

सर आम्हाला शिक्षक होते, मुख्याध्यापक होते आणि मार्गदर्शकही होते. 

कौटुंबिक आणि शैक्षणिक पातळीवर ते सातत्याने विचारपूस करायचे. 

तुमचा सध्याचा दिनक्रम काय? हा प्रश्न आता कोण आस्थेने विचारेल?

अभ्यासू, विचारवंत आणि चिकित्सापूर्ण शैक्षणिक विचारांसाठी स्व.केंगे सर सुपरिचित होते. 

परमेश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरःशांती देवो हीच इश्वराला प्रार्थना. 

त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ति परमेश्वर देवो!🌺

॥ ॐ शांती शांती शांती: ॥

***

[20/02, 12:57 pm] प्रा संदीप पाटील: 

शैक्षणिक क्षेत्राला प्रकाशित करणारा नंदादीप विझला

भावपूर्ण श्रद्धांजली!

***💐💐💐💐

[20/02, 10:26 pm] प्राचार्य राजेंद्र महाजन सर:

आदरणीय केंगे सरांचे निधन वार्धक्याने जरी झाले असले तरी निव्वळ धक्कादायक आहे.

आजच्या काळात चरणस्पर्श व्हावे असे पाय दुर्मिळ झाले आहेत.आपण आपण माझ्यासाठी नेहमीच आदर्शवत होता.आपले कलासक्त बोलणे,कलेची ओढ मला आश्चर्यचकित करायची.आपण ज्ञानाचा सागर होता तितकेच सहृदयी व हळव्या मनाचे होता.अलिकडच्या बदललेल्या शिक्षणव्यवस्थेविषयी आपल्या मनात चीड होती,आपण संयत शब्दात माझ्याजवळ कधीकधी व्यक्त करायचात.


माझ्या सेवानिवृत्तीच्या दिवशी(३१जाने.२०२३) आपण प्रमुख अतिथी होता.तीन तास आपण माझे गुणगान समरसतेने ऐकत होता, तितकेच आपण माझ्या कार्यकर्तृत्वाविषयी भरभरुन बोललात.कार्यक्रम संपल्यावरही खूप वेळ माझा हात धरून जुन्या आठवणींना उजाळा देत होता.

आज सारे आठवतांना डोळे पाणावलेत.आपण प्रताप विद्या मंदिराचा सन्मान जपला आणि वृद्धिंगत केला.सचोटीने अध्यापन केले व उमदे प्रशासन केले.

विवेकानंद विद्यालय तर आपण उभे केले,घडवले, नावारुपाला आणले.अख्खी हयात आपण सुसंस्कृत शिक्षणाला प्राधान्य दिले.

आपला सहवास नेहमीच हवाहवासा राहिला.आज आम्ही गुरुविना पोरके झालो.आपल्याला चिरशांती लाभो ही प्रभुचरणी प्रार्थना 

भावपूर्ण आदरांजली,ओम शांती शांती शांती💐💐💐💐💐

***

गौरव महाले सर :

आम्हा धडपड्या लेकरांचे साने गुरुजी!!!

आदरणीय केंगे सर....

शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मधील शिक्षक आपण जिवंत ठेवलात आणि माझ्यासारख्यान्च्या श्वासात शिक्षकांच्या रूपाने ऑक्सिजन दिलात.....

 आणि त्यातून  आम्ही मास्तर म्हणून घडलो. गुरुमाऊली साने गुरुजींच्या सहवासातील गोष्टी तुम्ही आम्हाला सांगत गेलात आणि नकळतपणे आमच्यात मास्तरकीचे बीजं पेरत गेलात......

 You are every inch teacher 

तू हाडाचा शिक्षक आहेस....

 हे तुमचे शब्द कौतुकाचे शब्द आणि पाठीवरील शाबासकीची थाप आमच्यातील शिक्षक सोबत चांगला माणूस घडवत गेला. आम्ही आमच्या समोरील विद्यार्थ्यांच्या हृदयात घर करण्यात थोडेफार यशस्वी होत असू..... तर त्या घराच्या बांधकामाचे सर्व मटेरियल मात्र आपणच पुरवलं आहे हे विसरून कसं चालेल?

कारण शिक्षक म्हणून आपणच आम्हास घडवलंय...

आपल्या प्रत्येक भेटीअंती आपण सदैव शिक्षण ,सामाजिक परिस्थिती, विद्यार्थ्यांची काळजी आणि शिक्षण पद्धती यावरच चर्चा केलीत....

कधी-कधी आपल्या बोलण्यात उद्विग्नता जाणवायची.....ती आपणास असह्य झाली म्हणून आपण अखेरचा निरोप घेतलात का?

पण सर काळजी करू नका....आम्ही आमच्यावतीने शक्य त्या प्रयत्नांनी आपला विचार आणि तळमळ जागृत ठेवू....

चांगल्या आणि विधायक गोष्टींचे मनापासून कौतुक करणारी आणि खरंच मनापासून ज्यांचा चरणस्पर्श करावा अशी खूप कमी माणसं या जगात आता शिल्लक राहिलीत.... त्यात आपण अग्रस्थानी होता!!

ती पोकळी मात्र अवश्य जाणवेल.....

आपण एकदा म्हणाला होतात...

" प्रसिध्दीच्या मागे लागलं की कार्याची सिद्धी होत नाही"....

आम्ही हे नेहमी लक्षात ठेवू!!!

विवेकानंद विद्यालयातील आपल्या सोबतच्या सहवासातील सोनेरी क्षण माझ्या आयुष्यातील खूप मोठी शिदोरी आहे ...त्या संस्कारांच्या शिदोरीच्या जोरावरच पुढचं आयुष्य चाललंय !!!

***

साने गुरुजींना बघितलेले केंगे सर गेले.... 

चोपडा येथील साने गुरुजींचा सहवास लाभलेले माजी प्राचार्य सुधाकर केंगे यांचे काल निधन झाले. 

साने गुरुजींच्या आठवणी सांगणारी ही त्यांची ५ महिन्यापूर्वी त्यांच्या घरी मी घेतलेली मुलाखत...

गुरुजींसारखेच केंगे सर अतिशय प्रेमळ होते हे त्यांचे बोलणे ऐकताना लक्षात येते...चोपड्यात त्यांनी मोठे शैक्षणिक कार्य  केलं...साने गुरुजींचा परिसस्पर्श झालेले आयुष्य कसे समर्पित होऊन जाते याचे केंगे सर उदाहरण होते....

माणसं निघून जातात...जागा भरून निघत नाहीत..कोरड्याठाक आणि आत्मकेंद्रित होत चाललेल्या समाजात ही प्रेमळ,करुणामय माणसं कुठून आणायची....? 

केंगे सरांची ही मुलाखत जरूर ऐका... आपण काय गमावलंय हे बघून डोळ्यात पाणी येतं....

~हेरंब कुलकर्णी

लिंक 

https://youtu.be/u90wmOvfPJQ

***

Monday, 20 February 2023

स्व.केंगे सर,...

स्व.केंगे सर,

सस्नेह सा.नमस्कार 

संवादात नेहमी 'शिक्षण,' शिक्षणातील बदल हा विषय, तुमची दिनचर्या कशी असते? आई-बाबा,ताई, मुले कशी आहेत? समाजात काय चाललंय, काय नवीन विशेष? "ॠतु बदलतात. ऋतु बदलण्यावर माणसाचा विश्वास असायला हवा." असं तुम्ही नेहमी म्हणायचे. आस्थेनं होणारी विचारपूस  याची उत्तरं कुणाला द्यावीत हा 'प्रश्न' तुम्ही मागे सोडून गेलात सर. काल तुमचा फोन आला व हाॅस्पिटलला भेट घेतली त्यावेळीही हीच चर्चा- तुमचं काय सुरुय सर? परीक्षा कधी आहेत?आमच्या नीलने आज पोवाडा छान गायला का?  तसंच TET परीक्षा, बदलत्या शिक्षण प्रक्रियेबद्दल चिंता व्यक्त केलीत. जगतांना आणि शेवटच्या श्वासापर्यंत आपण शिक्षण, वाचन व त्यावरील चिंतन हा ध्यास सदैव जपलात.  आयुष्यात तुमच्यासोबत केलेल्या चर्चेत काही क्षण घालविलेला प्रत्येक व्यक्ती तुमच्या विचारांचा पाईक आहे. त्यामुळे शैक्षणिक, सांस्कृतिक,सामाजिक आणि राजकीय या क्षेत्रात होणाऱ्या  बदलांना सामोरे जाण्याची शक्ती,  सकारात्मक दृष्टी आणि दृष्टिकोन आपण देऊन गेला आहात. तुम्ही निर्माण केलेल्या पाऊलवाटेवरुन मार्गक्रमण करण्याचा व समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोचवण्याचा आम्हां सर्वांचा प्रामाणिक प्रयत्न राहील. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत रहावं. भगवंतांने आपल्या पवित्र आत्म्यास शांती प्रदान करावी हीच प्रार्थना.

ॐ शांति शांति शांति 🌸🌺🌸

~प्रसाद वैद्य व परिवार

Sunday, 11 December 2022

ओळखपत्र ...मातीआड झालेल्या एका हसऱ्या, समंजस दुःखाचं!

ओळखपत्र ...मातीआड झालेल्या एका हसऱ्या, समंजस दुःखाचं!

"काय देती वो तुमची शाळा?

तुमाला तुमच्या शाळेचंच पडलंय...

इतं भुकेनं आss वासलेली पाच तोंडं हायेत पदरात माझ्या.

वरून नवरा तसला पिदाडा.

पोटापाण्याचं आदी बागावं का तुमची शाळाच बगावी?

नुसती शाळा शिकून पोट भरत नसतंय मॅडम! 

आन पयलीचं वर्ष एवढं काय मह्त्वाचं नसतंय..

कायी फरक पडत न्हाई थोडे दिवस शाळा बुडली तर...

मुकादमाकडून 20,000/- रुपय उचल घेतलीय मी घराचे गळके पत्रे दुरुस्त करायला...ती फेडावी लागल का न्हाई?"


आईच्या पदराआड तोंड लपवत, किलकिल्या डोळ्यांनी हे सारं ऐकत होता माऊली!


संध्या मॅडम आपल्या आईला समजावण्यात अयशस्वी झाल्यात,आता सगळं आपल्या मनाविरुद्ध होणार, हे एव्हाना लक्षात आलं होतं त्या चिमुकल्या जिवाच्या!

मॅडम म्हणत होत्या," शाळेच्या होस्टलवर  सोय होईल त्याची राहण्याची. मी विचारते संस्थेला. हुशार आहे हो माऊली,असं मध्येच नेऊन त्याचं

नुकसान नका करू!"


"नगं.... पाचीच्या पाची लेकरं घेऊन चाललेय मी.चार पोरीच्या पाठीवर झालंय हे पोरगं मला, त्याला इथं ठेऊन तिथं जीव कसा लागल माजा?"


तब्बल आठवडाभराच्या चर्चेअंती संध्या मॅडमला माऊलीच्या आईकडून मिळालेलं हे निराशाजनक अन् काहीसं कटू उत्तर होतं.


पण त्याक्षणी त्या हेही जाणून होत्या की, त्यांना केवळ एक शिक्षणाबद्दल अनास्था असलेला,अशिक्षित पालक बोलत नसून, नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून गेलेली, पाच लेकरांच्या पोटापाण्याचा प्रश्न भेडसावत असलेली हतबल आई बोलत होती.


अखेर परिस्थितीसमोर नाईलाज झाला अन् उद्या प्रथम सत्राचा शेवटचा पेपर देऊन माऊली काही महिन्यांसाठी शाळा सोडून आईसोबत ऊसतोडीसाठी भटकंती करत  गावोगाव फिरणार,यावर शिक्कामोर्तब झालं!


गरिबीचे निकष अन् व्याख्या तिला सोसणाराच सांगू शकतो, इतरांनी त्यावर सांगितलेल्या उपाययोजना केवळ  पुळचट असतात!


दुसरा दिवस...

माऊली मन लावून पेपर सोडवत होता, मॅडम त्याच्याकडे बघत विचार करत होत्या..


'काय भविष्य असेल अशा लेकरांचं? पोटाला दोनवेळचं अन्न मिळवणं हे आणि हेच अंतिम ध्येय असलेल्या अशा कैक लोकांचं?'


मॅडम विचारात असतानाच माऊली त्यांच्यासमोर सोडवलेला पेपर घेऊन उभा राहिला. मॅडम भानावर आल्या.


पेपरसोबत त्याने एक छोटीशी कोरी चिठ्ठी मॅडमकडे सरकवली...

"मॅडम, आमच्यासोबत मावशी पण येणार आहे. मला तुमचा नंबर द्या, मावशीच्या फोनवरून मी कधी मिसकॉल केला तर कराल का मला फोन?

त्या चिमुकल्या जीवाची ती साधीच मागणी किती आर्त वाटली त्याक्षणी!


पेपरवर नजर फिरवली. किती सुवाच्य अक्षर, अचूकता...!


त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे टक लावून बघीतलं मॅडमने.


घंटा वाजली, शाळा सुटली, अन् एक चिमुकला जीव आपल्या मनाविरुद्ध जगण्यासाठी चकारही न काढता निघून गेला.


लखलखता दिवाळसण...

झगमगाट, रोषणाई, नवनवीन खरेदी, उत्साह, गुलाबी थंडी...


एकुणात सुखवस्तू सण..!


पण जगाच्या एका कोपऱ्यात एक कोवळा जीव कुठेतरी हाच सण ऊसाच्या घनदाट

रानात, किर्रर्र अंधाराच्या साक्षीनं केवळ कल्पनेत साजरा करत होता.


त्या किर्रर्रर, कर्कश्श रानात,दिवसभर काम करून दमून निजलेल्या माणसांच्या घामाच्या दुर्गंधात, किरकिऱ्यांच्या आवाजात,अठराविश्व दारिद्र्याच्या ओटीत, शिक्षणाची चटक लागलेला पण परिस्थितीपुढे हतबल झालेला एक जीव त्या भयाण शांततेत  मनातल्या मनात किंचाळायचा.


गावाबाहेर दूर कुठेतरी उसाच्या फडात तंबू ठोकून राहिलेल्या त्याच्या टोळीत त्याला दुरून एखाद्या फटाक्याचा बारीकसा आवाज, लुकलूकणारा एखादा आकाशकंदील दिसायचा अन् त्या कडाक्याच्या थंडीत अंगावरच्या फाटक्या कपड्यानिशी बाहेर येऊन तो हा सण अधाशागत कानाडोळ्यांनी प्यायचा!...

घाटाघटा....!!


दिवसा ऊसाच्या चरबट पानांच्या सळसळीत त्याच्या पुस्तकाच्या पानांचा आवाज विरून जायचा.


भाऊबीजेदिवशी दुपारी मॅडमचा फोन अचानक किंचित चमकला, थरथरला...लगेच बंद झाला..

एखादी किंकाळी दाबावी तसा!


Unknown  number..


मॅडमने त्यावर फोन लावला. रिंग जाते न जाते, तोच फोन उचलला गेला.

एक मृदू, कोवळा,नाजूक, सच्चा पण दबका आवाज...

गुपचूप केला असावा ...


"मॅडम, मी माऊली!"


"बोल बाळा, कसा आहेस? कुठे आहेस? दिवाळीत आलास का इकडे?"


"मॅडम, आम्ही इकडं खूप लांब आलोत,मला ह्या गावाचं नाव माहीत नाही.सारखंच गाव बदलत जातोत आम्ही ऊसतोडीला!

मुकादम खूप कडक आहे."


"बरं..!

अरे, दिवाळी कशी झाली मग तुझी ?

नवा ड्रेस घेतलास ना? आईनं काय काय केलंय फराळाला?"


"न्हाई मॅडम,

मायजवळ पैशे न्हाईत भाजीचं समान आणायला.

चार दिवस झाले,आम्ही रानातली कच्ची पात खायलोत भाकरीसोबत.

कोरडा घास गिळतच न्हाई, पाणी पेत पेत जेवावं  लागतंय.

इथं मित्र पण नाहीत खेळायला.

नयन, अर्णव, रुपेशची खूप आठवण येते."


ओह! पराकोटीचं दारिद्र्य,दुःख बोलत होतं केविलवाण्या स्वरात!


"मॅडम, मला गणितातली वजाबाकी समजत नाहीय, सांगतात का समजून?"


"अरे, तिथं पण अभ्यास करतोयस की काय?"


"हो मॅडम, मी सगळी पुस्तकं आणलीत इथं.

बहिणी, माय कामावर गेल्या की मी अभ्यास करतो.वहीवरच्या तुमच्या सह्या बघून 

खूप आठवण येते तुमची. शाळा किती तारखेला भरणारये मॅडम?

आईला विचारलं तर लई खेकसती माझ्यावर!....

शाळेचं नुसतं नाव जरी काढलं तरी.

सारखं म्हणती..

'काय दिती रं तुझी ती शाळा?'"


आयुष्याचे कैक उत्सव, इच्छा वेळोवेळी वजा केलेल्या त्या शिष्याला गुरूने गणितातली वजाबाकी समजावून सांगितली.

त्याक्षणी ते ज्ञानही आधाशागत प्राशन करत  होते त्याचे कान.


संवाद संपला...


डोळे मिटून मॅडम विचार करू लागल्या...


'जगण्यासाठी आयुष्याच्या काही  अलिखित अटी गुपचूप मान्य केलेल्या असतात प्रत्येकानेच.


अश्वत्थाम्यासारख्या असंख्य जखमा आजन्म मिरवत असतात काही जीव!

पोटातली भुसभुशीत दलदल भुकेच्याही बाहेर एक जग असतं हे विसरून जायला भाग पाडते.


सादळलेल्या परिस्थितीचे ओले पापुद्रे सोलण्यात उभा जन्म जातो...अस्तित्वावर बुरशी चढवत!


अस्तित्वहीन जन्माची ठणकही जाणवू देत नाही ती भूक.


प्रगतीच्या गुरुत्वाकर्षणकक्षेच्या कोसो दूर हुंदडत उभं आयुष्य जातं अन् एक  दिवस अवेळी अंधार पांघरून निपचित निजतं.


खरंच... वास्तवाइतकं परखड, पारदर्शी काहीच नसतं... काहीच!


दीर्घ सुट्टीनंतर ,शाळा भरल्या.

वर्गावर्गात हजेरी सुरू झाली..

१.यश बनसोडे....यस मॅडम...!

२.अथर्व आवड...यस मॅडम...!

.

.

.

.

.

.

९.माऊली बडे   ........शांतता...!


त्याक्षणी त्याच्या डेस्कवरची ती रिकामी जागा खूप काही बोलत होती..!

त्याचा मंजुळ आवाज, उत्तर देण्यासाठीची धडपड..!


शाळा सुटली..

मुले लगबगीनं वर्गाबाहेर पडली..

मॅडम सामानाची आवराआवर करू लागल्या..

पर्स, टाचणवाही, हजेरी,पुस्तके, बॉटल....सगळं दोन हातांत घेणं....केवळ अशक्य!


तिथेही 'त्याची' आठवण आली..


तो नित्याने थांबायचा..

मॅडमला हे सगळं घेऊ लागायचा.

पाण्याची बॉटल हातात घेऊन सर्वांत शेवटी मॅडमसोबत वर्गाबाहेर  पडायचा.


पराकोटीची समज अन् माया असते एखाद्या माणसात!


शाळा सुटल्यावर मॅडम गाडीवर घरी निघाल्या.

तोच मागून कुणीतरी


"मॅडम sss .."


हाक मारली.

गाडी थांबवून मागे पाहिलं तर एक छोटी मुलगी पळत आली अन् म्हणाली,"तुम्हाला माऊली च्या आईनं बोलावलंय."


"त्या इथं कसं काय?

कधी आले ते सगळे इकडे?"

म्हणेपर्यंत तर ती मुलगी पळूनही गेली...

आश्चर्य अन् आनंदही वाटला.

मनोमन  सुखावल्या मॅडम.


तशीच गाडी माऊलीच्या घराकडे वळवली.

रस्त्यावर मुलं खेळत होती..

"मॅडम,मॅडम"..

हाका मारत होती.

पण ह्या सगळ्यांत माऊली कुठेच दिसला नाही.

घरासमोर आल्या.

कुडाचं, पत्र्याचं घर ते!

दुरावस्था झालेलं..

सगळं भकास..ओसाड...


दाराआत डोकावलं तर..

भयाण शांतता....

त्या शांततेत घोंगावणाऱ्या माशांचा आवाज,

जवळच्या नाल्याची दुर्गंधी,

पावसाळ्यात गळणाऱ्या पत्र्यांच्या छिद्रांतून डोकावलेले, जागोजागी दारिद्र्याची लक्षणे दाखवणारे कवडसे..

मागच्या दाराबाहेर खाटेवर दारू पिऊन बेधुंदावस्थेत पसरलेला माऊलीचा बाप..


अन् कुठल्याशा कोपऱ्यात गुडघ्यांत तोंड खुपसून बसलेली माऊलीची आई!


आत जाताच.."माऊली" हाक मारली.


तोच त्या आईने छताकडे बघत मोठ्याने हंबरडा फोडला....."माऊली, तुझ्या मॅडम आल्यात रे! ये की लवकर!"


काळजात चर्रर्र झालं!

शंकेची पाल चुकचुकली,

पण नेमका अंदाज येईना!


तोच मागून आवाज आला,


"काय सांगावं मॅडम, माऊलीचा घात केला हीनं! मारून टाकलं ह्या बाईनं त्याला!"


भोवताली अगणित किंचाळ्या टाहो फोडत घिरट्या घालत असल्यागत झालं एकदम.


घरमालकीण मॅडमजवळ येत म्हणाली," मीच निरोप धाडला होता तुमाला बोलवायला.मॅडम,ही बया एकट्या माऊलीला घरी सोडून, पोरींला घेऊन कामावर गेली, जेवणाच्या सुट्टीत आली तर लेकराच्या तोंडाला फेस,अन् हातपाय खोडत होतं ते!


माऊलीला सर्प डसला वो,

 लेकरू तडपडुन मेलं!


त्याला नगं न्हेऊ म्हणलं होतं मी हिला..मी संबाळते म्हणलं होतं त्याला चार महिने!

पण हिला ईश्वास न्हाई! चार पोरीच्या पाठीवर झाल्यालं नवसाचं पोरगं म्हणून सोबत न्हेलं हीनं, आन काटा निगाला लेकराचा!

लई भांडून गेली होती ना ही तुमाला? मंग नीट संबाळायचं होतं की त्याला! "


तिचे शब्द मॅडमच्या कानात लाव्हा ओतल्यागत शिरत होते.पण मेंदू मात्र थंड पडत होता.

 कोरड्या ठक्क डोळ्यांतून रक्ताचे अश्रू तेवढे बाहेर पडायचे बाकी होते!

तरीही अवंढा गिळून जमिनीकडे खिळलेली नजर विचलित न होऊ देता मॅडमने विचारलं,

"दवाखान्यात नेलं नाही का लवकर?"


"इकडं यायला निगाली होती, पण मुकादमानं  येऊ दिलं न्हाई म्हणं.आधी घेतलेली 20,000 उचल दे म्हणला म्हणं !


तितंच कुण्या जाणत्याला दाखवलं म्हणं.

दोन दिवस तडपडत होतं म्हणं लेकरू.दवाखान्यात दाखवलं असतं तर हाती लागला असता मावल्या ! 


त्याला सदा एकच म्हणायची...

'काय देती रं मावल्या तुझी शाळा??'

त्याच्या वह्या पुस्तकावर राग राग करायची,म्हणून त्यानं जाताना कपड्याच्या घड्यात घालून न्हेली पुस्तकं!

अन् आता रडत बसलीय!"


म्हातारी घरमालकीण पोटतिडकीने बोलत होती.


छताकडं शून्यात नजर लावून ती आई बघत होती!

स्वतःच्या लेकराला वाचवू न शकल्याचा आरोप होत होता तिच्यावर!


त्याच्या शेवट


च्या पेपरमधील त्याचं देखणं अक्षर, आईच्या आडून बघत त्याने डोळ्यांनी केलेली आर्जवे, गुपचूप केलेल्या फोनमधील त्याचा दबका, पण सच्चा आवाज,सारं सारं चित्रफितीसारखं डोळ्यासमोरून जात होतं मॅडमच्या!


त्या माऊलीचं सांत्वन न करताच मॅडम उठून दाराकडे चालू लागल्या.

पाषाण हृदयाने, निःशब्द...!


तोच मागून आवाज आला,


"मॅडम......

पाच भुकेली तोंडं पोसण्यापलीकडं काहीच करू शकले नाही मी उभ्या जन्मात!

मावल्या असा सोडून जाईल,असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं!

लेकरानं तडपडत माझ्या डोळ्यात बघत,माझ्या मांडीवर जीव सोडला.


त्याची आठवण आली तर माझ्याकडं त्याचा साधा एक फोटो पण नाही, ह्याचं लै वाईट वाटायचं!


आज त्याचं सामान बघताना एक गोष्ट सापडली...


तुम्हाला मी म्हणलं होतं ना..

'तुमची शाळा काय देती म्हणून?'


माझ्या जन्माला पुरंल आशी, त्याची सगळ्यात मोठी आठवण दिलीय मला तुमच्या शाळेनं!"


असं म्हणत तिनं छातीशी कवटाळलेल्या हाताच्या मुठीतला ऐवज उघडून मॅडमसमोर धरला...


शाळेनं दिलेलं 


ओळखपत्र होतं ते.....!

तिच्या काळजाचं!

मातीआड झालेल्या एका हसऱ्या, समंजस दुःखाचं!


(शिक्षक म्हणून भोगलेला अनुभव आहे हा!

...दुर्दैवाने...😢

पात्रांची नावं  बदलली आहेत.🙏

आजही तितक्याच तीव्रतेने आठवण येते त्याची..!🙏)

 

~©संध्या सोळंके-शिंदे,

     अंबाजोगाई 


~संकलन

Friday, 9 December 2022

गुरुचरित्र काय शिकविते ?

गुरुचरित्र काय शिकविते ?

कितीक सरले कितीक उरले,

आयुष्याला मोजु नका.

मस्त जगूया आनंदाने,

मंत्र मुळी हा सोडू नका.

ॐ श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः !!

नाही पटले काही जरीही

उगाच क्रोधीत होऊ नका.

व्यक्ती तितक्या विचारधारा, 

मंत्र मुळी हा सोडू नका.

 ॐ श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः !!


योग्य अयोग्य चूक बरोबर,

मोजमाप हे लावू नका.

विवेक बुद्धि प्रत्येकाला,

मंत्र मुळी हा सोडू नका.

ॐ श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः !!


सुख दुःख हे पुण्य पाप ते,

दैव भोग हे तोलू नका.

कर्म फळाच्या सिद्धांताचा,

मंत्र मुळी हा सोडू नका.

ॐ श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः !!


खाण्या बाबत हट्टी आग्रही,

कधी कुठेही राहू नका.

खाऊ मोजके राहू निरोगी,

मंत्र मुळी हा सोडू नका.

ॐ श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः !!


संस्कारांचे मोती उधळले,

पैसा शिल्लक ठेवू नका.

पैसा करतो आपले परके,

मंत्र मुळी हा सोडू नका.

ॐ श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः !!


मत आपले,विचार,सल्ला,

विचारल्या विण देऊ नका.

मान आपला आपण राखा,

मंत्र मुळी हा सोडू नका.

ॐ श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः !!


नित्यच पाळा वेळा, 

सर्व वेळी अवेळी जागू नका .

पैश्याहुनही अमूल्य वेळा,

मंत्र मुळी हा सोडू नका.

ॐ श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः !!


नाही बोलले कुणी तरीही,

वाईट वाटुन घेऊ नका.

मौन साधते सर्वार्थाला,

मंत्र मुळी हा सोडू नका.

ॐ श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः !!


जगलो केवळ इतरांसाठी,

कुठेच आता गुंतू नका.

फक्त जगुया आपल्यासाठी,

मंत्र मुळी हा सोडू नका.

ॐ श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः !!


जाणा कारण या जन्माचे,

वेळ व्यर्थ हा घालू नका.

श्वासोश्वासी नामच घ्यावे,

मंत्र मुळी हा सोडू नका.

ॐ श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः !!

🌹🙏जय सदगुरु🙏🌹













~संकलन

Thursday, 17 November 2022

काय असते गिरनार वारी....?

 🌹 " काय असते गिरनार वारी....?"🌹

नेहमी गिरनार जायचे म्हटले की काही जण म्हणतात काय वेड लागले की काय दर 2 महिने झाले की गिरनार ला पळतोस!!!!!...     

हो आमच्या भाषेत वेडच ते आणि आम्ही तेच वेडे आहोत... नाहीतर तुम्ही शहाणे तिथे जालच कश्याला? बरोबर ना?   कारण...(वेळेला वेडेच उपयोगी येतात आणि शहाणे पळून जातात) 

काय मिळतं तिथे सारखं जाऊन?  काम धंदे सोडून पळतात तिकडे ते... 

अस काय आहे गिरनार?

अहो काम धंदे सोडून कोणी जात नाही तर आमच्या गिरनारी साठी वेळ काढून जातो दर्शनासाठी... जिथे प्रत्येक पायरी चढतांना चांगली, वाईट केलेली कर्म आठवतात ना ते आहे गिरनार...


 तिथे गेल्यावर आठवतं व चांगली बुद्धी जागृत होते ते आहे गिरनार... 

       जीवनातली सगळी दुःख विसरून, रोजची घरातली,बाहेरची कटकट विसरून 5 दिवस जो सुखाने जगतो ना, जिथे सुख,समाधान मिळतं ना ते आहे गिरनार... 

भक्तीमय वातावरणात राहून जो आनंद मिळतो ना ते आहे गिरनार...

श्रीमंत,गरीब जिथे एकत्र येतात ना ते आहे गिरनार...

      सगळ्या सुख दुःखांची जिथे बेरीज वजाबाकी करून सुद्धा शिल्लक काही राहत नसेल, तरी सुध्दा काहीतरी मिळतं ते आहे गिरनार....

        आरोग्याच्या तक्रारी, नोकरीत बढती, व्यवसायात वाढ, मुलांची शिक्षणं, लग्न, घरदार सगळं काही मनासारखे होते जिथे गेल्यावर ते म्हणजे गिरनार.... 

       ढोपरं दुखतात,दम लागतो, तरी सुद्धा एक एक पायरी चढून जाण्याची इच्छाशक्ती जिथे वाढते, ते म्हणजे गिरनार...

        जिथे भल्या भल्यांची परीक्षा घेतली जाते, अहंकार जिथे गळून पडतो, व मग अक्कल ठिकाणावर येते अपराधाची केल्याची जिथे जाणीव होते ते गिरनार...

         असे हे आमच्या गिरनारी महाराजांचे गिरनार... आणि तुम्ही म्हणता काय मिळतं तिथे सारखं सारखं जाऊन गिरनार... 

         माहेर वाशीण जशी माहेराला येते व तिला जो आनंद होतो ना आल्यावर व निघतांना पाय निघत नाही, तसच आमचं हे गिरनार...

        हे सर्व वाचून ज्याचे मन म्हणते बरोबर आहे, व ज्याच्या डोळ्यात आपसूक पाणी येते ना ते हे गिरनार...

          हे सर्व तुम्हाला नाही समजणार कारण तुम्ही तर या संसाराच्या मोह-माया पासून सुटुच शकत नाही,आणि महाराजांच्या जवळ जाण्याची बुद्धीच होणार नाही, तो पर्यंत समजणार नाही काय आहे गिरनार... 

  तर अस आहे गिरनार...          

   जय गिरनारी

|| अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त ||


श्रीकांत कापसे पाटील...©✍️









-संकलन